विभाग नववा : ई-अंशुमान
ओरावन - हिंदुस्थानांत यांची वस्ती (१९११) ७५१९८३ आहे. ही एक द्रविड जात आहे. या जातीच्या लोकांची विशेष वस्ती छोटानागपुरांतील सपाट मैदानांत आहे. व मध्यप्रांतांतील जशपूर व सिरगुजा संस्थानांत यांची संख्या (१९११) ८८५००० आहे. आसामांतच चहाच्या मळ्यांत याच्या जातीचे (१९११) २८५८३ मजूर आहेत. यांच्या नांवाच्या व्युत्पत्तीचा चागलासा शोध अद्याप लागला नाहीं. नर्मदा खोर्यांत पेरणी करताना पाभरींत धान्य टाकणारास ओरया म्हणतात. त्यावरून व या लेकांचा उपयोग हिंदू लोक फक्त मळ्यांत काम करण्याकरितां करून घेतात यावरून यास ओरावन नांव पडलें असावें. गेटच्या मताप्रमाणें हे लोक पूर्वीं कर्नाटकात रहात असत. तेथून ते नर्मदेच्या तीरावर जाऊन बिहारांत शोण नदीच्या तीरावर गेले. तेथून त्यांस मुसुलमानांच्या त्रासानें दुसरीकडे जावें लागलें. एक टोळी गंगेच्या कांठावर गेली व राजमहाल डोंगरांत वसली. तेथें त्यांस माले अथवा सौरिया हें नांव पडलें. दुसरी शोणा नदीच्या कांठानें जाऊन छोडानागपूरच्या सपाटीवर वसली. या भागांतल्या बर्याच गांवांचीं नांवें अद्याप मुंडारी आहेत. यांच्या गर्दीमुलें तेथील मुंडारी लोक अरण्यांत राहण्यास गेले. यांच्या बर्याच गांवांच्या पाटलास मुंडा म्हणतात व पाहन किंवा ग्रामदेवतांची पूजा करण्याकरितां मुंडा पुजारी आणतात. व याच पाहन लोकांकडे गांवाची सीमा ठरविण्याचें काम असतें. यावरून हे येण्यापूर्वीं मुंडा लोक या गांवांत रहात असत असें दिसतें. ओरावन लोकांनीं युद्ध करून मुंडा लोकांस हांकून दिलें असेल असें वाटत नाहीं. कोरकू व बैगा यांनीं गोंड लोकांस जागा मोकळी करून दिली किंवा गोंड लोकांनीं हिंदू लोकांस जागा मोकळी केली तशीच मुंडा लोकांनीं ओरावन लोकांस रिकामी करून दिली असेल. ओरावननीं प्रथम वस्ती केलेल्या गांवांतील लोकांचे तीन भाग केले. यांस खुंट म्हणूं लागले व यांचीं नांवें मुंडा, पाहन व माहतो अशीं ठेवलीं. या प्रत्येक खुंटाचा गांवच्या जमीनींत हिस्सा असतो. या तिन्ही जाती भिन्न गोत्री समजल्या जातात.
यांच्यांत परस्पर भिन्न असे वर्ग किंवा उपवर्ग मुळींच नाहींत. पण यांच्यांत कुलें मात्र पुष्कळ आहेत व प्रत्येक कुलाचें ठरीव देवक असतें. तीं देवकें हे लोक कापीत किंवा खात नाहींत. हे लोक स्वकुलांतली किंवा आईच्या कुलांतली मुलगी करीत नाहींत. लग्नें प्रौढपणांतच होतात. लग्नापूर्वीं घडलेल्या स्त्रीपुरूषसंबंधाबद्दल जातींत शिक्षा नाहीं. प्रत्येक ओरावन गांवांत अविवाहितांना निजण्याकरितां धुमकुरिया नावाची एक खोली असते. या खोलींत जर कोणी अविवाहित माणूस निजला नाहीं तर त्यास दंड करतात. ओरावन लोकांच्या राहण्याच्या झोंपड्या लहान असतात. यामुळें तरूण स्त्री-पुरूषांनां निजण्याची स्वतंत्र सोय करणें अवश्य असतें. कांहीं गावांत तर धुमकुरियासारख्या अविवाहित बायकांच्याहि निजण्याच्या जागा असतात. तेथें त्या एका वृद्ध पाठराखणीच्या ताब्यांत असतात. पण सर्वसामान्य चाल अशी आहे कीं, प्रत्येक तरूण मुलीला रात्रीं कोणा एका ठरीव विधवेच्या स्वाधीन करतात. तथापि कितीहि बंदोबस्त केला तरी तरूण मुली धुमकुरियापर्यंत बहुधा रोज रात्रीं पोंहोंचतातच व कांहीं गावांत तर त्या तेथेच निजतात. डाल्टन म्हणतो कीं, सिरगुजा संस्थानांत तरूण मुली तरूण मुलांच्या जवळ एकाच धुमकुरियांत निजातात. डाल्टन म्हणतो कीं येथें त्यांचा संयोग होतोच असें निश्चितपणें सांगतां येत नाहीं. पण रिस्ले म्हणतो कीं, तसा तो होत असावा. ज्यांनीं या गोष्टीसंबंधीं बारीक निरीक्षण केलें आहे, त्याचें तर असें मत आहे कीं, कोणतीहि ओरावन वधू लग्नाच्या वेळीं अनुपभुक्त रहाणें शक्यच नाहीं. ही अनीति आहे असें म्हणणें बरोबर नाहीं. कारण ज्या लोकाच्या समाजांत नीतितत्त्वें अद्याप विकास पावलीं नाहींत त्यांच्यावर आपल्या नीतीच्या कल्पना लादणें गैर आहे. यांच्या जातींतल्या जातींत घडलेले स्वैरसंबंध अनीतिकारक आहेत अशी यांच्यांत कल्पनाच नाहीं. देवकानें मर्यादित केलेल्या कुळाचा माणूस खेरीज करून कोणाबरोबर जरी या कुमारिकांनीं संबंध ठेवला तरी चालतो. पण त्यापासून जर ती गर्भवती झाली तर मात्र त्यांचें लग्न ताबडतोब करतात. पण बहुधा एकाच गांवांतल्या तरूण तरूणींच्या संबंधापासून लग्नें क्वचित घडून येतात. कारण बाहेर गांवची वधू करून आणणें थोरपणाचें समजतात. मेळ्यांत, नाचांत व जातीच्या इतर संमेलनांत तरूण लोक आपल्या प्रणयिनीस निवडून तिच्या केंसांत फुलें खोंचून भाजलेले उंदीर तिला देऊन तिची एकसारखी मनधरणी करीत असतात. लग्नें मात्र आईबापच जुळवितात व वधूवरांस विचारित सुद्धां नाहींत. मुलीचें लग्न १५व्या वर्षीं व मुलाचें १६ व्या वर्षीं होतें, तेव्हां धुमकुरियाची मौज उपभोगण्यास तरूण व तरूणींनां फक्त दोन वर्षेंच सांपडतात.
लग्नांतला पहिला विधि पानबांधी’ म्हणून असतो. यांत वधूचें शुल्क ठरवितात. ५ रूपयें व ४ मण धान्य बहुधा शुल्क द्यावें लागतें. हें ठरल्यावर मग सोहळा सुरू होता. गांवांतल्या सर्व लोकांस बोलावतात. दोन मुलें सर्वांच्या अंगास तेल लावतात. गांवांतल्या प्रत्येक घराच्या ऐपतीप्रमाणें तांदुळाच्या मद्याची एक ‘हंडिया’ आणतात व त्यांतील दारू पितात. इतका वेळ वधू घरांतच ठेवतात पण या वेळेस ती डोक्यावर मद्याची हंडिया घेऊन समाजांत आली कीं, तिच्या स्वरूपाची, तिच्या तारूण्याची, तिच्या पोषाखाची व शालीनतेची सर्व लोक आपसांत स्तुती करूं लागतात. मद्याचा घट डोक्यावर घेऊन वधू आपल्या भावी सासर्याजवळ तडक जाऊन उभी राहते. तो डोकीवरील घट उतरून तिला आलिंगन देतो व १ रूपया तिला नजर करतो. सर्व मेजवानी संपेपर्यंत वधू सासर्याच्या पाशीं असते. सर्व दारू पीत आनंदानें गात गात मौज करीत असतात व मोठमोठ्यानें एकमेकांशीं बोलणें सुरू करतात; गोंगाट होतो व कोणाचें भाषण कोणासहि ऐकूं येत नाहीं. या मनोरंजनांत नवीन पणा आणण्यास गांवांतल्या प्रौढ स्त्रिया मद्यपानानें उन्मत्त होऊन लाल डोळे गरगर फिरवीत व ठेंचा खात डोक्यावर विलक्षण प्रकारच्या टोप्या घालून हातांत गवताच्या मूर्ती वर समजून आणतात आणि डाकिणीसारख्या काय वाटेल तो धांगडधिंगा सामाजांत घालतात. यानंतर दोन वर्षांनीं लग्न लागतें. या अवधींत वर्षांतून दोनदां भेटी मात्र होतात. लग्नाचा दिवस जवळ आला म्हणजे वर आपले इष्टमित्र पुरूष व स्त्रिया बरोबर घेऊन वधूच्या गावीं जातो. त्याच्या बरोबरच्या पुरूष मंडळींजवळ खरीं किंवा खोटीं हत्यारें असतात. त्यांस भेटण्याकरितां वधूपक्षाचीं तरूण मुलें आपापलीं शस्त्रें घेऊन यांच्याबरोबर युद्ध करण्याच्या तयारीनें येतात. पण अखेरीस त्यांजबरोबर नाचूं लागतात. वधूवर दोन माणसांच्या कडेवर बसलेलीं असतात. व मध्यरात्रीनंतर मेजवानी होते. दुसर्या दिवशीं सकाळीं दारीवर म्हणजे गांवांतील झर्यावर जाऊन सर्व बायका वधूच्या आईनें केलेल्या पोळ्या खातात व नंतर पाण्याच्या एका भांड्यांत आंब्याचीं पानें घालून परत येतात. या अवधींत वधूवरांस त्यांच्या बहिणी तेल हळद चोळीत असतात. सर्व लोक बाहेर जमले म्हणजे वधूवरांस बाहेर आणतात आणि नांगराचें जूं व छताचें गवत यांच्या ढिगाजवळ एक पाटा ठेवतात त्यावर वधूवरांस वधूच्या टांचावर वराच्या पायाचीं बोटें पडतील अशा रीतीनें उभे करतात व पाया खेरीज कांहीं दिसूं नये अशी व्यवस्था करण्याकरितां त्याच्या भोंवती एक लांब कपडा गुंडाळतात. मुलाजवळ शेंदुरानें भरलेली वाटी देतात. तो मुलीच्या कपाळावर त्याच्या तीन रेघा ओढतो, व वधू देखील वराच्या कपाळावर त्याच स्थितींत त्याच्य पुढें उभी राहून त्याच्या कपाळावर तीन रेघा ओढते. तिला आपला हात पाठीमागें नेऊन रेघा ओढाव्या लागल्यामुळें रेघा वांकड्या तिकड्या चेहर्यावर कोठें तरी ओढल्या जातात व त्यामुळें पुढें हशा पिकतो. त्यानंतर बंदूक सोडतात व एकदम वधूवरांवर आणि सर्व लोकांवर पाणी ओतलें जातें. लग्न झालें, लग्न झालें म्हणून बायका ओरडतात. मग वधूवर आपले कपडे बदलण्याकरितां म्हणून एकांतांत जातात, पण पुष्कळ वेळानें परत येतात; आणि आल्याबरोबर त्यांस लोक नवराबायको म्हणून संबोधून नमन करतात. बाहेर पुरूषमंडळी हंड्यातील मद्य झोंकीत बसलेले असतात. वधूवर बाहेर येतात व पुन्हां एकांतांत जातात. ते बाहेर आले म्हणजे वधू मद्याचा द्रोण घेऊन दिराजवळ जाते व त्याच्य हातांत देण्याऐवजीं तो जमीनीवर ठेवते. माझ्याबरोबर इत:पर मैथून करूं नये याचा सूचक हा विधि आहे. यानंतर “खितीतेंगन हेडीया” चा विधि होतो. हा विधि त्यांस त्यांच्या पूर्वजांपासून मिळाला आहे असें सांगतात. हाच लग्नांतील खरा विधि आहे. सर्व लोकांच्या समाजांत वधूवर बसतात. कोणी तरी वृद्ध माणूस वरास म्हणतो “तुझी बायको साम आणण्यास गेली असतां झाडावरून पडली व पाय मोडला तर ही लंगडी झाली असें म्हणू नको. तिला नीट ठेव व तिची शुश्रूषा करून तिला खाऊं घाल.” मग वधूस उद्देशून म्हणतो “तुझा नवरा शिकारीस गेला असतां त्याचा हात पाय मोडला तर त्याचा त्याग करूं नकोस, त्याची शुश्रुषा कर, आपल्या स्वयंपाकांतून दोन हिस्से त्यास देव एक हिस्सा तूं घे. तो आजारी झाला तर त्याची सेवा कर, त्याचे कपडे धू व त्याला स्वच्छ ठेव.” यानंतर मेजवानी होते. त्यानंतर वधूची आई तिला वराजवळ आणते व म्हणते कीं, “ही माझी मुलगी तुझी झाली. तिला थोड्या दिवसांकरितांच मी तुला दिलेली नाहीं तर नेहमी जन्मभर तुला दिली आहे. तिच्यावर प्रेम कर व तिची काळजी घे.” मग वराचा सोबती वधूला धरून घरांत आणतो.
दोन बायका करण्याची चाल यांच्यांत नाहीं. काडी मोडण्याची परवानगी असते. पण नवराबायकांपैकीं कोणी तरी दूआर किंवा आसामला पळून गेलें म्हणजे झालें. यांच्यांत विधवाविवाह रूढ आहे. विधवेच्या प्रथम विवाहाच्या वेळीं वरानें तिला ३|| रूपये दिले पाहिजेत. ती पुन्हां विधवा झाली तर तिची किंमत कमी कमी होत जाते. ती ५ व्यांदां विधवा होऊन लग्न करील तर तिला ८ आणेच मिळतात. यांच्यांत व्यभिचार करणारास तो संपन्न असेल. तर फार मोठा दंड होतो व नसेल तर लहान दंड व पुष्कळ मार मिळतो.
यांनां संतति फार होते. त्यांना फार न गांजता जर कोठेंहि राहूं दिलें तर त्यांनां एकसारखीं मुलेंच होत असतात. ख्रिस्ती लोकांत त्यांच्या प्रथम आईला कष्टकर प्रसूतीचा जो शाप मिळाला होता तो ओरावन बायकोस. मात्र लागू नसावा असें वाटतें. या फारच सुखानें बाळंत होतात. बाळंत झाल्या कीं आपल्या मुलास पाठीवर बांधून घागर डोक्यावर घेऊन आपण बाळंत झालों हें गांवींहि नाहीं अशा तर्हेनें झर्यावर रोजच्याप्रमाणें पाणी भरण्यास जातात. बिलासपुरांतील ओरावन लोकांत बायको बाळंत झाली म्हणजे नवर्यानें बाळंतिणीचे उपचार करवून घेण्याची चाल आहे. त्या चालीचाच हा परिणाम असावा असा कोणी कोणी तर्क केला आहे पण अजून यास चांगला पुरावा सांपडला नाहीं.
जन्म झाल्यावर ८ व्या किंवा १० व्या दिवशीं मुलाचे नांव ठेवतात. सुवेर किंवा अस्पर्शपणा कांहींच नसतो. तांदुळाचा एक द्रोण व पाण्याचा एक द्रोण आणतात. पहिला तांदूळ मुलाचा म्हणून पाण्याच्या द्रोणांत टाकतात. मग आजा, पणजा, बाप, काका, मातमह व इतर नातलगांच्या नांवानें तांदूळ सोडतात. कोणाच्य नांवाचा तांदूळ पहिल्या तांदुळावर पडला तर मुलास त्याचाच अवतार समजूत तेंच नांव ठेवतात.
मुलगा सहा किंवा सात वर्षें वयाचा झाला म्हणजे तो धुमकुरियाचा सभासद होण्यास लायक ठरतो मोठीं मुलें त्या सभासदाच्या बाहूच्या खालच्या भागावर कपडा जाळून त्यानें ५ डाग देतात. ही ओरावन म्हणून ओळखला जावा म्हणून खूण करतात यामुळें त्याचा स्वर्गांतहि प्रवेश होतो अशी समजूत आहे. पुरूष अंगावर गोंदीत नाहींत पण बायका विपुल गोंदवितात. त्या कपाळावर उभ्या तीन रेघा गोंदवितात व हातावर, छातीवर, गुढघ्यांवर आणि गोफ्यावर आडव्या उभ्यारेघा गोंदतात.
धुमकुरिया मंडळांतील बातमी बाहेर फोडली असतां फार कडक शिक्षा होते. व मुलींनीं जरी तेथलें कांहींहि गार्हाणें सांगितलें तरी त्यांनां सुद्धां शिक्षा देतात आणि आपल्या अपराधाचें क्षालन करीपर्यंत त्यांस नृत्यांत सामील करीत नाहींत. आपल्यापेक्षां लहान वयाच्या मुलांकडून अंग चेपवून घेण्याचें व केस विंचरविण्याचें काम करून घेतात.
हे लोक प्रेतें जाळतात किंवा परतात. प्रेताच्या तोंडांत पैसा व अन्न टाकतात. मग तो पैसा राखेंतून काढून वाजंत्र्यास देणगी म्हणून देतात. एक बोरूचें झाड प्रेताच्या डोक्याकडे लावतात. १० व्या दिवशीं डुक्कर, कोंबड्या बळी देतात. थडग्यावर भात ठेवतात. दहन केलें असल्यास अस्थी एका मडक्यांत भरून घरीं टांगून ठेवतात व मृताचा आत्मा घरीं आला हें समजण्याकरितां एक ठरीव विधी करून अस्थी नदींत टाकतात.
प्रत्येक सणाला पितरांची पूजा करतात. कोंबडीपुढें दाणे टाकतात. तिनें ते खाल्ले तर ते पितरांस पोंचले असें समजतात व बुक्की मारून तिचें डोकें ठेंचून तिला बळी देतात. हा विधि बैगा लोकांच्या डुकराचा बळी देण्यासारखा किंवा गोंड वधुवरांच्या गृहप्रवेशाच्यावेळीं त्यांनीं पायानें कोंबडे चिरडण्यासारखा आहे.
हे लोक परमेश्वरास धर्मेज म्हणतात. पुरोहित व शकुन सांगणारांचा उपाय थकला म्हणजे ते धर्मेजाची पूजा करतात. ‘सर्व करून आम्ही दमलों आतां तरी तूं आमचें काम कर’ अशी त्याची प्रार्थना करतात. “तो फार दयाळू आहे. सर्वांस सारखें वागविण्यात तो चुकणार नाहीं. आपल्या कृत्यांचा झाडा त्याच्याजवळ देण्याची गरज नाहीं. नरकाचें मुळींच अस्तित्व नाहीं. स्वर्गांत सर्वांस आनंद होणारच. प्रत्येकाला जमीन, नांगर व बैलाची जोडी मिळणारच. श्रमानंतर तांदुळाचें मद्य मिळणारच.” बरेड म्हणजे दूत देवाकडून येऊन त्रास देईल म्हणून त्याला कांहीं इनाम देण्याकरितां प्रत्येकवेळीं धर्मेजला बळी अर्पण करतांना म्हणतात कीं, पहा तुला तर आम्ही यथाशक्ति बळी दिला, आतां तुझ्या दूतास दस्तुरी देत आहोंत.
याशिवाय अनेक भुतेंखेतेंहि हे पुजतात. चोलापाचो नांवाची देवी सर्नामध्यें (आंबराईत) राहतो, ती पाऊस देते. बाळंतपणीं जी मेली ती चुडेल होते. व आपल्या आवडत्या माणसास रात्रीं येऊन आलिंगन देते व गुदगुल्या करीत करीत प्राण घेत. भूला हीं कोणत्यातरी विचित्र रीतीनें प्राण गेलेल्या माणसांचीं भुतें आहेत. ओझा या भूलांस वठणीवर आणतो. मुरकुरी नांवाचें ठोसे मारणारें भूत आहे. जर इंग्रजानें कोणाची पाठ थोपटली व त्यास ताप आला तर इंग्रजाच्या अंगातली मुरकुरी आपल्या अंगांत शिरली असें त्यास वाटतें. चोरदेव नांवाची जादू करणारी कृत्या आहे. ती काळ्या मांजराच्या जीवांत जीव धरून असते. म्हणून धरण्यास अशक्य असें हें काळें मांजर जर पकडलें व त्याचा कोणताहि अवयव कापला तर इकडे या चोरदेवीचा तोच अवयव तुटतो. पूर्वीं अशा चोरदेवीला जाळीत असत.
अन्नकुवारी व महाधानी नांवाच्या दोन देवता आहेत. या देवतांस चैत्रवैशाखांत हे लोक नरबळी देत. या अन्नकुवारीला नरबळी मिळाला कीं ती आपल्या भक्ताकडे लहान मूल होऊन राही; व त्या भक्ताच्या घरीं मात्र धान्याची विपुलता होई. कधीं कधीं ती कंटाळली कीं पुन्हां नरबळी घेऊन ती संतुष्ट होत असे. पण कांहीं वर्षांनंतर मात्र त्या कुळांतल्या सर्वांस मारून टाकल्याशिवाय तिला चैन पडत नसे.
जशपूर संस्थानांत एकंदर ४७००० ओरावन आहेत. त्यांपैकीं २३५०० लोक ख्रिस्ती झाले आहेत. पुष्कळ ख्रिस्ती व अख्रिस्ती लोक एकत्रच राहतात. हे लोक रोमन क्यॉथोलिक आहेत किंवा प्रॉटेस्टंट आहेत व त्यांत भेद काय आहेत हें हे विसरले आहेत.
यांचा सारहूल सण साल वृक्षास फुलें आलीं म्हणजे होतो व चैत्र वैशांखात भात कापण्याच्या वेळीं कर्मानृत्य नांचतात. रानांतून कर्मा झाडाचें रोप वाजत गाजत आणतात व आखाड्याच्या मध्यभागीं त्यास रोवतात. दुसर्या दिवशीं सर्व उत्तम पोशाख घालून आखाड्याभोंवतीं जमतात. तरूण स्त्रीपुरूष एकमेकांच्या हातांत हात घालून कर्मा झाडाभोंवती प्रदक्षिणा घालून नृत्य करतात. कर्मा झाडावर दागीने व लाल कपड्यांचीं तोरणें बांधून त्याला सजविलेलें असतें. सारहूल सणांत सूर्यदेवाचें व पृथ्वीदेवीचें लग्न लावतात. पांढरा कोंबडा सूर्याचा द्योतक व काळी कोंबडी पृथ्वीची द्योतक समजून त्यांस शेंदूर लावतात व त्यांचें लग्न लावून त्यांस बळी देतात. मग गांवचे लोक पाहन किंवा बैगाबरोबर सर्ना आंबराईत जातात. तेथें सर्नाकढी (पावसाळा आपल्या कह्यांत ठेवणारी) देवी असते. तिला ५ कोंबडीं बळी देऊन तीं खातात. तो दिवस जेवणांत घालवून साल वृक्षाची फुलें बरोबर घेऊन परत येतात. दुसर्या दिवशीं बैगा प्रत्येक घरीं फेरी मारतो. घरांतल्या बायका दोन द्रोण, एक तांदुळाच्या मद्यानें व दुसरा पवित्र तीर्थ घेण्याकरितां रिकामा घेऊन दाराबाहेर उभ्या राहतात. बैगा महाराज सर्व स्त्रियांच्या डोक्यांत फुलें घालतो व तीर्थ धान्यावर शिंपडतो. “तुमचें घर धान्यानें भरों व बैगाची कीर्ती वाढों” असा अशीर्वाद देऊन पुढें चालला कीं बायका त्याच्या अंगावर घागरभर पाणी ओततात. इतक्या पाण्याच्या घागरी अंगावर येऊन त्यास पडसें न व्हावें म्हणून प्रत्येक घरीं द्रोणभर मद्य पिण्यास मिळतें व तो घरीं पोंटण्याच्या आधींच मद्यानें उन्मत्त झालेला असतो. नंतर सर्व गांवच लोक मेजवानी करतात व तरूण स्त्रिया आपल्या कृष्ण वर्णाच्या पण तारूण्यानें मुसमुसलेल्या शरीरावर सालवृक्षाच्या पांढर्या फुलांच्या भूषणांनीं आपल्या नैसर्गिक सौंदर्यास जास्त खुलवून तरूण मुलांच्या हातांत हात घालून रात्रभर नृत्य करतात.
धान्य मळण्यापूर्वी कनिदार नांवाचा सण असतो. कोंबडा बळी देऊन त्याचें रक्त धान्यावर शिंपडतात. मग बैगा महादेवाच्या लिंगाजवळ जाऊन त्यावर दुध ओततो. सर्व लोक नाचतात आणि तांदुळाचें मद्य वाटेल तितकें पितात. त्यानंतर तेथेंच सर्व बंधनें सोडून वाटेल तो वाटेल त्या स्त्रीबरोबर मैथुन करतो व आपल्या कामविकारांस बेछुट मोकळीक देतो. त्या दिवशीं कोणीहि कोणाशीं कांहीं केलें तरी त्याला कोणी जबाबदार धरीत नाहींत.
धान्य उगवण्यापूर्वीं आषाढाच्या महिन्यांत हे लोक अनुष्ठान करतात. हळद खात नाहींत, पत्रावळींवर जेवीत नाहींत.
या लोकांची उंची ४ फुट ५ इंच असते यांचें शरीर बांधे सूद असून नीट नेटकें असतें. हा आपल्या शरीराची व पोशाखाची धुमकुरिया कालांत असेपर्यंत फारच काळजी घेतात. व तारूण्याची पहिली खुमारी गेली कीं पोषाखाविषयीं निष्काळजी होतो. हा आपले केस लांब वाढवितो, व मागें त्यांचा बुचडा बांधतो व मोठ्या समारंभाच्या प्रसंगीं त्यावर लाल पागोटें घालतो. बुचड्यांत फणी व पितळेचे इतर दागिने घालतो. बुचड्याच्या मध्यभागीं वाटोळा आरसा घालतो. कानांत पितळेच्या सांखळ्यांत लटकावलेल्या वाळ्या घलतो, व तो तारूण्याच्या चपळ पण गंभीर चालीनें चालूं लागला किंवा त्यानें खंद्या घोड्याप्रमाणें मानेला हिसका दिला कीं त्याचे दागिने डोलूं लागतात व तितक्यांतच तो हांसला तर त्याचे पांढरे मोत्यासारखे दांत त्याच्या काळ्या शरीरास फारच शोभा आणतात व त्याचा आनंदी स्वभाव स्पष्टपणें खुलवितात. तो अंगांत सदरा म्हणून मुळींच घालीत नाहीं. पण त्याची छाती व कटि ही जुन्या शिल्पशास्त्राप्रमाणें सिंहासारख्या आकाराची झालेली दिसते. तो आपल्या कंबरेभोंवतीं कोशाच्या कापडाचा व वेताचा एक कंबरपट्टा बांधतो.
पण प्रथमतारूण्य उलटलें कीं स्त्रिया व पुरूष सौंदर्याकडे दुर्लक्ष करतात; एखादी चिंधी नेसतात केसांची जोपासना करीत नाहींत व फारच विद्रूप दिसूं लागतात.
बायकांचें लुगडें ६ वार लांबीचें असतें. डाव्या खांद्यावरून पाठीवर पदर सोडतात; तो फार सुंदर दिसतो. लाल मण्यांचे हार व पितळेचे अवजड दागिने गळ्यांत घालतात. तांब्याच्या आंगठ्या सर्व बोटभर जितक्या मावतील तितक्या घालतात. या बायका कांचेचा कोणताच पदार्थ घालीत नाहींत. केसांनां तेल लावून चिकण करतात व मोठे दिसण्याकरितां वरूनहि केस लावतात व एकाच बाजूला बुचडा बांधतात. कानांत आंगठीवजा वाळ्या घालतात. महत्त्वाच्या प्रसंगीं नृत्य करतांना त्या बुचडयांत पिसें खोवतात व चांगल्या कांठाच्या कपड्यानें कंबरेवरचा भाग कसून गुंडाळतात.
यांचें खरें सौंदर्य यांच्या जातीच्या जत्रेंतून दृष्टीस पडतें. हे सोइस्कार अशा ठिकाणीं वर्षातून एकदां जत्रा भरवितात. जत्रेचें ठिकाण बहुधा आंबराई असते. भोंवतालच्या लोकांस सूचना देण्याकरितां प्रत्येक गांवचे झेंडे व बावटे जत्रेला जाणार्या रस्त्यावर आणून रोंवतात. ठरलेल्या दिवशीं सकाळीं सर्व तरूण मुली व मुलें आपलें सकाळचें काम आटोपून आपले उत्कृष्ट पोशाख आणि सौंदर्यवर्धनाची सर्व जुळवून स्वत:ला भूषवीत असतात. ज्यांनां जत्रेपर्यंत बराच वेळ लागेल अशा तरूणी आपली अलंकारसामुग्री एका पोटळींत बांधून जत्रेजवळच्या तळ्यांवर नटत असतात. सर्व तरूण मुलींचा घोळका एकीकडे आपला शृंगार आनंदानें करतो, व तरूण मुलांचा घोळका दुसरीकडे स्वत:चा शृंगार करीत असतो. हे लोक सज्ज झाले म्हणजे वाद्यें वाजतात. त्याबरोबर प्रत्येक गांवचे लोक आपापली निरनिराळी मिरवणूक सजवितात. अघाडीवर शस्त्रास्त्रें घेतलेलीं तरूण मुलें असून त्यांच्यापैकीं कांहीं लोकांच्या हांतांत झेंडे, तलवारी, ढाली, चवर्या व एका खांबावर फुलांच्या चित्रविचित्र माळा असून राजाच्या स्वारीचा सर्व थाट करतात. कधीं कधीं लांकडाच्या घोड्यावर कोणास तरी बसवून त्याला ओढीत नेतात व त्याच्या भोंवती कांहीं लोकांस श्वापदाचें सोंग देऊन त्याला चित्र विचित्र रंग देऊन बरोबर चालवितात. यांच्या मागें एक मुलांची व एक मुलींची अशा क्रमानें झालेल्या दाट रांगांची एक परंपरा असते. मोठ्या ऐटीनें पण अत्यंत आनंदोल्हासानें तालावर समतोल पाय उचलून अत्यंत कुशल पदलालित्यानें, कधीं रांगांची चित्रविचित्र रचना करीत, कधीं निरनिराळ्या तुकड्या बनवीत, तर कधीं मध्येंच मंडळ घालून फेरे देत देत आपल्या नृत्यकौशल्यानें प्रेक्षकाचें चित्त वेधून मोठ्या थाटानें आंबराइतल्या नृत्यांगणांत प्रवेश करतात. या नृत्याचें नांव खारिया असें आहे. हें नृत्य ओरावन लोकांचेंच मूळचें आहे. जरी यांत मुलें मुली सामील होतात तरी पण हें त्यांचें नृत्य नव्हे. सर्व गांवांचे मेळे अशा समारंभानें नृत्यांगणांत एकत्र जमून एक अजस्त्र वर्तुळ तयार होतें. ढोल व वाद्यें हीं त्या वेळेस बाजूस ठेवतात व आवाजानेंच फक्त ताल धरतात. या ओरडण्यांत शेकडों नव्हे तर हजारों लोकांचे ध्वनी मिसळतात व त्याचा मनावर फार मोठा परिणाम होतो. या बृहद्वर्तुलांत असणार्या अनेक तुकड्या जरी फार खचून भरलेल्या असतात तरी मंडलें फिरणें, पायाच्या तालावर उठणें व बसणें अगदीं नियमानें कवाइतीच्या धर्तींवरच चालू असतें. मध्यें मध्यें समेवर मात्र ‘हुरूरू’ नांवाची उसळी सर्व जनसमूह एकदम घेतो व जमीनीवर सर्व लोक एकदम खालीं येतात. त्यांच्या पायाचा ध्वनी फारच गंभीर असतो. हरूरूनंतर थोडी विश्रांति घेऊन कोणाच्या तरी मोठ्या आरोळीनें पूर्वीचाच क्रम पुन्हां सुरू होतो. व थकेपर्यंत असेंच नृत्य चालतें. मग बृहद्वर्तुळ मोडून निरनिराळ्या गांवच्या टोळ्या अलग होतात. व संध्याकाळपर्यंत अलग अलग स्वतंत्र असें नृत्य करीत करीत आपआपल्या गांवीं जातात. बहुधा रात्रभर ते आपलें नृत्य तेथेंच चालवितात. दुसर्या प्रकारच्या नृत्यांत मुलींची रचना त्यांच्या उंचीप्रमाणें करतात. सर्वात उंच मुलगी एका टोंकास व ठेंगणी दुसर्या टोंकांस अशा अनेक रांगा करतात आणि एकमेकांचे हात घट्ट धरून तालावर बिनचुक नाचतात व सर्व समूह एका माणसाप्रमाणें उड्या घेतो. हे लोक फार सहवासप्रिय आहेत. सर्वांच्या सोबतींत यांनां आयुष्य घालवावेसें वाटतें. हे मधून मधून एकमेकांस भेटण्यास जातात. कोणी घरीं आला तर तांदुळाच्या मद्याची हंडिया ही त्याच्या समोर ठेवलीच पाहिजे. तसें न केलें तर त्याचा धि:कार करतात. अश्विनापासून चैत्रापर्यंत एकमेकांच्या भेटी चालू राहतात. लग्नकार्यांत वरपक्षाला ४० मद्याच्या हंडिया एका दिवसाकरितां तयार कराव्या लागतात. प्रत्येक घरांतून यथाशक्ती लग्नमंडपांत मद्य पोंहोचतेच. ३० घरांच्या गांवांत दीड दिवसांत ८०० शेर दारू फस्त होते.
हे लोक नृत्याकरितां प्रसिद्ध आहेत. सूर्यास्तापासून रात्रभर व सकाळपर्यंत हे गांवोगांव नाचत जातात. मद्यानें व गाण्यानें सकाळपर्यंत उन्मत्त होतात व जास्त जास्त वेगानें नृत्य करीत सुटतात व सूर्योदयाच्या सुमारास यांस जास्त वेग येतो. अखेरीस सोसाट्याच्या वार्यासारखे साळीच्या शेतांतून नाहींसे होतात व एखाद्या खड्यांत दमून पडतात. मुली अशाच उन्मत्त होऊन तरूण मुलांच्यां सहवासाला कंटाळेपर्यंत नृत्य करतात व बहुधा सर्व उत्सव लवकर संपला म्हणून हिरमुसल्या व अस्ताव्यस्त पोषाखानें घरीं परत येतात. सर्वांत अत्यंत आश्चर्य हें कीं हे लोक तडक आपल्या शेतांवर काम करण्यास तयार असतात व रात्रभर गाढ झोंपच जणूंकाय झाली अशा ताज्या दमानें शेताचें काम करतात. दुपारीं ११ वाजता घरीं येऊन भाकर खातात व सोप्यांत गाढ झोंपी जातात, आणि कोणी हालवून हालवून जागे करीपर्यंत निजतात व जागे झाल्यावर डोळे चोळीत पुन्हां कामावर जातात.
हे बाहेरच्या लोकांस आतां आपल्या समाजांत घेत नाहींत. पुरूषास जातींतून बाहेर करण्यासारखा कोणताच अपराध यांच्यांत नाहीं. ओरावनखेरीज कोणा इतर माणसाबरोबर राहणार्या बाईस मात्र जातींतून काढतात. यांच्या पंचाइतींतल्या सरपंचास पडना असें म्हणतात. हिंदुलोकांत यांचा दर्जा फार हलका आहे. गोंडांसारखे हे देखील स्वत:ला रावणवंशी म्हणवितात. लंकादहनाच्या वेळीं मारूतीच्या शेपटास सर्वांचे कपडे बांधले तेव्हांपासून आमच्या जवळ कपडे नाहींत असें हे सांगतात.
हे लोक फार प्रामाणिक व आनंदी आहेत. यांनां काम करण्याची हौस आहे. साधी कैद झालेला ओरावन हौसेनें काम करणार्या कैद्यांत जातो. ऊन, थंडी, वारा या सर्व ऋतूंत हे आपल्या कामास आनंदानें जातात व आपल्या डोक्यांत फुलें घालून एकमेकांचे हात धरून आलिंगन देऊन नाचत गात परत घरीं येतात. यांच्यापैकी ५/२ लोक ओरावन भाषा बोलतात.