विभाग नववा : ई-अंशुमान
अंतर्गळ - (अंत्रवृद्धि) अंत्रनि:सरण (हर्निया) हें नांव ज्या रोगांत आंतड्याचा कांहीं भाग उदरांतून क्षीण झालेल्या स्नायूंतील मार्गावाटें बाहेर पडून अंडाशयांत उतरतो व ज्यामुळें अंडाशय मोठा दिसतो त्या रोगास लावितात; व म्हणून याच्या अनेक नांवांपैकीं अंत्रनि:सरण हें नांव अन्वर्थक आहे कारण नि:सरण म्हणजे एखादें इंद्रिय एखाद्या पोकळींतून रोगामुळें अगर इजेमुळें बाहेर येणें हा प्रकार मस्तिष्कनि:सरण, फु:प्फुस नि:सरण अशा व्याधींच्या उदाहरणावरून उघड होतो. तथापि प्राय: हें नि:सरण उदरांतील पोकळीपासून अनेक प्रकारें संभवत असल्यामुळें अंत्रनि:सरणाचे अनेक प्रकार आहेत, यासच कोणी भेगला उतरणें हेंहि नांव लौकिकी भाषेंत देतात. हा रोग प्रगट होण्याचीं स्थानें: (१) ऊरूसंधि म्हणजे जांघाड, (२) मांडीचा वरील भाग, (३) बेंबी हीं होत; व त्या स्थानांवरून (१) ऊरुसंघ्यंत्र नि:सरण (२) ऊरोर्ध्वांगनि:सरण (३) नाभ्यंत्रनि:सरण इत्यादि प्रकारचे नि:सरण अथवा अंतर्गळ रोग पहाण्यांत येतात. त्यांतले त्यांत धाकट्या आंतड्यासारखी सहज हलणारीं जीं इंद्रियें असतात, त्यांचें नि:सरणहि सहज होऊं शकते. आंतड्यांवरील अन्त्रमेदावरण नामक आच्छादन हें दुसरें उदाहरण आहे. व यामुळें रोग प्रगट होऊन जी रोगग्रंथी तयार होते तीमध्यें एक तर केवळ आंतड्यांचा भाग अगर केवळ अंत्रमेदवरणाचा कांहीं भाग अगर कांहीं रोगग्रंथींत अंशत: दोन्ही प्रकारचे भाग आढळतात.
का र णें. - ही रोगप्रवृत्ति होण्यास कारणें :- धाकटें अगर मोठे आंतडें ज्या त्वचेनें उदरांतील पाठीच्या कण्यास बद्ध झालेलें असतें त्या त्वचेची लांबी कांहीं ठिकाणीं फार असल्यामुळें तीं आंतडीं त्या जागीं उदरांत बरींच सुटीं असल्यामुळें व अंत्रमेदावरण हाहि अशाच प्रकारचा चलनशील पडदा असल्यामुळें उदरांतील स्नायूंमध्यें एखादी निर्बल जागा उत्पन्न होतांच तेथें बिळाप्रमाणें मार्ग करून त्या वाटें तें आंतडें अगर पडद्याचा भाग उदराबाहेर पडतो. (१) बराच आढळण्यांत येणारा जो उरूसंघ्यत्रनि:सरण प्रकार असतो त्यांत पुरुषाचे व स्त्रीचे अंडाशयरज्जू ज्या मार्गें उदराबाहेर जातात त्या मार्गानेंहि हें आतडें अगद पडदा बाहेर पडून वृषणाच्या ठिकाणीं अगर जांघाडांत मोठी रोगग्रंथी बनते. (२) त्याचप्रमाणें उदरांतील निर्बल स्नायूंत नवीन मार्गानें मांडींतील मोठ्या रक्तवाहिन्यांच्या आंतील बाजूस रोगग्रंथि बनण्याचा एक प्रकार पाहण्यांत येतो; (३) बेंबीजवळील उदराच्या स्नायुशैथिल्यामुळें अगर उदरांत कांहीं शस्त्रक्रिया पूर्वी केली असल्यास त्यामुळें आलेल्या स्नायु-दुर्बलतेमुळें उदराच्या मधोमध अंत्रनि:सरण होऊं शकतें. हा रोग प्रगट होण्यास जड ओझें उचलणें, उंचावरून उडी मारणें, शौचाचा वेळीं फार कुंथणें, अगर जुनाट खोकल्याचे श्रम होणें यासारखीं उदराच्या स्नायूंवर ताण पडणारीं निमित्तें कारण होतात. वरील कारणांमुळें मध्यपटल नामक उदरांतील मांसल पडदा व उदराचे स्नायू या दोहोंच्या दाबांत आंतडीं अगर अन्य इंद्रियें सांपडल्यामुळें दाब अधिक झाल्यामुळें आंतील इंद्रिय दुर्बल जागीं कृत्रिम मार्ग काढून बाहेर त्वचेखालीं ग्रंथिरूपानें प्रगट होतो. हा रोग उपजत अगर मागाहून कारणपरत्वें होतो. गर्भावस्थेंत स्नायूची व्हावी तशी रचना न बनल्यानें ती एखादे ठिकाणीं कमकुवत राहून एखादें मूल उपजतांच त्यास वरीलपैकीं एखाद्या प्रकारचा अंतर्गळ असतो. मोठ्या माणसांनां वरील प्रकारच्या व्याधीमुळें अगर दुखापतीमुळें मोठेपणीं अंतर्गळ होतो. स्त्रियांपेक्षां पुरुषांनां शारीरिक श्रम अधिक करावे लागतात व त्यामुळें त्यांस दुखापत होण्याचा संभव अधिक असतो; म्हणून स्त्रियांमध्यें या रोगाचें प्रमाण कमी असतें. अण्डरज्जूची जाडी अंगनाण्डरज्जूच्या जाडीपेक्षां अधिक असल्यामुळें ज्या मार्गावाटें ही रज्जू अण्डाशयांत उतरते तो मार्ग अधिक पोकळ व मोठा असल्यामुळें त्या मार्गानें अंतर्गळ सहज उतरतो हें उघडच आहे.
रो ग व र्ण न.- रोगाच्या आरंभीं रोगग्रंथि लहानच म्हणजे मुलें गोट्या खेळतात तेवढ् गोटीएवढी असते. पण पुढें तिचा आकार वाढत जाऊन हळूं हळूं तो लहान मुलाच्या डोक्याएवढाहि होतो. ग्रंथीचे तीन भाग असतात ते असे :- तिची आवरणें, तिची कोथळी अगर कोष व तिचा अंतर्भाग. ज्या भागाच्या दुर्बलतेमुळें अंतर्गळ बाहेर पडतो तेथील त्वचा स्नायु इत्यादींचें आवरण बनतें. उदाहरणार्थ मांडीतील अंतर्गळा मध्यें आंतील गांठीच्या दाबामुळें ताणल्या गेलेल्या त्वचा स्नायु वगैरेंचें आवरण बनलेलें असतें व या ग्रंथींत वारंवार सूज दाहक्रियादि घडत असल्यामुळें हें आवरण उत्तरोत्तर बरेंच जाड होत जातें. रोगग्रंथीची कोथळी हें नांव ज्यास दिलें आहे तें या आवरणाच्या आंत असून उदराच्या पोकळीचें अंतराच्छादन करणारासहि अंत्रावरण नामक जी त्वचा असते तिची ही कोथळी बनलेली असते; तथापि स्नानपरत्वें कांहीं रोगग्रंथींमध्यें ही कोथळी नसतेहि कोषग्रीवा म्हणजे कोथळीच्या वरील जो तिचा अरुंद भाग असून ज्याचा उदरांतील अंत्रावरणाच्या मोठ्या पोकळीशीं संबंध असतो तो होय. सुजेमुळें व दाहक्रियेमुळें ही ग्रीवा जाड व कठिण बनते व भोंवतालच्या भागांत रुतून बसलेली असते. शस्त्रक्रियेच्या वेळीं ती सोडविण्यास अडचण पडते. सर्वांच्या आंत ग्रंथीचा अंतर्भाग आंतडें, अंत्रावरणांतील वसा व लेंकरांतील रोगामध्यें क्वचित अंगनाण्ड यांच्या योगानें बनलेला असतो.
रोगांतील ग्रंथि उदरांत परत ढकलतां येत असेल अगर नसेल त्यावरून निरवरोधित व आवरोधित असे दोन प्रकारचे अंतर्गळ पहाण्यांत येतात. कांहीं रोगग्रंथी आल्यामार्गानें पुन: उदरांत सहज परत ढकलतां येतात तर कांहींनां याप्रमाणें परतवण्यास फार त्रास पडतो. नेहमीं सहज परतवतां येण्यासारखा अंतर्गळ केव्हांहि एकाएकी अवरोधित प्रकारचा बनतो; म्हणजे तो आंत नेहमींप्रमाणें जाईनासा होतो. याचीं कारणें बहुधा अशीं आहेत कीं त्यांतील वसामय अंतर्भाग भोंवतालच्या स्नायू वगैरे रचनेंत दाह व सुजेमुळें चिकटून बसतो व दुसरें कारण त्यांतील आंतडें नेहमींपेक्षां फुगीर व मोठें होतें. या रोगप्रकाराला अवरोधित म्हणण्याचें कारण त्यांतील रक्तप्रवाह अरुंद कोषग्रीवेवरील दाबामुळें कुंठित होण्यास प्रारंभ होतो व येणेंप्रमाणें ही कुंटित झालेली गति प्रथम बेताचीच असते खरी; परंतु लवकरच तिचे दुष्परिणाम घडूं लागतात. आपण आपलें बोट कांहीं वेळ दोरीनें गच्च आंवळून बांधलें तर त्यांतील रक्त कोंडलें गेल्यामुळें तें फुगीर दिसतें. तसेंच या रोगाच्या कोथळीचें होऊन त्यांतील आंतडें फुगतें. दाब बेताचाच व थोडा वेळ असेपर्यंत फक्त आंतड्यांत फक्त रक्ताधिक्य होतें पण तोच दाब तसाच चालू राहिल्यास दाहास व सुजेस आरंभ होतो; व नंतर त्यांत जंतुप्रवेश होऊन पूयोत्पत्तीहि होते. ज्या मानानें कोषग्रीवेवर दाब पडेल व ज्या मानानें रोमजंतु कमी अगर अधिक विकारी असतील त्या मानानें रक्ताधिक्यापासून तों पूयोत्पत्ति होणारें स्थित्यंतर अंमळ सावकास अगर अतिजलद होतें. अंतर्गळाची रोगग्रंथि जर शीघ्रतेनें प्रगट झाली असली तर आंतडें किंवा आंत्रमेदावरण याची स्थिति शीघ्रतेनेंच बिघडून रोगाचीं भयंकर लक्षणें दिसूं लागतात. कोषेग्रीवा सुजून व फुगून त्या दाबामुळें आंतड्यांत होणारें रक्ताभिसरण नीट चालत नाहीं हें वर सांगितलेंच आहे. अशा प्रकारची अवस्था बहुधा जांघाडांतील अंतर्गळाची होते. याशिवाय ज्या मार्गावाटें अंतर्गळ उदराबाहेर पडतो त्याच्या मार्गाच्या बाजूकडे असणारे स्नायू वगैरे रचनेचा दाब पडून आंतड्यांतील रक्ताभिसरणास अवरोध होऊन आंतडें कुजण्याची भीति प्राप्त होते. निरवरोधित म्हणजे परत उदरामध्यें ढकलतां येण्यासारखा अंतर्गळ या प्रकारची रोगग्रंथि मऊ व सहज दाबातां येणारी असते. तींत आतडें असलें तर ती पोकळ लागते व दाब कमी केला असता पुन: रबरी चेंडूप्रमाणें ती पूर्ववत होते; पण तींत आत्रमेदावरण असलें तर कणकीच्या गोळ्याप्रमाणें मऊ परंतु भरीव अशी हातास लागते. रोग्यास उभा केला तर गाठ मोठी होते व त्यास निजविला तर गांठ लहान होते, व रात्रीं तिच्यामुळें रोग्यास कधीं त्रास होत नाहीं. ती चिमटींत धरून रोग्यास खोकण्यास सांगितलें तर बोटास गाठ फुगलेली कळते. आणि ती उदरांत परत लोटली असतां आतडयांतील 'गुरगुर' आवाज करणारी खळबळ बोटांनां समजते. या प्रकारचें अंतर्गळ उदरामध्यें वरील कोणत्याही जागीं होऊं शकतात. जांघाडांतील कटिरास्थिपासून जननेंद्रियापर्यंत असणारें जाड (पूपार्टचें) स्नायुबंधन आहे त्याच्या अंमळ वर ही गाठ असते. अगर ती बेंबीमध्यें किंवा बेंबीशेजारींहि उगम पावतें. ही जांघाडातील गांठ मोठी झाली म्हणजे अण्डाशयांत उतरते व मांडीतील अंतर्गळ असल्यास ती मोठी ती मोठी झाल्यावर वरतीं उदराकडे सरते. या प्रकारच्या अंतर्गळास तात्पुरता उपाय करण्यासाठीं ही रोगग्रंथी परत उदरामध्यें लोटावी; आणि ती पुन: खालीं येऊं नये म्हणून प्रतिबंधक पट्टा नेहमी वापरावा अगर रबरीबंधनाच्या योगें त्याच्या मार्गावर दाब ठेवावा. रोग्याचें वय जितकें लहान असेल त्या मानानें केवळ पट्टा वापरून रोगमुक्त होण्याचा संभव अधिक असतो. रात्रीं निजतेवेळीं पट्टा काढून ठेवण्यास हरकत नाहीं; पण सकाळीं अंथरुणावरून उठण्याच्या अगोदर तो पुन: घालावा. अशा तर्हेनें त्यास एकदां आंत लोटल्यावर खालीं येऊं न दिलें तर हळू हळू तो मार्ग बुजून रोगी कायमचा रोगमुक्त होण्याचा अधिक संभव असतो. परंतु वस्तुस्थिति अशी पाहण्यांत येतें कीं कित्येक अठवडेपर्यंत अंतर्गळ पट्टा वापरून खालीं न आल्यानें मार्ग थोडाबहुत बुजतो न बुजतो इतक्यांत रात्रीं खोकल्यामुळें किंवा एका कुशीवरून दुसर्या कुशीवर वळताना अगर अन्य कारणामुळें ग्रंथि पुन: बाहेर आल्यामुळें तो मार्ग पुन: उघडला जाऊन कित्येक महिन्यांत झालेली मार्ग बुजण्याची क्रिया फुकट जाते. हें असें होणें साहजिक व अपरिहार्य आहे व म्हणून कायमचें रोगमुक्त होण्यासाठीं शस्त्रक्रिया करणें जरूर असतें. या शस्त्रक्रियेस बरेंच कौशल्य लागतें व ते पुढील तत्त्वावर करण्यांत येते. प्रथम रोगकोष रिक्त करून मग तो सबंध काढून टाकतात व बळकट टांके घेऊन रोगमार्ग शिवून बंद करतात. शस्त्रक्रियेनें या रोगाच्या उपायांत मोठीच क्रांति घडवून आणली आहे. पट्ट्याचा उपाय फार दिवस लागणारा व त्यामुळें रोग्यास कंटाळा आणणारा आहे. यासाठीं ज्या दुर्बल रोगमार्गनें उदरांतून अंतर्गळ बाहेर पडला आहे, तो मार्ग शस्त्रवैद्य शस्त्रानें उघडून रोगाची कोथळी रज्जूनें बांधून नंतर ती कापून काढितो व अंतर्गळ उतरण्याचा मार्ग स्नायूंत जाड व बळकट टांके मारून बंद करून टाकतो. या शस्त्रक्रियेंत जीवास बहुधा आपाय नसतो; रोगी त्रास व काळजीपासून मुक्त होऊन इतर निरोगी माणसाप्रमाणें इच्छेस वाटेल तो कामधंदा करण्यास उपयोगी होतो. शस्त्रक्रिया ज्यावर करतां येणार नाहीं असे अंतर्गळ फार थोडे असतात. ज्या मुलांना अंतर्गळ असेल त्यानीं विनाकारण जन्मभर पट्टा वापरून व शारिरिक सामर्थ्य वाढविणारे खेळ, व्यायाम यापासून दूर राहून आपल्या आरोग्याचें नुकसान करून न घेतां शस्त्रक्रिया करून घ्यावी हें चांगलें.
अ व रो धि त म्ह ण जे उ द रां त प र त जा त न स ले ला अं त र्ग ळ. - वर सांगितलेल्या जागांपैकीं एखाद्या जागीं मोठी व बरेच दिवसांनी जुनी रोगग्रंथि असून ती उदरामध्यें सगळी अथवा अर्धीमुर्धी देखील परत जात नाहीं तिला हें नांव आहे. ही गांठ परत न जाण्याचीं कारणें तिचा मोठेपणा हें एक व दुसरें ती चिकटून व सुजून तींत आलेलें कठिण्य हीं आहेत व असा अंतर्गळ म्हणजे एक जिवावरचें निरंतरचें संकट आहे असें समजावें. कारण गांठ मोठी असल्यामुळें व ती शरीराच्या अग्रभागीं असल्यामुळें तीस दुखापत, आघात वगैरे होण्याचा संभव असतो; तिचा आकार वाढत्या प्रमाणावर असतो. तिच्या मार्गाच्या दाबामुळें अगर तींतील आंतडीं वगैरे भाग सुजून त्या दाबामुळें आंतड्यांतील रक्ताभिसरणास प्रतिबंध होऊन आंतडें निर्जीव होत गेल्यानें मरणाचें भय ओढवतें. त्यापासून रोग्यास नेहमीं पोटांत कोणी ओढल्यासारखा भास होतो. शूळ, अजीर्ण व बद्धकोष्ठ या व्याधी असून त्यामुळें अंतर्गळांत आंतडें जेवढें अडकलें असेल त्यांतून मळ पुढें जाणें अशक्य होऊन नळावरोध म्हणजे मलशुद्धि अगदींच बंद होणें हा भयंकर रोग होतो. जेव्हां असल्या प्रकारचा अंतर्गळ आपोआप अगर थोड्या दाबानें दुखूं लागतो तेव्हा त्या जागीं तरी निदान अंत्रावरणदाहास प्रारंभ आहे असें समजावें. व अशी स्थिति रोग्यास प्राप्त झाली तर त्यास मोठी भीति असल्यामुळें त्यावर लक्ष ठेवणें फार जरूर असतें. खरें म्हटलें तर शस्त्रक्रिया करणें अशा वेळीं उत्तम होय. या प्रकारच्या अंतर्गळावर तात्त्पूरते इलाज करावयाचे असतील तर ती रोगाची गांठ मावेल अशा प्रकारचा प्रतिबंधक पट्टा गांठ मोठी न व्हावी म्हणून वापरावा. खाण्यापिण्यांत अनियमितपणा व आचरटपणा अगदीं वर्ज करावा व मलशुद्धि नियमानें होण्याची तजवीज ठेवावी. अशा माणसांचें जीवित सदा धोक्यांत असल्यामुळें कायमच्या रोगमुक्तीसाठीं शस्त्रक्रिया करून घेण्यास रोगी कबूल झाला तर उत्तम गोष्ट आहे. अशा वेळीं शस्त्रवैद्य उदर चिरून रोगग्रंथि उघडी करतो; नंतर शस्त्रानें कोथळी उघडून आंत्रमेदावरणाचा कांहीं भाग चिकटला असल्यास तो त्याचीं बंधने कापून काढतो; जें आंत्रमेदावरण अति कठिण झालें असेल तें गच्च बांधून कापून काढतो. नंतर उदरांत आंतडें परत लोटून कायम रोगमुक्तिसाठीं रोगमार्ग जाड व बळकट टांक्यांनीं बंद करून टाकतो.
निरोधित ग्रीवांतर्गळ म्हणजे वरीलपैकीं कोणत्याहि प्रकारचा अंतर्गळांतील आंतड्यावर अगर आंत्रमेदावरणावर रोगकोषग्रीवेचा दाब पडून रक्ताचा पुरवठा बंद झाल्यामुळें जेव्हां हे भाग निर्जीव होऊन तुटून पडण्याच्या बेतांत येतात त्या स्थितींतील अंतर्गळ. मळमळ, पित्ताची वांती, नंतर मळासारखी दुर्गंधिमय वांति, बेंबीजवळ पिळल्याप्रमाणें आग होणें, मलोत्सर्जन व अपानवायु हे अजीबात बंद होणें, सुतासारखी बारीक अशक्तनाडी, व गांठीवर अंमळ दाबल्यानें फार वेदना, पोटास मोठी फुगवटी येऊन चेहरा ओढल्यासारखा व अति चिंतातुर दिसणें, पोटाचे स्नायू ताठणें, वैद्यानें ग्रंथि बोटांच्या चिमटींत धरून रोगी खोकल्यानें वैद्याच्या बोटास त्या खोकण्याच्या आघाताचें ज्ञान न होणें हीं या रोगाचीं लक्षणें होत. शेवटच्या लक्षणाचें कारण असें आहे कीं गांठींत असणार्या आंतड्याचा उदरांतील आंतडयांशीं रुधिराभिसरण बंद झाल्यानें संबंध तुटल्याप्रमाणें होऊन खोकण्याच्या क्रियेच्या आघाताचें ज्ञान बोटास पोचूं शकत नाहीं. कधीं कधीं वेदना व दु:ख हीं गाठींत नसतातहि; आणि बहुधा रोगी वृद्ध असल्यास वरील सर्व लक्षणें इतकीं तीव्र नसतात. यासाठीं कोथळीच्या ग्रीवेवरील दाब सोडविणें झालें नाहीं तर आठ दहा तासापासून ते आठ दिवसांच्या आंत गांठीमध्यें काळेपणा उत्पन्न होऊन, आंत दुर्गंधित वायु व पू होतो व आंतड्यांतील ही घाण उदरांत जाऊन ती फुटण्यास आरंभ होतो. रोग्यास उचकी लागते. शक्तिपात पराकाष्ठेचा होतो; व घाणीमुळें दूषितजंतुजन्य सन्निपातज्वर येऊन रोगी बेशुद्धि, झांपड, ग्लानि यांमुळें मरण पावतो. अशा या निरोधितग्रीवांतर्गळावर शस्त्रक्रियेनें उपाय करण्यांत लवकर आलाच पाहिजे; व्यर्थ कालापव्यय करण्यांत हांशील नसतें. ग्रंथीवर अगोदर बर्फ ठेऊन कांहीं वेळानें ती परत लोटतां आल्यास पहावी; नाहींतर क्लोरोफार्मनें गुंगी आणवून त्या गुंगींत रोगी असतांनाच पुन: तसा प्रयत्न करावा व तो न साधल्यास शस्त्रवैद्यानें उदर चिरून रोगाच्या कोथळीच्या ग्रीवेवर जो दाब पडून आंतड्यांतील रुधिराभिसरण बंद होतें तो दाब सोडवावा अगर कापून काढावा; नंतर आंतडें उदरांत लोटून त्याचा नि:सरणमार्ग टांक्यांनीं बंद करावा. याखेरीज अन्य इलाज नाहीं. अगोदर बर्फ ठेवण्याचा अगर नुसत्या बोटांनीं तो उदरांत ढकलण्याचा प्रयत्न तरी फक्त त्या गुंगींत असतांना थोडावेळ शस्त्रवैद्यानें करावा. बोटांच्या कमीजास्ती धक्क्यानें रोगग्रंथींतील अंतर्भागास इजा होते, म्हणून शस्त्रवैद्यलोकांत अशी म्हणच पडली आहे कीं ''फार हाताळला न गेलेला अंतर्गळ शस्त्रवैद्यास यश देतो.'' म्हणजे ज्यांत असे प्रयत्न करण्यांत वेळ दवडला आहे असे रोगी कदाचित् दगावतात. हातानें अंतर्गळ उदरांत पद्धतशीर तर्हेनें लोटण्याचा प्रयत्न केला तर तो कधीं कधीं साधतो. ज्या दिशेनें तें इंद्रिय (आंतडे) खालीं उतरलें आहे ती दिशा प्रथम ध्यानांत आणून त्याच्या उलट दिशेकडे अंतर्गळ दाबीत न्यावा. जांघाडांतील अंतर्गळ दाबतांना तो वर, जरा बाहेरच्या अंगाला व मागें लोटावा. मांडींतील अंतर्गळ प्रथम खालीं दाबीत आणून नंतर तो मागें दाबून मग पुन: वर परंतु जरा बाहेरच्या अंगास लोटावा. अंतर्गळ मोठा असला तर असा प्रयत्न त्या रोगग्रंथीस सहन होऊन तो उदरांत जाण्याचा संभव असतो; व जितका अंतर्गळ लहान असेल तितकी त्याची परत लोटतांना स्पर्श सहन करण्याची पात्रता कमी असते व या क्रियेस वेळ लागल्यामुळें त्यास इजा होते. लोटण्याची अगर दाबण्याची जी कांहीं क्रिया करणें असेल ती अत्यंत कोमलतेनें व सौंम्यपणें केली पाहिजे व ती गांठ हस्तक्रियेनें परत जात नाहीं असें शस्त्रवैद्यास वाटतांच त्या गांठीवर येणारी सर्व त्वचा स्नायु वगैरे रचना कापून, नंतर मोठ्या सावधगिरीनें गांठीचीं आवरणें कापावीं; म्हणजे त्यास रोगकोष सांपडेल. नंतर हा कोष कापून उघडा करावा आणि ज्या स्नायू वगैरे रचनेचा दाब त्या कोषाच्या ग्रीवेवर म्हणजे अरुंद भागावर पडत असेल ती रचना शस्त्रानें कापल्याबरोबर तेथच्या आंतड्यांतील बंद झालेलें रुधिराभिसरण पूर्ववत होईल व आंतडें कुजण्याची भीति मोडेल पण हें करतांना आंतड्यास इजा न होण्याविषयीं त्यानें जपावें. आतां यापुढें हें खालीं सरलेलें आंतडें परत उदरांत लोटावयाचें असतें. परंतु तसें करण्यापूर्वी त्यानें तें नीट तपासून पहावें. त्याचें तेज कमी झालेलें दिसलें, वर्ण काळसर असला व त्यास घाण येत असली तर त्यांत कुजण्याच्या क्रियेस आरंभ झाला असावा अथवा तें कुजून त्यांत पू झाला असावा असें अनुमान करण्यास हरकत नसते. असलें आंतडें उदरांत लोटल्यानें तें गळवाप्रमाणेंच फुटून उदरामध्यें अंत्रावरणदाहरोग उत्पन्न करून त्यामुळें रोगी मरण पावेल. यासाठीं कुजलेला भाग कापून निरोगी आंतड्याचीं शेवटें बारीक टांक्यांनीं शिवून जोडावींत; व रोगट आंत्रमेदावरणाचे तुकडे अगोदर बांधून कापून काढावेत. विकारी जंतूच्या बाधेमुळें यानंतर आंत्रावरणदाहज्वर झाल्यास कढत पाण्यांत एप्समसाल्ट हा क्षार विरघळवून तो वरचेवर देऊन मलशुद्धि करीत जावी.
निरवरोधित अंतर्गळ ज्यांनां आहे त्यांनीं ज्यानें अंतर्गळ न उतरेल व जो अंगास न खुपेल असा प्रतिबंधक पट्टा पैदा करून वर वर्णन केल्याप्रमाणें निजण्याची वेळ खेरीज करून तो सदा वापरावा. अंतर्गळ निरोधित झाल्याचीं लक्षणें माहीत करून घेऊन ती झाल्यास ताबडतोब शस्त्रवैद्यास बोलवावें व त्या शस्त्रवैद्यानेंहि शस्त्रक्रिया करण्याच्या तयारीनेंच यावें. कारण कोणीहि उशीर केल्यास रोग्यास प्राणास मुकावें लागतें हें ध्यानांत ठेवावें. अगर आतुरालयांत जाऊन तेथें शस्त्रक्रिया करावी.
आ यु र्वे दी य वि वे च न.- गति बंद झाल्यामुळें कुपित झालेला वायु सूज व शूळ उत्पन्न करून शरीरभर संचार करीत करीत शेवटीं जांघाड्यांतून वृषणांत जाऊन वृषणांत वहात येणार्या शिरांस अतिशय पीडा करून वृषणाची वृद्धि करतो. वातवृद्धि, पित्तावृद्धि, कफवृद्धि, रक्तवृद्धि, मेदोवृद्धि, मूत्रवृद्धि, अंत्रवृद्धि असा हा वृद्धिरोग सात प्रकारचा आहे.
मूत्रवृद्धि व अंत्रवृद्धि हे रोग वस्तुत: वायूपासूनच होतात. परंतु त्यांच्या जवळच्या कारणांवरून हे निराळे भेद केले आहेत. याचप्रमाणें मेदोवृद्धि व रक्तवृद्धि हे तरी कफ व पित्त यांपासूनच होतात. परंतु त्यांत मेद व रक्त हीं जवळचीं कारणें असल्यामुळें हीं निराळीं नांवें त्यांस दिलीं. वातजवृषणवृद्धींत वृषण वारा भरलेल्या पखालीप्रमाणें हातास लागतो. तो रुक्ष असतो आणि कारणावांचून त्यांत ठणका होतों.
पित्तवृद्धींत वृषण पिकल्या उंबरासारखा असतो. त्यांत दाह होतो, तो हातास कढत लागतो व पिकतो. कफवृद्धींत वृषण हातास कठिण, थंड, स्निग्ध लागतो, व जड असतो, खाज सुटते, आणि ठणका फार नसतो. रक्तवृद्धींत पित्ताचीं लक्षणें असतात आणि शिवाय वृषणावर काळे फोड येतात. मेदोवृद्धींत कफवृद्धीचीं लक्षणें असून वृषण मात्र ताडगोळ्याप्रमाणें मृदू असतो. ज्यास नेहमीं लघवी कोंडण्याची संवय असते अशा मनुष्यास मूत्रवृद्धि होते. यांत वृषण पाण्यानें भरलेल्या पखालीसारखा होतो. आणि चालतांना डुचमळतो, व किंचित ठणका लागतो. तो मृदु असतो. याशिवाय वृषण फार वाढल्यामुळें शिस्नासभोंवती त्याचें एक प्रकारचें कडें होऊन शिस्न आंत दबतें आणि त्यामुळें मूत्रकृच्छ होतें.
वातप्रकोपक हा आहारानें, थंड पाण्यांत डुंबल्यानें, उपस्थित वेग थांबविल्यानें व अनुपस्थित वेग बळेंच प्रवृत्त केल्यानें, ओझें वाहिल्यानें, मार्ग चालल्यानें, वेडीं वांकडीं अंगें केल्यानें व पूर्वी सांगितलेल्या, प्रकोपक कारणांनीं वायु कुपित होऊन लहान आंतड्याचा कांहीं भाग दडपून त्याच्या जागेवरून खालीं घेऊन जातो. आणि जांघाड्याच्या संधींत गांठीसारखी सूज उत्पन्न करतो. त्या सुजेची हयगय केली असतां तो वायु तें आंतडें अंडांत घेऊन जाऊन अंडाची वृद्धि करितो. यांत पोट फुगतें, कळा लागतात, मळाचा अवष्टंभ होतो, वृषण दाबला असतां वायु शब्द करीत आंत येतो. आणि सोडल्यावर पुन्हां अंडांत येऊन त्यास फुगवितो. हा अंत्रवृद्धि किंवा प्राकृत अंतर्गल नांवाचा रोग असाध्य आहे. यांत वातवृद्धीचींच लक्षणें असतात.
चि कि त्सा - अंडवृद्धीच्या सर्व प्रकारांत सारक औषधें देणें, शेकणें, पिकवणें, व पिकल्यावर जखम भरून येणारीं व पू काढून टाकणारीं औषधें लावणें हे सामान्य उपचार आहेत.
मेदाच्या अंडवृद्धीवर मेद घालविणारीं तेलें व्रण भरून येईपर्यंत लावावीं.
मूत्रजन्य अंडवृद्धीस स्निग्धस्वेद करून फडक्याच्या पट्ट्यानें गुंडाळून शिवणीच्या खालीं उदराप्रमाणें वेध करून पाणी काढून टाकावें आणि व्रणावर स्थगिकाबंध बांधून तो भरून आणावा.
अंत्रवृद्धीवर आंतडें अंडांत उतरलें नसल्यास चिकित्सा करावी. यावर सुकुमारक घृत हें औषध (अष्टांग हृदयांत सांगितलेलें) चांगलें आहे.
स्नेहपान, रेचकें, अनुवासन व बस्ती यांनीं अंत्रवृद्धि बरी न झाल्यास प्रथम बस्ती देऊन नंतर वायूचा मार्ग बंद करण्याकरितां जांघाड्यांतील गांठीवर प्रथम डाग द्यावा. ज्या बाजूस रोग असेल त्या बाजूच्या आंगठ्याच्यावर मागच्या अंगास जो दोरासारखा पिंवळा स्नायु आहे तो अर्धचंद्राकार वांकलेल्या सुईनें वर उचलून तिर्कस चिरून त्यावर डाग द्यावा. कित्येकांच्या मतें करंगळीच्या शेजारच्या बोटावरचा स्नायु डागावा [चरक, वाग्भट, योगरत्नाकर].