विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अहीर - शेतकर्यांची व गौळ्यांची एक मोठी जात. लोकसंख्या १९११ सालीं ९५०८४८६ होती; त्यांत बरेचसे (म्हणजे ९४७४८०५) हिंदू होते. बिहार ओरिसा व संयुक्तप्रांत यांत अहिरांची मोठी संख्या असून, बाकीच्या बहुतेक सर्व प्रांतातून थोडेथोडे आढळतात. सिंधु खोर्यांतील आभीर व इ. स. पू. १ ल्या किंवा २ र्या शतकांत हिंदुस्थानांत आलेले सिथियन अरब यांचा अहीरांशीं संबंध जुळविण्यांत येतो. उत्तर हिंदुस्थानांत मथुरा क्षेत्राशीं यांच्या परंपरेचा संबंध पोहोंचतो व यांच्यांतील य (ज) दुबन्सी ही पोट जात आपल्याला यादव वंशांतील लेखिते. दुसरी एक संयुक्त प्रांतांतील नंदबन्सी जात व बंगालमधील नंदघोष नंदाला आपला पूर्वज समजतात.
इ ति हा स.-ख्रिस्ती शतकाच्या सुमारास मध्य आशियांतून आलेल्या लोकांपैकीं आभीर व हे एक असावेत. महाभारत आणि पुराणें यांतून यांचा उल्लेख दस्यु असा आढळतो. कधीं कधीं त्यांस म्लेछ असेंहि म्हटलेलें आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामास गेल्यावर द्वारकेहून कृष्णाच्या स्त्रियांस अर्जुन हस्तिनापुरास नेत असतां वाटेंत आभीरांनीं त्या हिरावून नेल्या. शके १०२ म्हणजे ख्रिस्ताब्द १८० च्या सुमारास सांपडलेल्या एका शिलालेखावरून गुजराथेंतील सुंड संस्थानाच्या सेनापतीचा उल्लेख आभीर म्हणून केला आहे.
नाशिक लेण्यांतील शिलालेखांत एका आभीर राजाचें वर्णन आहे. ('आभीर पहा') एंथेविन यानें त्याचा काल ख्रिस्ती चवथे शतक असा ठरविला आहे. आंध्रमृत्यांनंतर दक्षिण (प्रांत) आभीरांच्या ताब्यांत होती असें पुराणांत सांगितलें असून तापीपासून देवगडापर्यंत असणार्या भागास आभीर ही संज्ञा होती. समुद्रगुप्ताच्या वेळीं अभीरांनीं पूर्व राजपुतान्यांत आणि माळव्यांत वस्ती केली. काठी लोक गुजराथेंत आठव्या शतकांत आले तेव्हां बराच भाग अहीरलोकांच्या ताब्यांत असलेला त्यांस आढळला. मिर्झापूर जिल्ह्यांतील एका भागास अहरौरा असें नांव आहे आणि झांशीजवळ असलेल्या एका भागास अहीरवाड असें म्हणतात. ख्रिस्ती शतकारंभाच्या सुमारास अहीर नेपाळचे राजे होते, असें इलियट म्हणतो. खानदेशांतहि अहीरांच्या वसाहती महत्त्वाच्या होत्या. अशीरगड किल्ला पंधराव्या शतकांत आसा अहीराने बांधला असें म्हणतात. त्याच्या पूर्वजांची वस्ती तेथें ७०० वर्षांपासून होती आणि त्याच्या जवळ खुद्द १०००० गुरें, २०००० मेंढया, १००० घोड्या व २००० सैन्य असूनहि आसा या साध्या नांवानेंच तो लोकांत ओळखला जाई. त्याच्या उदारपणामुळें तो फार लोकप्रिय झाला होता. अशीरगडविषयींच्या दंतकथांत अतिशयोक्ति असण्याचाहि संभव आहे. ११ व्या (ख्रिस्ती) शतकांत टाक आणि चव्हाण रजपुतांच्या ताब्यांत हा कित्ता अशीर किंवा अहीर या नांवानेंच होता. फिरस्ता यानेंहि अशीरगड हा अहीरानें बांधलेला आहे अशी माहिती आपल्या पुस्तकांत दिली आहे. तापीनदीच्या खोर्यांत असलेल्या एखाद्या अहीर संस्थानिकाच्या नांवावरून या किल्ल्याच्या नांवाचा त्याच्या लोकांशीं सबंध जुळवून देणेंहि संभवनीय आहे.
मध्य प्रांतांत गौळी राजांच्या वैभवाच्या दंतकथा बर्याच चालत आल्या आहेत. छिंदवाड्यांतील देवगड किल्ला हा एका दंतकथेच्या आधारें पाहातां सोळाव्या शतकांपर्यंत गवळी राजांच्या ताब्यांत होता व त्यापासून नंतर तो गोंडांनीं घेतला. देवगड गोंड जातीचा मूळ पुरुष जातवा यानें मनसुर आणि गणसुर या गवळी राजांची नौकरी धरली आणि देवीच्या प्रसादानें त्यांचा वध करून स्वत: त्यांच्या जागीं राजा झाला. त्यानंतर कांहीं वर्षें गवळ्यांच्या ताब्यांत नरनाळा किल्ला होता आणि पुढें तो मुसुलमानांनीं घेतला. सातपुड्याच्या दक्षिणेकडील एका शिखरावर गाविलगड नांवाचा किल्ला आहे, सागर जिल्ह्यांत प्रचलित असलेल्या दंतकथांवरून इटावा आणि खुरई येथें ख्रिस्ती शकाच्या सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गवळी राजे होते.
अ ही र भा षा.-अहीर किंवा अभीर भाषेपासून निघालेल्या पोट भाषा अद्याप कायम आहेत. पंजाबांत रोहटक, व गुरगांव आणि दिल्लीच्या भोंवतीं अहीस्वती भाषा अद्याप बोलतात. राजपुतान्यांतील मेवानी भाषेचाच हा एक पोटभेद आहे. राजस्थानीच्या मालवी पोटभेदाचेंहि नांव अहीरी आहे. आणि खानदेशीं म्हणून गुजराथी भाषेचा जो पोटभेद भील भाषेच्या अर्धवट मिश्रणानें तयार झाल आहे त्याला 'अहीराणी' भाषा म्हणतात ('अहीराणी भाषा' पहा)
या जातीचा आणि पुराणांतील यादव जातीचा कांही संबंध नाहीं असें शोधांतीं ठरतें. भागवतांत नंद किंवा गोप यांच्या संबंधानें अभीर किंवा अहीर शब्द कोठें वापरलेला नाहीं. ख्रिस्ती शकाच्या ५५० सालीं कृष्णकथांचा आणि अहीर शब्दांचा संबंध जोडून दिल्याचा उल्लेख प्रथम सापडतों यावरून या सालाच्या थोड्या अगोदर हा संबंध कोणीं तरी जुळविला असावा. गुजर आणि शक याप्रमाणेंच हे लोक बाहेरून आले आहेत. आणि पूर्वीं आलेल्या ''आर्यन्'' लोकांप्रमाणें शेतकीचा धंदा न करितां यांनीं गुरें पाळण्याचा धंदा केला व त्या धंद्याचें महत्त्व वाढविण्याकरितां कृष्णाशीं व यादवांशी संबंध जोडला असावा.
सध्याचे अहीर जातींचे लोक अभीरांपासून जन्मले असून वेळोवेळीं देश्य जातींच्या मिश्रणानें वाढत गेले. डाल्टन म्हणतो कीं मधुरावंशीं ग्वाल उंच असून त्यांचा चेहरा कोवळा व रेखीव असतों. त्यांचा रंग गव्हासारखा असतो. मगधांतील एका पोट जातीचा रंग काळा असून हात पाय फार मोठे, चेहरा ओबडधोबड आणि गांवढळ असतो. मध्य प्रांतांतील अहीर लोक गोंड आणि इतर जातींच्या मिश्रणानें तयार झाले आहेत. चांद्यांतील गोवारी लोक गोंड आणि अहीरापासून झाले आहेत. मंडल्यांतील कोवरा अहीर हे अहीर आणि गोंड किंवा कवारांपासून झालेले आहेत असें रसेल आणि हिरालाल म्हणतात.
हिंदुस्थानांत निरनिराळ्या प्रांतांत असलेल्या अहीरांची माहिती पुढें देत आहों.
बं गा ल.- बंगालमध्यें गोआला (संस्कृत गोपाल) या नांवानें ही जात ओळखिली जात असून, तिच्या उत्पतिकथेवरून कृष्णभक्ति या लोकांत विशेष दिसते. चैतन्याच्या वैष्णवपंथापेक्षा हा वैष्णवपंथ खालच्या दर्जाचा आहे. यांच्यांत गोवर्धनपूजा नांवाचा सण असून, त्या दिवशीं शिजविलेल्या भाताच्या राशीला गोवर्धन पर्वत समजून त्याची प्रार्थना करितात व आपल्या जवळच्या गायींनां अन्न, शेंदूर व फुलें अर्पण करितात. दुसर्या कांही ठिकाणीं शेणाचा कृष्ण करून त्याची पूजा करितात. याहून जास्त रानटी चाल म्हणजे दिवाळींत डुकराचे चारहि पाय बांधून त्याचा जीव जाईपर्यंत त्याच्या अंगावरून गुरें नेतात; नंतर त्याचें मांस शिजवून तें शेतांत बसून खातात; इतर वेळीं मात्र डुकराचें मांस खाण्यास परवानगी नसते.
पश्चिम बंगालमध्यें वीर लोरिक व काशीबाबा किंवा काशीनाथ यांच्याविषयीं विशेष आदर दाखविला जातो. काशीबाबा हें खून केलेल्या एका ब्राह्मणाचें भूत असून , जर त्याची पूजाअर्चा केली नाहीं तर तो गुरांच्या ठिकाणीं रोग उत्पन्न करितो. प्लेगचा प्रादुर्भाव झाल्यास खेड्यांतील गुरें एकत्र जमवून, त्यांच्यावर सरक्या फेंकितात; सर्वांत जास्त लठ्ठ असें जनावर निवडून त्याला दांडक्यांनीं अतिशय मारतात; त्याची आरडाओरड ऐकून बाकीचीं जनावरें भांबावून शेजारच्या गोठ्यांत पळतात व मागून हा बळी म्हणून निवडलेला बैल तिकडे पळतो व अशा रीतीनें ही सांथ थांबविल्याचें मानितात.
सं यु क्त प्रां त.- या जातींतील लोक कांहीं वैष्णव तर कांहीं शैव असतात. वैष्णव अहीर कृष्णाची उपासना व शैव शिवाची किंवा शिवपत्नीच्या अनेक स्वरुपांपैकीं एका स्वरुपाची – बहुधां विंध्यवासिनी देवीची उपासना करितात. साहाररपुराणांत विवाहाधिष्ठात्री दोन देवता आहेत. एक ब्रह्मदेवता व दुसरी वटदेवता. लाग्नाच्या दिवशीं सोनार सोन्याची ब्रह्मदेवता घडवून आणतो. लाग्नांतील प्रधानविधि झाल्यानंतर नवरानवरी या मूर्तीनां चंदन, धूप, दीप, फुलें, अर्पून नैवेद्य दाखवितात. नंतर घरांतील बायका ही मूर्ति स्वयंपाकघरांत पुरतात व त्यावर एक मातीचा ओटा घालतात. रोज याची पूजा होते व सणाच्या दिवशीं याला पक्वांनाचा नैवेद्य करितात घरांत दुसरें लग्न निघेपर्यंत हें चालतें; नंतर हा ओटा उकरून त्यांतील जुनी मूर्ति काढून त्या जागीं नवी बसवितात. ब्रह्मोपासना हल्ली प्रचारांत नाहीं; पण ती या लोकांत असलेली पाहून नवल वाटतें. वटवृक्षाची पूजा ही वृक्षविवाहाच्या चालीशीं निकट संबंध दाखविते. अहीरांत नवरा मुलगा नवरीच्या भांगांत कुंकू भरतो त्यावेळींच वटवृक्षाला कुंकू वाहातो.
पांचोनपीर व दुसर्या अनेक स्थानिक देवांची हे लोक पूजा करितात. यांचीं विशिष्ट गोदेवता वीरनाथ होय. हा पांच लांकडी मूर्तीचा समूह असतो.
म ध्य प्रां त.-(नांवें):-गवळी, ग्वाला, गोलकर, ग्वालान, रावत, गहर, महाकुल इत्यादि.
संख्या .-(सन १९११)७५०००० मध्यप्रांतात संख्येच्या मानाने या जातीचा सहावा नंबर आहे. ही जात मराठी जिल्ह्यांतील गवारीपासून भिन्न आहे. पण गवारी जातीची १५०००० संख्या ही त्यांत मिळविली तर तेली जातीपेक्षां त्यांचा नंबर वर लागून ५ वा होईल.
व्यत्पत्ति.-अहीर नांव अभीर नांवापासून निघालें आहे. अभीर जातीचा उल्लेख शिलालेखांत आणि धर्म पुस्तकांतून कोठें कोठें सांपडतो. ग्वाला शब्द गोपाल शब्दापासून निघाला आहे. गवळी हा शब्द मध्यप्रांतांत दुभत्याचा धंदा करणार्यासच लावितात, गुरें रानांत नेणार्यास लावीत नाहींत. चांदा जिल्ह्यांतील गोलकर शब्द (तेलगु गोलार म्हणजे गुरें चारण्यास नेणारा) या शब्दापासून निघाला असावा राउत शब्द राजपुत्र शब्दाचा अपभ्रंश असावा. छत्तीसगडांतील अहीर लोक स्वत:ला राउत म्हणवितात. उडिया मुलुखांत यांस शहर म्हणतात. जशपुर संस्थानांत सांपडणार्या एका अहीर जातीचें नांव महाकुल असें आहे. हे लोक स्वत:स नंदवंशीं समजतात. उत्तर हिंदुस्थानांत यांच्या तीन जाती आहेत. यदुवंशी, नंदवंशी आणि गोवालवंशी. मंडल्यांतील कावनार आणि जबलपुरांतील कमरिया हे स्वत:ला नंदवंशी म्हणवितात. कांहीं आपणांस जिझोटिया ( बुंदेलखंडी ) म्हणवितात. भारोतिया व नखरिया या जातीहि आहेत. छत्तीस गडांतील राउतांचे झाडिया, कोसारिया हे सर्वांत जुनें आहेत (कोसल हे छत्तीसगडाचें जुनें नांव आहे असा रसेल व हिरालाल यांचा तर्क आहे.). कनोजियांपैकीं येथंवार नांवाचे लोक स्वत:स फार उच्च समजतात. आणि यांनां नौकर ठेविलें तर उष्टी ते भांडीं घाशीत नाहींत.
दौवा लोक बुंदेले रजपूत आणि अहीर बायकांपासून झाले आहेत. बुंदेल्या रजपुतानें ठेविलेल्या अहीर स्त्रीला 'परद्वारीण' म्हणतात. अहीर बायांनां रजपूत लोक घरांत दाई म्हणून ठेवीत आणि त्यांच्या मुलांत आणि दूध पाजलेल्या मुलांत बंधुप्रेम फार दृढ असे.
यांत रघुवंशी म्हणून एक जातं आहे. झाडी अहीराप्रमाणेंच 'रान्य' अहीर हें देखील एका जातीचें नांव आहे.
सगोत्रविवाह आणि चुलत बहिणी, मामेबहिणी, आतेबहिणी व मावसबहिणीबरोबर विवाह निषिद्ध आहे. बायकोच्या वडील बहिणीबरोबर लग्न निषिद्ध आहे. परंतु धाकट्या बहिणीबरोबर निषिद्ध नाहीं.
ल ग्नें.-मुलींचीं लग्नें रजोदर्शनापूर्वीं किंवा मागाहून झालीं तरी चालतात. चंद्रपूरचे गोलकर मात्र बालविवाह करतात. कावनार अहीर मात्र रजोदर्शनापूर्वीं लग्नें करीत नाहींत. जातीतल्याच माणसापासून कोणी अविवाहित मुलगी गर्भार राहिली तर पंचायतीच्यामार्फत त्यांचें लग्न होतें आणि २० किंवा ३० रुपये पंचायतीचा दंड भरावा लागतो. तो खर्च पंच करतात. विजातीयानें जर एखादी अहीर मुलगी फसवली तर ती त्यासच देतात आणि शक्य असल्यास त्याच्यापासून ४० ते ५० रुपये दंड घेऊन तो मुलीच्या बापास देतात. स्थानिक विवाहपद्धतीप्रमाणें लग्नें लावतात.
कांवरा झाडिया, कोसरिया, व राऊत लोक 'लगुन' लिहिण्याकरितांच ब्राह्मणांस बोलवितात आणि सवासिन (वधुवरांचे नातलग) त्यांचीं लग्नें लावितात. छत्तीस गडांत वराला मुलीला पोषक करून लग्नाकरितां मिरवणुकीबरोबर वधूगृहीं नेतात.
विधवाविवाहाची पूर्ण मोकळीक आहे. प्रथम वरास विधवेबरोबरच विवाह करावयाचा असल्यास पहिल्यानें कट्यारीबरोबर विधि करावा लागतो. मृत नवर्याच्या धाकट्या भावाबरोबर विवाह चांगला समजतात. घटस्फोटाची पूर्ण मुभा आहे. हुशंगाबाद जिल्ह्यांत घटस्फोट करतांना नवरा बायकोच्या अंगावरील वस्त्रांच्या लहान चिंध्या फाडतात आणि लग्नाच्या वेळीं बांधलेली गांठ सोडिली असें दर्शवितात.
जन्म विधि:-हे लोक गर्भार स्त्रियांचे डोहाळे पुरवितात. त्यांच्या डोहाळ्यांतील खाण्याच्या पदार्थांस शिधोरी म्हणतात. कोणा गर्भिणीस तीन मुलें किंवा ३ मुली लागोपाठ झाल्यास चौथे मूलहि तीघां भावंडाप्रमाणें मुलगा किंवा मुलगीच व्हावी असें इच्छितात. परंतु जर तसें न झालें तर त्या मुलास किंवा मुलीस अभागी समजतात. एकाच दिवशीं एका गावांत एकाच दिशेला दोन स्त्रियांस मुलगा आणि मुलगी होऊन त्या एकाच सुइणीच्या देखरेखींखालीं असल्या तर सुइणीच्या द्वारें दोघां मुलांस संपर्क होऊन ते आजारी पडतील असें समजतात. आणि रोग टाळण्याकरितां मुलांचा मामा तराजू घेऊन एका पारड्यांत मुलास ठेवितो व शेणाच्या गोळयांनीं त्यांचें वजन करतो. आणि शेणाची टोपली गावांबाहेर चौरस्त्यावर ठेवितो. मुलाचा जन्म जर अशुभ तिथी वर किंवा नक्षत्रावर झाला तर त्याचे कान ५व्या महिन्यांत टोंचले म्हणजे झालें.
प्रेत संस्कार:-पुरणें किंवा दहन करणें या दोन्ही चाली प्रचारांत आहेत. छत्तीस गडांत मेलेल्याचा प्राण तिसर्या दिवशीं परत आणण्याचा एक विधि आहे. रात्रीं तळ्याच्या काठीं बायकांनीं एक दिवा ठेवावा आणि त्याच्या जवळ आलेल्यांतून एक मासा धरून घरीं आणावा आणि कणकीच्या गोळा त्याजवळ ठेवावा. मृताचा मुलगा किंवा जवळचा कोणी नातलग यानें अंगाला हळद लावून एक खडा उचलावा. तो पाण्यानें धुवून भांडयांत टाकावा आणि मृत माणूस स्त्री किंवा पुरुष असेल त्याप्रमाणें कोंबडी किंवा कोंबडा बळी द्यावा. त्या खड्याची गृहदेवतेप्रमाणें पूजा करावी. आणि प्रत्येक वर्षीं कोंबडा किंवा कोंबडी बळी देत जावा. अशा रीतीनें माशाच्या अंगांतून मृताचा प्राण घरांत येऊन तो खड्यांत प्रविष्ट झाला असें समजतात.
अहीर लोक गाईस पवित्र समजतात. ते कृष्णाची पूजा करतात. नर्मदा खोर्यांतील लोक भिलाट नांवाच्या एका काल्पनिक देवाची फार भक्ति करतात. भिलाट हा एका अहीर स्त्रीस महादेवापासून झालेला मुलगा होय अशी समजूत आहे त्याच्या आंगात फारच अलौकिक सामर्थ्य होतें. इंदुरांतील गवळी सिंगाजीस भजतात. मंडल्यांत महिषी देवाच्या नांवानें एक चौथरा बांधतात. खडकदेव ही एक त्यांचीच देवता आहे. मतरदेव हा लेखणीचा आणि रानांत केलेल्या गाईंच्या कोंडवाड्याचा देव आहे. गुरयादेव हा गाईच्या गोठ्याचा देव आहे. त्यास प्रत्येक वर्षी एक अंडें अर्पण केल्यानें गुरास रोगराई होत नाहीं. अहीरांचा आवडता साधु हरिदास बाबा म्हणून आहे. त्यानें प्राण शरीरांतून काढून शरीर एका अहीराजवळ ठेविलें होतें. तो बरेच दिवस परत आला नाहीं म्हणून शरीराचें दहन केलें. तो आल्यानंतर लोकांस चूक समजली आणि तिच्या प्रायश्चिताबद्दल त्याची पूजा करण्याचें ठरविलें. महाकुल अहीर महादेवाची पूजा करतात, तसेंच पांडवांपैकीं सहदेवाचीं, आणि लक्ष्मीची पूजाहि करतात.
दिवाळी हा अहीरांचा मुख्य सण आहे. ते या दिवसांत मातीचा एक गोवर्धन पर्वत करतात. याच दिवसांत त्यांचा मारहाई सण असतो. एका खांबाभोंवतीं कवड्या आणि मोराचीं पिसें बांधून हे लोक गांवांतून नाचत व गात जातात. बायका या खांबावर एक मातीचा पोपट बसवून घरोघर जाऊन गातात व तांदूळ आणि पैसे गोळा करतात.
चालीरीति:-हे लोक कोंबडी आणि बकर्यांचें मांस खात नाहींत. मंडल्यांतील 'काओनेरा'' अहीर डुकरांचें मांस खातात आणि राऊत लोक उंदीर देखील खातात. काओनेरा अहीर विटाळशीचा विटाळ मानतात. जातिबहिष्कार, प्रायश्चित्त आणि शुद्धीकरणाचा विधि पंचाईतीकडून व्हावा लागतो.
छत्तीसगडांतील राउत बायका पायांत कांशाचे ''वाळे'' घालतात. हे अवजड असतात. त्यांचें वजन अदमासे ४ ते ५ शेर असतें आणि त्यांना अजमासें ३ ते ९ रुपये किंमत पडते.
धंदा:-गुरें पाळणें हाच त्यांचा मुख्य धंदा आहे. साधारणत: शेंकडा चार लोक घरकामी नौकर्याहि करितात.
मुं ब ई इ ला खा-खानदेश, नाशिक, कच्छ, काठेवाड व पालनपून या भागांत अहीर लोक आहेत. आपण कृष्णाच्या गोपांपैकीं असून मथुरेस रहात होतों असें ते सांगतात परंतु हे लोक मूळचे अर्नाय जरी नसले तरी हिंदू नव्हते असें मुंबई एथ्रॉग्राफिक सर्व्हेकरांनीं मत व्यक्त केलें आहे. पुढें कांहीं वर्षांनीं ते हिंदु धर्मांत आले असावे. चवथ्या शतकांत अहीर लोकांचें राज्य खानदेश, नाशिक, काठेवाड पालनपूर व कच्छ या प्रांतांत होतें, याबद्दल बळकट पुरावा आहे. काठी लोक गुजराथेंत ८व्या शतकांत गेले. तेव्हां बहुतेक मुलुख अहीर लोकांच्या ताब्यांत होता. त्याचप्रमाणें खानदेशांत अहीर लोकांचें बरेंच वर्चस्व असावें कारण असि(शि) रगड नांवाचा किल्ला ''असा अहीर'' यानें बांधला व त्यानें आपलें नांव त्या किल्ल्यास दिलें असें फेरिस्त्याचें मत आहे ही गोष्ट वर सांगितलीच आहे. रहाण्याच्या स्थानभेदावरून अहीर लोकांचे दोन विभाग आहेत:-कच्छ व काठेवाड यांमध्यें रहाणारे आणि दक्षिण हिंदुस्थानांत रहाणारे. पहिल्या वर्गानें गुराख्यांचा धंदा सोडून सुतारकाम व शेतकी हे धंदे हाती घेतले आहेत व कांहीं जमीनदारहि आहेत. या लोकांत बोरिहा, चोरिडा, माचूआ, प्रांथालिया व सोरठिया असे पांच पोटभेद असून, एका पोटभेदांतील लोक दुसर्या पोटभेदांतील लोकाशीं विवाहसंबंध करीत नाहींत. याखेरीज गुजर अहीर व नेसक अहीर हे दोन फक्त काठेवाड प्रांतांत जास्त आहेत. मुलामुलींचीं लग्नें १२-१५ वर्षांपर्यंत होतात. दरवर्षीं, ठरलेल्या दिवशींच विवाह होतात. परजिया नांवाचे हीन ब्राह्मण ह्या लोकांचे उपाध्ये होत. विधवेला लहान दिराशीं लग्न लावितां येतें. हे लोक मांसाहारी आहेत. तुळशीश्याम (लक्ष्मीं व कृष्ण) व मातादेवी ह्या देवतांची हे पूजा करितात. त्याचप्रमाणें हब्बे ही देवता व वचरा या रजपूत साधूचेहि ते उपासक आहेत.
काठेवाडमध्यें अहीर लोकांची प्रत्येक खेड्यांत एक पंचायत असते. व हींत सामाजिक बाबींचा निकाल होतो. जातीसंबंधीं महत्त्वाच्या प्रश्नांचा निकाल वाकोडी जादा पंचायतीच्या सभेंत केला जातो.
दक्षिण हिंदुस्थानांतील अहीर लोकांनीं आपला धंदा फारसा बदललेला नाहीं. येथील अहीर लोकांत (१) भरवथिया (२) धिदांवर, (३) घोसी, (४) गोळबन, (५) गुजर, (६) रोमाबन, असे सहा पोटभेद आहेत; या पोटभेदांत परस्पर बेटीव्यवहार होतो. परंतु ज्यांचें दैवक एकच असेल त्यांचा विवाहसंबंध होत नाहीं. मुलांचीं लग्नें २०-२५ या वयांत होतात. पुनर्विवाहाची चाल आहे, परंतु तरुण विधवेस बहुतकरून आपल्या धाकट्या दिराशीं लग्न लावावें लागतें. या लोकांत काडीमोड होऊं शकत नाहीं. हे लोक मांसाहारी आहेत. उत्तरहिंदुस्थानी व महाराष्ट्रीय ब्राह्मणांच्या हातचें ते खातात, परंतु मराठ्यांच्या हातचें खात नाहींत. बाप जिवंत असतां मुलाचा वडिलोपार्जित मालमत्तेवर कांहीं हक्क नसता, त्याचप्रमाणें आई वारल्यावर तिच्या पैशावर मुलीचा कांहीं हक्क नसतो तो पैसा तिच्या सुनांकडे जातो. कच्छी व काठेवाडी अहीरांप्रमाणेंच हे अहीर कृष्णाचे भक्त आहेत. लग्नसमारंभांत पंडे (हिंदुस्थानी ब्राह्मण) यांचें उपाध्येपणं करतात. परंतु त्यांच्या अभावी दक्षिणी ब्राह्मण चालतो. मृतांस दहन करतात. भाद्रपद महिन्यांत कोणत्या तरी दिवशीं श्राद्धे करतात.
पं जा ब-लोकसंख्या (१९११) २०८५९४. हे बहुतकरून शेतकरी व गुराखी आहेत. ते हिंदु असून दिल्ली भागांत, फेरोजपूर जिल्ह्यांत व दुजाना, पटौडी आणि फुलकियन या संस्थानांत आढळतात. त्यांचा सामाजिक दर्जा गुजर व जाट लोकांसारखा आहे. त्यांच्या मालकीच्या जमिनी असून दिल्ली भागांत (सिमला सोडून) व शाहपूर, मिआनवाली व मुलतान या जिल्ह्यांत ते शेतकरी आहेत. ते सैन्यांत सुद्धां चाकरी करतात. जदुबन्सी व नंदबन्सी लोक हे आपणास रजपुतांचे वंशज म्हणवितात. ते गावलबन्सी लोकांकडून आपण भिन्न आहों असें दशर्वितात.
रा ष्ट्र वि घ ट ना.-आमीर, पांचाल हीं जुनीं राष्ट्रें, त्यांचें अस्तित्व राष्ट्र या रूपानें नष्ट झाल्यानंतर त्यांची कशी स्थिति होते, हें जाणण्यास अहिरांचें उदाहरण पहाण्यासारखें आहे.
अहीर हे अनेक धंदेवाईक जातींत मिसळून त्यांतच पोटजात होऊन राहिले आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रांत अहीर सोनार, अहीर हलवाई, अहीर गवळी अशा तर्हेच्यां सोनार, हलवाई, गवळी या जातींतून पोटजाती आढळतात. ज्या वेळीं विशिष्ट जातींत स्वतंत्र पोटजात होण्याइतके अहीर गेले नसतील त्यावेळीं त्या जातींत विशिष्ट घराणीं म्हणून ते समाविष्ट झाले असावेत. जसें, ओतार्यामध्यें अहीर ही पोटजात नसून एक कुल अगर आडनांव म्हणून आहे. अहीर हे निरनिराळ्या ठिकाणच्या समाजांत कसे अंतर्भूत झाले हें यावरून कळून येणार आहे. अशीं उदाहरणें नजरेस आल्यानंतर जाति, आणि पोटजाती यांचा अभ्यास करूं लागलों म्हणजे असा प्रश्न उपस्थित होतो कीं, विशिष्ट धंद्याची जात प्रधान धरून अहीर, पांचाल या पोटजाती धरणें योग्य होईल कीं, अहीर ही प्रधान जात धरून अहीर गवळी, अहीर सोनार, अहीर हलवाई अशा पोटजाती धरणें योग्य होईल. या प्रश्नाचें विवेचन ''जाति'' या लेखांत येईल. येथें फक्त ही स्थिति नजरेस आणणें पुरें होईल.
अ हि रा णी भा षा-खानदेशांत पांढरपेशे लोक शिवायकरून बाकीचे लोक खानदेशी किंवा अहिराणी भाषा बोलतात. ही भाषा गुजराथी, मराठी, नेमाडी व हिंदुस्थानी या चार भाषा मिळून झालेली आहे, असा लोकांचा समज आहे. गुजराथच्या पश्चिमकिनार्याजवळ राहणारे जे अभीर लोक अभीरी भाषा बोलत असत, व जिचा उल्लेख प्राकृत वैय्याकरणांनीं केला आहे, तिच्यावरूनच ही अहिराणी भाषा निघाली असावी, असा डॉ. भांडारकर यांचा तर्क आहे. भाषाशास्त्राचा अभ्यास करण्यास ती भाषा फार उपयोगाची आहे. या भाषेची थोडीशी माहिती पुढें दिली आहे.
खानदेशी अथवा अहिराणी भाषा जरी गुजराथीसारखी किंवा मराठीसारखी दिसते, तरी ती मागधी, सौराष्ट्री, शौरसेनी, महाराष्ट्री, पैशाची इत्यादि प्राकृत भाषांपासूनच निघाली आहे. ह्या भाषेंत 'ळ' हें अक्षर मुळींच नसून त्याच्या ऐवजीं 'य' हें अक्षर येतें; जसें:-'काळा' असें म्हणण्याचे ऐवजीं 'काया' असें म्हणतात. त्या भाषेंतील व्याकरणाचीं रूपें साधारणपणें गुजराथी-किंवा मराठी-प्रमाणेंच आहेत; पण नामांचीं व क्रियापदांचीं रूपें हीं मात्र वरील दोन भाषांपेक्षां भिन्न आहेत. नामांचें बहुवचन करावयाचें झाल्यास नामांच्या शेवटीं 'स' हा प्रयत्य लागतो. जसें-भित (भिंत:) ह्याचें बहुवचन 'भितस' (भिंतीस) असें होतें. विभक्तींचे निरनिराळे प्रत्यय आहेत. द्वितीया व चतुर्थी या विभक्त्यांचा ले हा प्रत्यय आहे; तृतीयेचे नी, वरि व घै; पंचमीचा थिन्; षष्ठीचे ना, नी व न; आणि सप्तमीचे माझार असे प्रत्यय आहेत. आकारान्त पुल्लिंगी व नपुंसकलिंगी नामांनां बहुवचनीं विभक्तिप्रत्यय लावतेवेळीं अ चा ए होतो. वरील गोष्टी पुढें चालवून दाखविलेल्या नामावरून समजतील.
आकारान्त, इकारान्त, उकारान्त व ओकारान्त पुल्लिंगी नामांनां विभक्तिप्रत्यय लावितेवेळीं त्यांचें काहीं रूपांतर न होतां त्यांच्या शेवटीं विभक्तिप्रत्यय जसेच्या तसेच लागतात. आकारान्त नामांत भिंगोटा (भुंगा) अपवाद हा आहे; कारण या शब्दास विभक्तिप्रत्यय लावतेवेळीं शेवटील 'टा' ह्या अक्षराचें 'टया' असें सामान्य रूप होतें. उकारान्त नामांत जू (ऊ) हरा शब्द अपवादक आहे. त्याचें 'जुवा' असें बहुवचनी रूप होऊन विभक्तिप्रत्यय लागतांनां 'जुवास' असें सामान्यरूप होतें. पुरुषवाचक व दशर्क सर्वनामें मराठीप्रमाणेंच आहेत; पण त्यांचे विभक्तिप्रत्यय निराळे आहेत. हे विभक्तिप्रत्यय शिवाय करून प्रथम व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामांचीं बहुवचनें मराठीप्रमाणेंच होतात. पण तृतीय पुरुषवाचक दर्शक सर्वनामांनां विभक्तिप्रत्यय लागतेवेळीं अनेकवचनी स हा प्रत्यय लागतो. खुलाशाकरितां कांही सर्वनामें चालवून दाखवितों:-
मराठींतील हा, ही, व हें हीं दर्शकसर्वनामें खानदेशींत पुल्लिंगी हौ व स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी है अशीं होतात. प्रश्नार्थक सर्वनामापैकीं कोन (कोण) याचें विभक्तिप्रत्यय लागतांना रूप बदलत नाहीं; पण काय या सर्वनामाचें विभक्तिप्रत्यय लागतांना 'कसा' असें सामान्यरूप होतें. क्रियापदांचीं रूपें जरी चमत्कारिक आहेत, तरी क्रियापदें नियमित तर्हेनें चालतात. या नियमाला फारच थोडे अपवाद आहेत. वर्तमानकाळीं एकवचनी तिन्ही पुरुषीं एकच रूपें आहेत, व बहुवचनीं तिन्ही पुरुषीं निराळीं परंतु एकच रूपें आहेत. त्यांचे अनुक्रमें 'स' व 'तस' हे प्रत्यय आहेत जसें:-कर (करणें) यांचीं करस व करतस अशीं अनुक्रमें रूपें होतात. हीं रूपें प्राकृत भाषेंतील वर्तमानकालवाचक धातुसाधित जें 'करंत' व त्याचा झालेला 'करत' असा अपभ्रंश, यावरून निघालेलीं असावींत. क्रियापदाचा भूतकाळ 'न' हा प्रत्यय लागून होतो. भूतकाळचें प्रथम पुरुषाचें एक वचनी व बहुवचनी 'नु' व 'नुत' असे अनुक्रमे प्रत्यय व द्वितीय व तृतीय पुरुषाचे 'ना' व 'नात' असें अनुक्रमें एकवचनी व बहुवचनी प्रत्यय आहेत.
भविष्य काळचे खालीलप्रमाणें प्रत्यय आहेत:-
मराठींत ज्याप्रमाणें कर्माच्या लिंगवचनाप्रमाणें कर्मणिप्रयोगांत क्रियापदाचें रूप बदलतें त्याचप्रमाणें खानदेशी भाषेंतहि बदलतें. जसें 'रामानें घर बांधिलें' याचें खानदेशी भाषेंत 'रामांनी घर बांध' (धचा उच्चार लांब होतो.) असें रूपांतर होतें. तसेंच 'ब्राह्मणानें पोथी वाचिली' याचें 'ब्राह्मणानें पोथी वाची' असें होतें. नामाच्या लिंगवचनाप्रमाणें विशेषणाचें रूप बदलतें, पण नामाला विभक्तिप्रत्यय लावले असतां मराठीप्रमाणेंच विशेषणांचें सामान्यरूप होत नाहीं. 'आणि' व 'व' या उभयान्वयी अव्ययांनां खानदेशींत 'आन' व 'न' असे प्रतिशब्द आहेत. 'आणखी' याला 'अखोर' असा विचित्र शब्द आहेत. स्थलवाचक क्रियाविशेषणें येणेंप्रमाणें आहेत:-येथें अठे, इठे (संस्कृत; अत्र); तेथ= तठे, तथ (संस्कृत तत्र); कोठें= कठे, कथा. कोठ (संस्कृत, कुत्र); कालवाचक क्रियाविशषणें:-जेव्हां जव्हय, जधय, जधाल (संस्कृत यदा); तेव्हां ततृय, तथाल (संस्कृत, तदा); केव्हां कबृय, कधाय (संस्कृत कदा). रीतीवाचक क्रियाविशेषणाचीं रूपें मराठीप्रमाणेंच आहेत. कांहीं शब्द मराठीपासून अगदीं भिन्न असे या भाषेंत आढळतात, त्यांपैकीं कांहीं येथें देतों.-
अंडोर= मुलगा. अंडेर= मुलगी. बाक= कडे तिबाक=तिकडे. इबाक= इकडे. धुरा= पावेतों. मायव= अगाई.
आतां नियमित चालणार्या कांहीं क्रियापदांचे नुमने दोतों:-
अस= असणें
अ हि रा णी भा षें ती ल ए क प द्य.-या पद्याचा भावार्थ असा:- एक कुणबी खांद्यावर शेतीचें सामान घेऊन बैल हांकीत चालला असतां मनांत विचार करूं लागला. अमक्या शेतांत कपाशी पेरीन; तिच्या उत्पन्नांतून कर्ज फेडीन; तमक्या शेतांत जोंधळा पेरून, बायकोला त्याच्या उत्पन्नाचे दागिने करीन; गव्हांच्या उत्पन्नावर घर बांधीन; मठ (मटक्या) मुगांवर शेतसारा भागवून, तिळांच्या उत्पन्नावर मुलाचें लग्न करीन. असा विचार करीत पेरणी करून घरीं आला, तों दोन महिने दुखण्यांत पडला. पुढें अवर्षण पडल्यामुळें बैल विकून अखेरीस शेतसारा भरावा लागला.
('ब्राह्मण कन्या नव्हे क्षत्रिया.' अशासारख्या चालीवर)
खानवर सामान डोक्यावर सरक्या बैल पुढ हलकी दिना।
कुणबी मनसुबा करत चालना॥
आडपट्टीमा पेरसू पळ बीवार शे बहु जुना।
अवंदा कर्ज राहात नाहीं मना
चिचमळामा पेरसू जोंधळा बीवार शे बाजराना।
बायको तुले खूप घडसू दागिना॥
त्या परिस येवाशे बहु गव्हाळिना।
मजबुत घर बांधसु जोत्राना॥
मठ मुंगवर झोकसु तशील तिळीना मोकळा दाणा।
एकच पोर्याशे परणाना॥
पेरणी करीसन घर उना दोन महिने जाया दुखना॥
अडीच महिने पाणी नही ऊना॥
म्हणे खुशाल ठाकुर ठेवाशे भाऊ श्रीहरिना।
उलटा बैल तशीलना दिना॥
वरील मजकूर मुख्यत्वेंकरून खानदेश गॅझेटियरवरून व कांहीं स्वत:च्या माहितीवरून रा. वि. का. भागवत यांनीं लिहिला आहे. [विविधज्ञानविस्तार सप्टेंबर १९०६]
ग ड्डी व घो सी अ ही र-उत्तर हिंदुस्थानांत जेव्हां अहीर लोक मुसुलमान होतात तेव्हां त्यांनां घोसी (ओरडणारा, संस्कृत घुष धातूपासून) किंवा गड्डी म्हणतात. ते द्राविडमिश्र मुसुलमानी धर्म पळतात. मुंबईतील हे लोक जन्म व लग्नाच्या वेळीं हिंदुसंस्कार करितात. दसरादिवाळीच्या वेळीं देवी लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करितात,
पंजाबांतील डोंगरांत राहणारे गड्डी यांपेक्षां फार निराळे आहेत. हे नांवाचे हिंदु आहेत. शिव, नाग, सिद्ध, बीर आणि देवी यांची उपासना करितात. बायका विशेषत: कैलूनांवाच्या बीराची वाखा होऊं नये म्हणून पूजा करितात. नागांत कैलुंग हा मुख्यांपैकीं एक आहे. शिवाप्रमाणें याचीहि कोयत्याच्या रूपांत आराधना करितात. या खेरीज पूजार्ह असे अवतार म्हटले म्हणजे निपुत्रिक माणसांचीं भुतें आहेत. हीं भुतें द्वाड असून रोग ओढून आणितात; तेव्हां ओढ्यांकाठीं मूर्ति स्थापून रोग्यानें त्यांची पूजाअर्चा करावी लागते. शिवाय बातल. योगिनी, रक्षनी आणि बनसत या दृष्टबुद्धि देवता आहेतच. यांपैकीं कोणी नद्या, ओढे, कोणी खडक, कोणी राक्षस, भुतें, अरण्यें यावर ताबा चालवितात. डोंगरी जातींत अशा कल्पना असणें अगदीं स्वाभाविक आहे. झाडींत वास करणारा चुंगू नांवाचा एक राक्षस आहे; हा गुरांचें दूध शोषून घेतो. गुरांनां रोगी करणारा दुसरा राक्षस गुंगा होय. या देवतांना प्राणी बळी देण्यात येतात. गड्डी संप्रदायाचा इतिहास फार मजेदार असून तो भारतीय वन्यधर्माची माहिती देण्यास चांगला उपयोगी पडेल.
(सं द र्भ ग्रं थ.-डाल्टन-डिस्क्रिप्टिव्ह ऐथ्रालॉजी. रिस्ले-ट्राईब्स अँड कास्टस, १ ; नॉर्थ इंडियन नोट्स अँड क्वेरीज ५. वुचानन हॅमिल्टन-ईस्टर्न इंडिया. गेट-बेंगॉल सेन्सस, १९०१. क्रूक-पाप्युलर रिलिजन अँड फोकलोअर. २; रसेल व हिरालाल-ट्राईब्स अँड कास्टस् इन सी. पी. रोज-ग्लॉसरी, पु. २ पंजाब-सेन्सस रिपोर्ट, १९०१. बाँबे गॅझिटियर १५. दे. रा. भांडारकर-इं. अँ. जानेवारी १९११. स्मिथ-अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया. लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया पु. ९ बाँबे एन्थोग्राफिकल सर्व्हे, बुले. नं. १. सेन्सस रिपोर्टस १९११. ए. रि. ए.]