तथापि, शिल्लक राहिलेल्या या सांगाड्यावरून चिनी प्रवाशानें बुद्धचरिताची एवढी स्तुति कशी केली व ती किती योग्य आहे हें आपल्याला समजून घेता येतें. हा ग्रंथ म्हणजे आपल्यापुढें एका उत्कृष्ट कवीनें लिहिलेलें अगदी पहिलें बुद्ध काव्य आहे. या कवीला आपला गुरू महात्मा बुद्ध याविषयीं अत्यंत प्रेम व आदर वाटत असून बुद्धतत्त्वाची सत्यता त्याला पूर्णपणें पटली असल्यामुळें त्यानें आपल्या गुरूचें चरित्र व तत्त्वें उच्च व खुबीदार पण कृत्रिम नव्हें अशा भाषेंत मांडली आहेत. बुद्धचरित हें साहित्य शास्त्रीय दृष्टया महाकाव्य आहे. यास पाश्चात्य शास्त्रज्ञ एक दरबारी काव्य म्हणतील. हें रामायणाच्याच काव्यपद्धतीवर लिहिलेलें आहे. ज्याप्रमाणें अश्वघोष हा कालिदासांचा पूर्वकालीन होता त्याप्रमाणें वाल्मीकि व त्याच्या लगेच मागून होऊन गेलेले ग्रंथकार हे अश्वघोषाचे पूर्वकालीन होते. आपण फार नेमस्तपणानें अलंकारांचा उपयोग केलेला आहे असें या तिन्हीं महाकवींचे म्हणणें आहे. भाषा व पद्धति यांसबंधी अश्वघोष जितका नेमस्त आहे तितकाच तो बुद्धचारतांतील अद्भूत कथा प्रतिपादन करण्यांत नेमस्त आहे. ललितविस्तरांत ज्या प्रकारच्या अतिशयोक्ती आढळतात तशा प्रकारच्या अतिशयोक्तींपासून तो नेहमी अलिप्त राहतो. महावस्तु व ललितविस्तर वगैरे ग्रंथांत फार अव्यवस्था आहे तशी बुद्ध चरितांत नसून त्यांतील विषयाची मांडणी नीट विचार करून खुबीनें केलेली आहे. आणि जरी प्राचीन धर्मग्रंथांची कवीला पूर्ण माहिती आहे, तरी कांहीं बाबतींत त्यानें थोडेंसें स्वातंत्र्य घेतलेलें आहे. परंपरेमध्यें त्यानें कांही बदल केला आहे असें नाहीं; परंतु जुन्या परिचयाच्या गोष्टींनां नवें काव्यस्वरूप कसें द्यावयाचें व बौद्धसूत्रांतील प्रसिद्ध तत्त्वांनां मूळचें स्वरूप कसें द्यावयाचें हें त्याला अवगत होतें असें दिसतें. अश्वघोषाच्या अंगी भिक्षूपणापेक्षा कवित्व अधिक होतें असें निदान बुद्धचरितावरून तरी दिसतें.
तिसर्या व चौथ्या सर्गांतील तरुण राजपुत्राच्या पर्यटणाचें वर्णन काव्यदृष्टया ललिताविस्तराहून किती तरी भिन्न आहे.
राजपुत्र बाहेर जात आहे हें ऐकतांच शहरांतील स्त्रिया आपापल्या खोलींतून घरांच्या छपरावर व खिडकीपाशीं औत्सुक्यानें आल्या, याचें बहारींचे वर्णन आहे. त्यांच्या पडून जाणार्या कटिमेखलांच्या योगानें अडथळा झाल्यामुळें एकमेकींनां ढकलून देऊन, धक्के देऊन आणि अंगठया व कटिमेखल यांच्या आवाजानें छप्परावरील पक्ष्यांनां पळवून लावून त्या स्वतः मोठया धांदलीनें धांवत सुटल्या. सुंदर स्त्रियांच्या खिडक्यांबाहेर आलेल्या मुखकमलांवरून जणूंकाय गृहांच्या भिंती खर्या कमलांनी सुशोभित केल्या होत्या की काय असें दिसत होतें. [(अश्वगोषच्या बुद्धचरित ३,१३—२४) या वर्णनांचें रघुवंशात (७,५-१२) कालिदासानें अनुकरण केलें आहे. हें कॉवेलने दर्शविलें आहे. (बुद्ध चरित, प्रस्तावना)] देवांनीं पाठविलेल्या वृद्ध मनुष्याच्या भेटीचें वर्णनाहि तसेंच सुंदर आहे. सभाश्चर्यानें राजपुत्रानें विचारिलें, “हे सारथे ज्याचे केंस पांढरे झाले आहेत, डोळे खोल गेलेले आहेत, ज्यानें आपल्या काठीवर सर्व भाग टाकला आहे व ज्याचे अवयव कंपित झाले आहेत, असा हा इकडे येणारा मनुष्य कोण आहे? हा निसर्गधर्म आहे किंवा दैवलीला आहे?”
नंतर त्या सारथ्यानें उत्तर दिलें. “सौंदर्य हरण करणारें, निःसत्त्व करून टाकणारें, काळजी उत्पन्न करणारें, सुखें नाहींशीं करणारें, इंद्रियांचा शत्रू व स्मरण शक्ति नष्ट करणारें असें जें वार्धक्य त्याच्या योगानें हा शक्तिहीन झालेला आहे. यानेंहि लहानपणीं आपल्या आईचें स्तपान केलें आहे; कांहीं कालानें हा चालावयास शिकला; हळूहळू हा मोठा सशक्त असा तरुण झाला, व कालांतरानें यास वार्धक्यानें गांठिलें.”
त्या राजपुत्रानें तीन पर्यटनें केल्यावर वार्धक्य, रोग व मृत्यु यांची त्याला माहिती झाली; त्याला कोठेंहि आनंद वाटेनासा झाला. राजाच्या विनंतीवरून कुलोपाध्यायानें राजपुत्राला मोह पाडण्यासाठीं व त्याची उदासीन वृत्ति नष्ट करण्यासाठीं राज्यवाडयांतील स्त्रियांस व मुलींस बोलावून आणून सर्व प्रकारचे श्रृंगारभाव करण्यास सांगितलें; परंतु त्यांचा कांही एक उपयोग झाला नाहीं. राजपुत्रावर त्या मोहांचा यंत्किचितहि परिणाम झाला नाहीं. त्या उल्हसित वृत्तींच्या स्त्रियांचें त्यास आश्चर्य वाटून तो म्हणाला. (४, ६०)
“आपल्या शेजार्याचा आजार, वार्धक्य व मृत्यु पाहूनहि जो मनुष्य आनंदांत राहतो व जो भीतिग्रस्त होत नाहीं तो मनुष्य फार असमंजस असला पाहिजें असें मला वाटतें. फलपुष्पविरहित असा एखादा वृक्ष जेव्हां पडून जातो किवा जेव्हां पाडला जातो तेव्हां शेजारच्या वृक्षाला त्याबद्दल कांहीएक वाटत नाहीं.”
महाकाव्यांमध्यें शृंगार अवश्य मानला आहे. राजवाडयांतून रात्रीं राजपुत्राच्या पलायनाला कारणीभूत झालेल्या स्त्रियांच्या रात्रीच्या रंगमहालाचें वर्णन देऊन कवीनें ज्याप्रमाणें आपलें शृंगारविषयक ज्ञान प्रगट केलें आहे. [५,४८-६२ विनयपिटकांत यस याच्या तोंडी या देखाव्याचें मूळ वर्णन घातलें आहे (बुध्देतर जग पृ. १९५ पहा) अश्वघोषाचें अनुकरण करून रामायणांत अशाच प्रकारची वर्णनें दिली आहेत.)] त्याचप्रमाणें, राजपुत्राला मोहित करण्यासाठीं सुंदर स्त्रियांनीं ज्या प्रेमलीला दाखविण्याचा प्रयत्न केला, त्या प्रेमलीलांचें वर्णन करून वर सांगितलेल्या आवश्यक गोष्टींचीं त्यानें पूर्णता केली. परंतु महाकाव्याच्या कवीला नीतिशास्त्रांतील तत्त्वांचीहि माहिती असणें जरूर आहे. राजपुत्राला त्याच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठीं अशा प्रकारचीं तत्त्वें कुलोपाध्याय त्याला म्हणून दाखवीत असे.लढाईतील (४, ६२-८२) देखाव्यांचें वर्णनहि अशा काव्यांत येत असे. तेराव्या सर्गांत मार व त्याचे लोक यांच्याशीं झालेल्या बुद्धाच्या लढाईचें जोरदार वर्णन थोडक्यांत देऊन हीहि अपेक्षा कवीनें पूर्ण केली आहे.
सौं द रा नं द.—अश्वघोषाचें सौंदरानन्द हें काव्य हर प्रसाद शास्त्री यांनीं शोधून प्रसिद्ध केलें. हेहि बुद्धचरितासंबंधींच आहे; परंतु बुद्धचरित या ग्रंथांत जे प्रसंग व ज्या उपकथा थोडक्यांत वर्णन केल्या आहेत किंवा ज्यांचा मुळीच उल्लेख केलेला नाहीं, अशा गोष्टी विशेषतः विस्तृतपणें या काव्यांत सांगितलेल्या आहेत. पहिल्या सर्गांत कपिलवस्तुस्थापनेची गोष्ट सविस्तरपणें सांगितलेली आहे. बुद्धाचा सावत्र भाऊ जो विरही नन्द ज्याला त्याच्या इच्छेविरुद्ध बुद्धानें पुढें भिक्षूची दीक्षा दिली हा या काव्याचा मुख्य विषय आहे.
ज्याप्रमाणें नन्दाची सुंदर पत्नी सुन्दरी नाहींशा झालेल्या आपल्या पतीसाठीं शोक करीत आहे त्याचप्रमाणें नन्दहि आपल्या प्रियेकडे परत जाण्याची इच्छा करीत आहे. त्या पंथांतील लोकांनीं त्याचें सांत्वन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा कांहीएक उपयोग झाला नाहीं. बुद्धाच्या भाषणानेंहि त्याची वृत्ति बदलली नाही. नंतर गुरूनें त्याला आपल्या हातांत धरून स्वर्गारोहण केलें. वाटेंत हिमालयावर एक एकाक्षी वानरस्त्री त्यांनां आढळली, ‘सुंदरी या वानरीपेक्षां अधिक सुंदर आहे काय असा बुद्धानें प्रश्न केल्यावर, नन्दानें ‘होय’ असें उत्साहानें सांगितलें. परंतु लवकरच स्वर्गांतील अप्सरा त्यांच्या दृष्टीस पडल्या, तेव्हां आपली बायको व वानरी यांमध्यें जितका फरक आहे तितकाच अप्सरा व आपली बायको यामध्यें फरक आहे असें नन्दास आढळून आलें. त्या वेळेपासून अप्सरांविषयीं त्याला उत्कट इच्छा उत्पन्न झाल्यामुळें, पृथ्वीवर परत आल्यावर स्वर्गांत जाण्यासाठीं तो मनाषासून तपश्चर्या करूं लागला. नंतर स्वर्गसुखांतहि कांही अर्थ नाहीं असें आनंदानें त्यास शिकविलें. सरतेशेवटीं नंदाची खात्री पटूं लागली व आपल्याला आतां अप्सरांची इच्छा नाहीं असें कळविण्याकरितां तो बुद्धाकडे गेला. हें ऐकून बुद्धाला फार आनंद झाला व त्यानें (कित्येत सर्गांमध्यें) त्याला आपल्या संप्रदायाचें मुख्य स्वरूप शिकविलें. नंतर नंद अरण्यांत गेला व चार प्रकारचीं ध्यानें लोकांस उपदेशून अर्हत् झाला. कृतज्ञ तापूर्वक तो बुद्धाकडे गेला व त्यानें त्याची पूजा केली. तुझा हेतु आतां सफल झाला आहे तेव्हां मुक्ति म्हणजे काय हें लोकांनां समजावून व त्यांच्यावर दया करून त्यांनां [नंदाच्या धर्मांतराचा महावग्गांत पूर्वींच उल्लेख केलेला आहे (१, ५४) निदान कथेंतहि उल्लेख आलेला आहे.] उद्धार मार्गाला लाव असें गुरूनें त्याला सांगितलें.
बुद्धचरितांमध्यें महायान पंथाचीं निश्चित मतें मुळीच आढळत नाहींत. परंतु सौदरानंद काव्याच्या उपसंहाराचा महायान पंथाकडे बराच कल दिसतो. नंदाला सिद्धजन बनवून त्यास निर्वाणप्राप्ति करून दिली एवढयावरच न थांबतां त्याला धर्मप्रसाराच्या कामाला लाविले (हनियानामध्येहि उपदेशाचें व धर्मातरांचे फार महत्त्व होतें हें अंगुत्तरनिका— यांतील ४७ व्या पानावर दिलेल्या एका सुत्तावरून समजतें.) हें विशेष आहे.
सू त्रा लं का र:— या अश्वघोषाच्या तिसर्या मोठया ग्रंथांत हनियानी आख्यानांसारखी अनेक कथानकें आहेत. इ. स. ४०५ च्या सुमारस झालेल्या भाषंतरावरून जें फ्रेंच भाषांतर झालें त्यावरूनच सूभालंकाराची आज पर्यंत आपल्याला माहिती होती. सूत्रालंकार हा जातकें व अवदानें यांसारख्या धार्मिक कंथाचा एक समुच्चय आहे. या कथा गद्यात्मक व पद्यात्मक असून या साध्या काव्यपद्धतीवर लिहिलेल्या आहेत. दीर्घायु व शिबि राजा इत्यादि कांहीं गोष्टी पूर्वींच परिचित झालेल्या आहेत; दुसर्या कांहीं गोष्टींत महायानी पंथाचें किंवा बुद्धाराधनेचें तत्त्व अधिक प्रमाणांत दिसून येतें. यातील सत्तावन्नावी गोष्ट अशाच प्रकारची असून, सर्व कथासमूहांतील अतिशय सुंदर गोष्टीं पैकीं पुढील एक आहे.
एका मनुष्यानें मठामध्यें येऊन दीक्षा घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. सारिपुत्र नांवाच्या शिष्यानें त्याची परीक्षा घेतली, तेव्हां त्यास असें आढळून आलें कीं, एकंदर विश्वयुंगातील कोणत्याहि जन्मीं त्यानें यांत्किंचितहि सत्कृत्य केलेलें नव्हतें; म्हणून दीक्षा घेण्यास तूं अयोग्य आहेस असें त्यानें त्यास सांगितलें. तेव्हा रडत रडत तो मठांतून निघून गेला. ज्याप्रमाणें माता आपल्या मुलावर प्रेम करिते त्याप्रमाणेंच सर्वांवर प्रेम करणारा व ज्याल प्रत्येकास आपल्या पंथांना घेण्याची इच्छा होती असा महात्मा बुद्ध त्याला भेटला. त्या झिडकारून लाविलेल्या मनुष्याच्या मस्तकावर हात ठेवून तू का रडतोस असें बुद्धानें त्याला विचारिलें. सारिपुत्रानें माझा त्याग केला असें त्यानें सांगितल्यावर दुरून मेघगर्जनेचा जसा आवाज होतो तशा प्रकारच्या आवाजानें बुद्धानें त्याचें सांत्वन केलें व सारिपुत्र हा कांहीं सर्वज्ञ नाहीं असें त्यानें सांगितलें. त्या महात्म्यानें स्वतः त्या मनुष्यास पुनः मठांत आणून मोक्षप्राप्तीचा हक्क कोणत्या सत्कृत्यानें यानें मिळविला आहे हें सर्व भिक्षूंसमक्ष सांगितलें. पूर्वीं एका जन्मी हा दरिद्री असल्यामुळें लांकडें जमविण्यासाठी अरण्य व टेकडयांमधून हिंडत असतां, एक वाघ याच्या अंगावर धावून आला. भीतिग्रस्त होऊन “बुद्धाचा उत्कर्ष होवो” असें हा मोठयानें म्हणाला. या शब्दांमुळें हा मनुष्य मोक्षाचा वांटेकरी होईल. स्वतः बुद्धानें त्याला भिक्षूची दीक्षा दिल्यावर लवकरच तो अईत्, झाला. [६८ व्या गोष्टींत खर्या महायानी बुद्धभक्तीचें उदाहरण आहे. बुद्धाच्या कृपेनें गौतमीला निर्वाण प्राप्ति झाल्यामुळें तिनें यथाविधी त्याची पूजा केली. मनुश्य व देव हेहि बुद्धची व बुद्धमातेचीहि पूजा करण्याकरितां लवकर आले.]
सूत्रालंकारांत बुद्धचरिताचा उल्लेख केलेला आहे, यावरून बुद्धचरितानंतर सूत्रालंकार झालें असावें असें अनुमान काढितां येतें. सूत्रालंकाराच्या (१४ व ३१) दोन कथानकांत कनिष्क राजाचा संबंध आहे. यावरून असें दिसतें कीं, हा ग्रंथ तयार झाला तेव्हां अश्वघोष वृद्ध असून त्या राजाच्या दरबारीं राहत असावा. आतांपर्यंत फक्त चिनी भाषांतराचीच आपल्याला माहिती आहे ही फार शोचनीय गोष्ट आहे. फक्त ग्रंथांतर्गत विषयामुळेंच हा ग्रंथ महत्त्वाचा आहे असें नाहीं, (लेव्ही म्हणतो त्याप्रमाणें, दोन भाषांतरांवरून याचें महत्त्व दृग्गोचर होतें ) तर महाभारत व रामायण या दोन आर्षकाव्यांतील उल्लेखांमुळें, सांख्य व वैशेषिकांच्या तात्त्विक मतांच्या निरसनामुळें, ब्राह्मण व जैन यांच्या धार्मिक मतांमुळें व लेखन, कला व चित्रकला इत्यादिकांच्या सर्व उल्लेखांमुळेंहि हा ग्रंथ महत्त्वाचा आहे प्राचीन हिंदी वाङ्मया व संस्कृति यांचा इतिहास समजून घेण्याकरितांहि हा ग्रंथ कम महत्त्वाचा नाहीं.
व ज्रा सू ची.— दुसरे कांही ग्रंथहि अश्वघोषानें केलेले आहेत किंवा नाहींत याबद्दल बर्याच सकारण शंका येण्यासारख्या आहेत ही फार दुःखाची गोष्ट आहे. ही गोष्ट विशेषतः वज्रसूचि ह्या ग्रंथाला लागू पडते. या लहानशा मनोरंजक ग्रंथांत ब्राह्मणांच्या जातींच्या कल्पनेचें फार सूक्ष्मपणानें खंडन केलें आहे. ग्रंथकारानें स्वतः ब्राह्मणांची बाजू घेऊन (व हें विशेष परिणामकारक आहे) त्यांच्या ग्रंथावरून, वेदांतील उतार्यावरूनस महाभारत व मनुस्मृति यातील उतार्यांवरून ब्राह्मणांच्या स्वतःच्या महत्त्वासंबंधीं कल्पना किती चुकीच्या आहेत हें सिद्ध क्रण्याचा त्यानें प्रयत्न केला आहे. एच्. हॉग्सन यानें इ. स. १८२९ त त्या ग्रंथांचें भाषंतर व एल. वुइलकिन्सन यानें इ.स. १८३९ त जेव्हा तो ग्रंथच प्रसिद्ध केला तेव्हा त्या ग्रंथांतसर्व दर्जाच्या लोकांची समता प्रतिपादिलेली पाहून व सुख, दुःख, जीवित सहजज्ञान, एकंदर रहाणी, जन्म, मृत्यु, भीति व प्रेम यांविषयी लोकांची समदृष्टि पाहून युरोपातील लोकसत्तात्मक भावनेमुळें त्यांनां फार कौतुक वाटले. या ग्रंथकर्त्याविषयीं व ग्रंथकालाविषयी आपल्याला जर कांही नक्की माहिती मिळेल तर ब्राह्मणी ग्रंथांतील उतार्यामुळेहि वाङमयाच्या इतिहासाला या ग्रंथाचा फार उपयोग होईल. अश्वघोषानें हा ग्रंथ केला हें दर्शविण्यासाठीं वज्रासूचीतींल उतार्याप्रमाणें मनुस्मृतीतींल उतारे देऊन सूत्रालंकारात (नं. ७७) ब्राह्मणांच्या चालीरीतीची माहिती सांगितलेली आहे.परंतु तिबेटी तंदचुर किंवा इात्सिंग यांनी वज्रसूचीची गणना अश्वघोषाच्या ग्रंथांत केलेली नाही. चार वेदाचे ज्यांमध्यें खंडण केलेलें आहे असें म्हणतात व ज्या ग्रंथाचें ९७३ पासून ९८१ पर्यंतच्या कालावधींत चिनी भाषेंत भाषांतर झालें तो वज्रासूची ग्रंथ धर्मकीर्तीनें (चिनी फा—शांग हें संस्कृत धर्मकीर्तीचें भाषांतर आहे.) लिहिला असें ब्यूनिओ नँजिओच्या चिनी त्रिपिटक ग्रंथसूचींत सांगितलेलें आहे.
जे इतर ग्रंथ अश्वघोषानें लिहिलें, असें चिनी, जपानी व तिबेटी लोक म्हणतात ते खरोखर त्यानें लिहिले किंवा नाहीं हें अगदी अनिश्चित आहे. महायानश्रद्धोत्पाद या ग्रंथामुळें महायानी-उपदेशक अशी अश्वघोषाची कीर्ति झालेली आहे. या तत्त्वज्ञानविषयक ग्रंथाचा अभ्यास महायानी मतें शिकण्यापूर्वी जपानमधील पाठशाला व मठ यांमध्यें केला जातो. लेव्ही म्हणतो, “बुद्धचरित्रकारानें आपण मोठे अध्यात्मशास्त्रवेत्ते आहोंत, व बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करणारें मत आपण पुनः सुरू करूं असें दर्शविलें आहे.” परंतु यांत निश्चित असें कांहीच नाहीं; या ग्रंथांत अश्वघोषानंतरच्या कालांतील मतें असल्यामुळें हा अश्वघोषाचा ग्रंथ असेल हें बरेच असंभवनीय दिसतें. परंतु जोपर्यंत त्या ग्रंथाच्या संस्कृत भागाची उणीव आपल्याला आहे, तोपर्यंत त्या ग्रंथाचा काल व कर्ता या विषयीचें निश्चितपणें विधान करितां येणें शक्य नाहीं. या ग्रंथाचें प्रथम चिनी भाषेंत इ. स. ५५४ व नंतर ७१० त भाषांतर झालें. दुसर्या भाषान्तरावरून तैतरो सुझुकी यानें इंग्लिशमध्यें भाषांतर केलें. अश्वघोषानें हा ग्रंथ लिहिला व त्यांनेच महायान पंथ स्थापिला असें सुझुकीचे मत आहे. तथापि असंगाचा विज्ञानवाद व लंकावतारांतील तथागतगर्भ व तथता हीं मतें त्या ग्रंथांत आहेत. प्रो. ताताकुसू यांच्या मतें अश्वघोषानें हा ग्रंथ लिहिला असणें अगदीं असंभवनीय आहे.चिनी ग्रंथांच्या जुन्या यादींत अश्वघोषाचें ग्रंथकारांत नांव नाहीं असें ताकाकुसूचें म्हणणें आहे.
श त पं चा श ति क.— इत्सिंगच्या मताप्रमाणें शतपंचाशतिकनामकस्तोत्र हे मातृचेत नांवाच्या कवीनें लिहिलेंले आहे, परंतु हेहि अश्वघोषानेंच लिहिले असें तँदचुरमध्यें म्हटले आहे. या मातृचेताची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे असें इात्सिंगास वाटतें; मातृचते हा अश्वघोषाच्याच पंथापैकी असल्यामुळें त्या दोघांबद्दल घोटाळा उत्पन्न होतो. तिबेटी इतिहासकार तारानाथ याच्या मताप्रमाणें मातृचते हें फक्त अश्वघोषाचें दुसरे नाव आहे. महाराजकनिक-लेख या ग्रंथाचा कर्ता मतिचित्र व मातृचते हे एकच आहेत, असें एक मत आहे पण विंटरनिझ यांस असे वाटत नाहीं. या मातृचेताचें दीडशें श्लोकाचें स्तोत्र किंवा भिक्षूंच्या समुदायामध्यें म्हटले जाणारे चारशें श्लोकाचें स्तोत्र ऐकून फार आल्हाद होतो असें इत्सिंग म्हणतो. या रम्य ग्रंथाचे सौंदर्य दिव्यपुष्पांच्या सौंदर्यासारखे असून यांतील उच्च तत्त्वें पर्वतांच्या शिखरांशी स्पर्धा करणारीं आहेत, म्हणून त्याला वाङ्मयाचा उत्पादक समजून हिंदुस्थानांतील सर्व कवी त्याच्या लेखनपद्धतीचें अनुकरण करितात. बोधिसत्त्व असंग व वसुबन्धु यासारखे लोकदेखील त्याची फार स्तुती करितात. दहा पांच सूत्रें येऊं लागतांच हिंदुस्थानांतील प्रत्येक भिक्षु मातृचेताची स्तोत्रें शिकतो. पूर्ण जन्मीं तो बुलबुल पक्षी असून त्यानें मधूर गीताच्या योगानें बुद्धाची स्तुती केली होती असें त्या गोष्टींत सांगितलेलें आहे. दीडशे श्लोकांच्या स्तोत्राचें चिनी भाषेंत इात्सिंगनें स्वतः भाषांतर केलें आहे. परंतु आता मातृचेताच्या मूळ संस्कृत स्तोत्रांचा कांहीं भाग मध्य आशियांत सापडला आहे व ज्याचे आपण फार ॠणी आहोंत, त्या टर्फानच्या हस्तलिखित भागावरून डब्ल्यूसिजलिंग यानें सुमार दोन तृतीयांश ग्रंथाची उत्तम प्रकारें पुनर्रचना केली आहे. त्या श्लोकांत अतिशयोक्ती नसून ते खुबीदार काव्यपद्धतीनें लिहिलेले आहेत.
सा रि पु त्र प्र क र ण.— हिंदुस्थानामध्यें नाटकाच्या लेखनास प्रथमतः केव्हां सुरूवात झाली हें खात्रीपूर्वक अद्यापि सांगतां येत नाहीं. आतापर्यंतच्या माहितीवरून, महायान पंथाचा आचार्य अश्वघोष हा सर्वांत प्राचीन नाटककार असावा असें दिसतें. त्याच्या नांवावर जी काहीं नाटकें प्रसिद्ध आहेत ती पाहिली असतां त्यांमध्यें ज्या काहीं ठराविक गोष्टी दृष्टीस पडतात त्यांवरून त्याच्याहि अगोदर कांही नाटककार असावेत असें अनुमान निघते. उदाहरणार्थ त्याच्या नाटकांतहि जें विदूषकाचें पात्र दृष्टीस पडतें त्यावरून विदूषक हा नाटकांतला आवश्यक भाग म्हणून ठरला गेला असावा आणि तसेंच नाटकांचा प्रकर व बाह्यांगे हीहि बरींच पूर्वी ठरून त्याला रूढीचें स्वरूप आलेलें होतें असें अनुमान काढावें लागतें. तरी पण नाटयकलेचा खराखुरा आरंभ याच्या फार पूर्वीं झाला असें कांहीं म्हणतां यावयाचें नाहीं. कारण याच्या ठराविक पद्धतीच्या नाटकांवरून नाटयकला ही नुकतीच लोकांमध्यें वावरूं लागली होती व अद्यापि तिला स्वतंत्र विकास पावण्याची स्थिति आली नव्हती असें दिसतें.
अश्वघोषानें ‘सारिपुत्रप्रकरण’ या नांवाचें नवांकी नाटक लिहिलें, व त्यामध्यें बुद्धशिष्य सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांच्या धर्मप्रवेशाबद्दलच्या कंडयावर सणसणीत टीका केली हें मात्र निःसंशय खरें आहे. या नाटकांचे फुटकळ हस्तलिखित भाग ‘कुशन’ काळचे असून ते टुर्फान येथें सांपडले व लूडर्सनें प्रसिद्ध केलें.
[सं द र्भ ग्रं थ.— विटंरनिझ— हिस्टरी ऑफ इंडियनू लिटरेचर पु. २. हा जर्मन ग्रंथ फार अमूल्य व पांडित्यदर्शक असा आहे. स्टीनकनो—इंडियन ड्रामा (जर्मन). जे. आर. ए. एस्. (१९१२—१५) मधील लेख. एन्सायक्को. रिलि. अँड एथिक्स कोशांतील आनासाकीचा अश्वघोषावरील निबंध अश्वघोषाचे बुद्धचरितादि ग्रंथ. नजिओ— कॅटॅलॉग ऑफ दि चायनीज बुद्धिस्ट बुक्स.]