विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आप्पा देसाई निपाणकर - याचें मूळ नांव सिधोजीराव निंबाळकर हा प्रथम दौलतराव शिंद्याच्या पदरी नोकर होता. इ.स. १८०० सालीं दौतलराव शिंद्यानें आप्पा देसायाच्या हाताखालीं आपल्या पलटणी देऊन त्यास परशुरामभाऊ पटवर्धनाची जहागीर काजीब करण्याकरितां रवाना केलें. देसायाच्या सैन्यापैकीं पायदळाच्या पलटणी परत फिरल्या पण देसायाच्या फौजेनें पटवर्धनाच्या मुलुखांत बरीच लुटालूट केली. १८०३ सालीं जनरल वेलस्ली हा म्हैसूरच्या उत्तर सरहद्दीवरून बाजीरावास मसनदीवर बसविण्याकरितां पुण्याकडे येत असतांना आप्पा देसाई हा कृष्णा नदीच्या तीरीं त्यास येऊन मिळाला. बाजीरावाच्या पदरीं बापू गोखले वगळल्यास आप्पा देसाई हा एकटाच उत्तम सेनानायक होता. इ.स. १८०८ सालीं आप्पा देसायानें विश्वासराव घाटग्यास मदत करून त्याच्या ताब्यांत असलेल्या चिकोडी व मनोळी या जिल्ह्यांचें कोल्हापूरकरांपासून रक्षण केलें. परंतु पुढें बाजीरावाकडून त्याला फूस मिळाल्यामुळें त्यानें हे दोन्हीहि जिल्हे आपल्याच कजबांत घेतले. याच सुमारास कोल्हापूरच्या सैन्यानें सांवतांच्या वाडीस वेढा दिल्यामुळें खेम सांवताची बायको लक्ष्मीबाई हिनें विश्वासराव घाटगे व आप्पा देसाई यांनां आपल्या मदतीस बोलाविलें. स्वतः बाजीरावाचीच या गोष्टीस गुप्तपणें संमति मिळाल्यानें आप्पा देसायानें ती तात्काळ कबूल केली. तो लक्ष्मीबाईच्या मदतीस गेला व वाडीचा वेढा उठवून त्यानें घाटावरील कोल्हापूरकरांच्या मुलुखावर स्वारी केली. आप्पा देसाई आता सांवतवाडी संस्थानावरहि आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूं लागला. आप्पा देसाईयाच्या कारकुनाच्या चिथावणीवरून खेम सांवताच्या मुलाचा गळा दाबून प्राण घेण्यांत आला; परंतु या खुनामुळें आप्पा देसायाचा मुळींच फायदा झाला नाहीं. कारण पुंड सांवत नांवांच्या सांवताच्या घराण्यांतील वारसदार इसमानें आप्पा देसायाचें बहुतेक सैन्य घाटांवर कोल्हापूरकरांशीं लढण्यांत गुंतलेलें आहे ही संधि साधून आपल्या मुलुखांत असलेलें त्याचें सर्व सैन्य देशाबाहेर हांकून लावलें व संस्थानचा कारभार आपल्या हातीं घेतला. बाजीरावाच्या कपटीपणामुळें इ.स. १८१३ च्या सुमारास आप्पा देसायास विनाकारण आपल्या चतुर्थांश जहागिरीस मुकावें लागलें.
बाजीरावाच्या गुप्त उत्तेजनामुळें त्यानें कोल्हापूरकरांचा कांहीं मुलूख सोडण्याचें नाकबूल केल्यावरून इंग्रजांनीं त्याजकडून त्याची चतुर्थांश जहागीर बाजीरावास देवविली.
तथापि यापुढेंहि कांहीं वर्षे आप्पा देसाई हा बाजीरावच्याच पक्षास चिकटून होता. ता.१ जानेवारी १८१८ रोजीं कोरेगांवची लढाई झालीं, तींत हा पेशव्याच्याच बाजूनें लढत होता. आप्पा देसाई हा बाजीरावाचा एक नाणावलेला सेनापति होता तरी बाजीरावाचें राज्य इंग्रजांनी घेतल्यावर त्यांनी आप्पा देसायाची जहागीर खालसा केली नाहीं कारण एक तर आप्पा देसाई हा पेशव्याला बऱ्याच उशीरा मिळाला होता. शिवाय तो इंग्रजांविरुद्ध नेटानें असा कधींच लढला नव्हता आणि एके प्रसंगीं तर त्यानें इंग्रजांकडील कैद्यांस दयाळूपणानें वागविले होतें. पेशव्याशीं युद्ध चाललें असतांच त्याचा इंग्रजांशी पत्रव्यवहार सुरू होता. परंतु त्यानें पेशव्याचा पक्ष बऱ्याच उशीरां सोडल्यामुळें त्याला त्याच्या जहागिरीपैकीं चिकोडी व मनोळी हा भाग कोल्हापूरकरांस परत करण्यांत आला व शिवाय निजामाच्या राज्यांतीलहि त्याचें बरेंच उत्पन्न बुडालें. बाकीची त्याची जहागीर त्याची त्याला परत देण्यांत आली व निजामाच्या राज्यांतील उत्पन्न बुडल्यामुळें झालेल्या नुकसानीचीहि अंशतः भरपाई करून दिली गेली. [ ग्रांटडफ.]