विभाग अकरावा : क ते काव्य
काव्य - हा शब्द संस्कृत कविशब्दापासून साधलेला आहे. कवि म्हणजें शहाणा, विचारी मनुष्य, ॠषि असा मूलार्थ बसून पुढें त्याला पद्यकार असा अर्थ आला. कल्पनेचे बोल, अंतःशक्तीची खळबळ व मानववंशाच्या प्रगतीला सहाय्यक अशा श्रेष्ठ व आद्य मानवी सामर्थ्यांपैकी एक, अशा व्यापक दृष्टीनें काव्याकडे पाहिल्यास भौतिक शास्त्रांप्रमाणेंच काव्यानें जगांत एक महत्वाची कामगिरी बजाविली आहे असें दिसून येईल. इंग्लंडसारख्या कांही राष्ट्रांच्या वाङ्मयांत तर काव्याचेंच प्राबल्य असतें. कांही कांही कवींनांहि हेंच महत्व आलेलें दिसतें.
वेदांसारखी जागतिक व राष्ट्रीय काव्यें ज्ञानकोशांत स्वतंत्रपणें विवेचिलेली आढळतील. मोठमोठ्या कवींची चरित्रेहि ज्ञानकोशांतें घेतली आहेत. निरनिराळ्या भाषांतील काव्य त्या त्या भाषावाङ्मयांत दिलेंच आहे. तेव्हा या ठिकाणी काव्यावर थोडें सामान्य विवेचन, व संस्कृत आणि मराठी काव्यासंबंधी सामान्य टीका पहाण्यास मिळेल. हा विषय इतका व्यापक व भानगडीचा आहे की, यावर जितकें लिहावें तितकें थोडेंच होणार आहे. तथापि संक्षेपरूपानें पुढील विवेचन केलें आहे.
काव्य म्हणजे काय ? - काव्याची व्याख्या करणें अत्यंत कठिण आहे. कोणत्याहि वाङ्मयांतील व्याख्या समाधानकारक वाटणार नाहीं हें खास. थोडक्यांत कल्पना द्यावयाची म्हणजे भावना आणि लय यांनी युक्त असलेल्या भाषेंत उच्चारलेले मानवी मनाचे मूर्त आणि चतुर असे जे बोल, त्यांनां काव्य म्हणतां येईल. जर एखादी साहित्योक्ति मग तिचा विषय कोणताहि असो, हृदय उचंबळण्याला लावीत नसेल तर तिला काव्य हें नांवच शोभणार नाही, एवढें तरी सर्वांना पटेल. जें कांही कवीला सांगावयाचें असेल तें त्यानें स्पष्टपणें मूर्तस्वरूपांत मांडलें पाहिजे. एरव्हीं त्याच्या कल्पना लोकांनां कळणार नाहींत हें उघड आहे. तसेंच काव्यनिपुणाला धंदोबद्ध भाषेंत कविता करण्याची साहजिकच स्फूर्ति होते. कांही टीकाकार म्हणतात म्हणतात कीं, काव्याला छंदोबद्ध किंवा लयात्मक रचना आवश्यक नाही. दुसर्या कांहीच्या मतें गद्यरचनेला लागणारें भावनात्मक व बौद्धिक जीवन काव्यालाहि लागत असून शिवाय त्याला लयात्मक जीवनहि अत्यावश्यक आहे.
काव्याचें शरीर किंवा त्याची रचना मोठ्या कुशलतेनें केली असली पहिजे. तसेंच त्यांत कल्पकता असावी. कवीच्या भोंवती एक विशिष्ट वातावरण असून त्यांतून तो जगाकडे पाहतो व काव्य म्हणतो. या वातावरणाला काव्य-कल्पना म्हणतां येईल. खरें काव्य प्रसविण्याला कवीचा आत्मा कांही काळ स्वत:ला विसरून ब्रह्मानंदी बिलीन झाला पाहिजे. असे काव्यसंबंधी तात्त्विक विचार नेहमीं ऐकूं येतात.
काव्य व इतर कला यांतील संबंध - कांही टीकाकार काव्याला चित्रकला व मूर्तिशिल्प यांची दासी बनवितात तर १९ व्या शतकांतील संगीतकलाभिज्ञ वाग्नेरच्या अनुयायांसारखे लोक त्याला संगीतकलेची परिचारिका म्हणतात. ज्यांच्यात कलाविषयक ज्ञान पूर्णपणें प्रगट झालें होतें, त्या प्राचीन ग्रीक लोकांनी संगीत व गद्य यांमध्यें काव्याला स्थान दिलें होतें.
रोमन लोकांत काव्य म्हणजे गाणें, ही जुनी कल्पना रूढ झालेली वारंवार दिसून येते. काव्य व संगीत या दोन कलांत अधिक मैत्री आहे हें उघड दिसतें; पण पुष्कळ वेळा उत्तम कवीहि संगीतानभिज्ञ असल्याचें आपण पहातो. काव्यविवेचकांनां तर संगीताचें फारसें ज्ञान नसतें.
गद्यरचना व काव्य यांसंबंधी बोलतांनां कोलरिजनें एकदां असें ठांसून सांगितलें कीं, काव्याचा खरा विरोध गद्याशीं नसून शास्त्रांशीं आहे. कसेंहि असलें तरी एवढें निश्चित आहे कीं, गद्य कितीहि उत्कट व भावनामय बनविलें तरी त्याचा लगाम नेहमी तर्कशास्त्राच्या हातीं असतो, म्हणजें बांधून ठेविलेल्या विमानाप्रमाणें तें पृथ्वी सोडून जाणें खरोखरीच शक्य नाही उलट ज्ञानाच्या साहित्याशीं काव्याचा कांही संबंध नाही. मानवी आत्म्याशीं संबंध आणला जाईपर्यंतच्या मजकुराला काव्यांत जागा मिळत नाही. ट्रॉयवर चालून येणार्या वीरांचें बल, ऐश्वर्य व अभिमान दाखवीत असेल, तर केवळ गलबतांची यादीहि काव्यमय ठरेल ! संगीत आणि काव्य यांमधील संबंधांत ज्याप्रमाणें संगीतांतून जितकें जास्त उसनें घेतां येईल, तितकें घेणारा व छंदामधून जितकें कमी टाकतां येईल तितके टाकणारा तो सर्वश्रेष्ठ पंडित असें ठरतें. त्याचप्रमाणें गद्यरचना आणि काव्य यामधील संबंधांत, जो गद्यामधून जास्तीत जास्त उसनें घेणारा व पद्यामधून कमींत कमी टाकणारा तो सर्वश्रेष्ट मानिला जातो. प्रत्येक कवि स्वयंस्फूर्तीनें या गोष्टी करीत असतोच व या गद्यपद्यांसंबंधांत दोन्ही बाजूंनां कांही नुकसान येतें. या बाबतीत हल्लीच्या कवीचे तरी दोन वर्ग पडतात. एक, सौंदर्यहानि करून आलापाला प्राधान्य देणारा; व दुसरा, आलापाची हानि सोसून सौंदर्याला प्राधान्य देणारा. याप्रमाणें काव्य हें गद्याच्या साम्राज्यावर स्वारी करितें म्हणावें, तर गद्यहि कधी कधी काव्यप्रवेश आक्रमितें. तेव्हां काव्य करणें निराळें व गद्य, संगीत यांसारख्या कलात्मक विषयांवर ग्रंथ निर्माण करणें निराळें आहे यांत शंका नाही. तथापि या कलांमध्यें परस्परविरोध मुळींच नाही.
छंदसकलेवरील संगीतकलेचें जें वर्चस्व दिसतें त्यांतील महत्वाचा मुद्दा असा कीं, संगीतांत एकतानतेची व्याप्ति मोठी असते. लयाच्या दृष्टीने काव्य जरी संगीताच्या मागे पडतांनां दिसलें तरी,भावना उत्पन्न करण्याचें सामर्थ्य त्यामध्ये आहे हें विसरून चालणार नाहीं. या भावना, विचारांत विलीन झाल्या म्हणजें काव्याची गद्यकलेशी प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होते. अर्थाचें स्पष्टीकरण करण्यासाठी ध्वनीचा उपयोग करून संगीतकलेपेक्षांहि जास्त असें मानवी आत्म्याचें पूर्ण दिग्दर्शन काव्याला करिता येते.
सर्व लयांमध्यें निसर्गाचा लय हा सर्वांत खोल आहे. हा लय म्हणजेच जीवनाचा लय होय. हा गद्य व पद्य या दोहोंतहि अंतर्निविष्ट करितां येतो. इंग्रजी बायबलसारख्या गद्यग्रंथांत हा दिसेल. शेक्सपियरसारखे कवी पद्यांत हा लय स्फुरतात. इतर लयांप्रमाणें हा नियमबद्ध असणारच, पण याचे नियम मात्र लिहून काढतां येणार नाहीत, तर पक्ष्यांच्या आलापात, वृक्षपर्णांच्या कुजबुजण्यांत व समुद्र आणि वायु यांच्या आक्रंदनांत ऐकावयांस मिळेल. गद्य किंवा पद्य कोठेंहि हा निसर्गलय समाविष्ट झालेला असो, तो भाषांतरितां येतो यांत शंका नाही. मनुष्याच्या एकाकित्वाविषयी मनूचें पुढील वचन याच प्रकारचें आहे.
''प्रत्येक मनुष्य जगांत एकटा जन्मतो, एकटा मरतो, सत्कृत्याबद्दल बक्षीस तो एकटा मिळवितो व दुष्कृत्याबद्दल शासनहि एकटाच भोगितो. तो मेल्यानंतर त्याचें शरीर मोडून पडलेल्या झाडाप्रमाणें पृथ्वीवर पडते, पण त्याचे सद्गुण त्यांच्या आत्म्याबरोबर जातात. म्हणून मनुष्याने सद्गुण कमावून जतन करावेत, म्हणजे प्रवासाला अत्यंत कठिण अशा अंध कारांतून जाण्याला त्याला एक अखंड मित्र मिळेल.
येथें भावना व अर्थ यांचें आपोआप चलन होऊन उत्पन्न झालेला लय जगांतील प्रत्येक वाङ्मयांत भाषांतररिता येईल.
चित्रकला व मूर्तिशिल्प यांच्याशी काव्याची तुलना करतां असें दिसून येतें की, निसर्गाच्या नकलेसाठी काव्यांत जें माध्यम योजावें लागतें तें नेहमी शब्दांचेंच असूं शकते. पण काही प्रसंग असे असतात कीं, ते शब्दांनी कधीहि वठवितां यावयाचे नाहीत. या बाबतीत काव्यकला लंगडी ठरते. तेव्हां शिल्पचित्र - कलांप्रमाणें काव्यकलेला भावनांची उत्कटता वठवितां येत नसली तरी भावनांची अनेक प्रकारची अदलाबदल चांगली दर्शवितां येते.
काव्यकलेंतील विविधप्रकार :- सर्व राष्ट्रांच्या काव्यवाङ्मयांतून एकच प्रवृत्ति दिसून येते; कमी जास्तपणाचाच फरक कायतो आढळेल काव्यकल्पनेंत जे दोन अगदी भिन्न प्रकार आहेत. ते म्हणजे (१) शेक्सपियर, होमर वगैरेंत उत्कृष्टपणें दिसणारी काव्यकल्पना, व (२) डांटे, मिल्टन, शेलेसारख्या कवींत आढळणारी काव्यकल्पना. पहिला वैयक्तिक किंवा वीणाकाव्यानें मुळींच नियमित नसून एक श्रेष्ठ नाट्यप्रबंध म्हणून दिसतो; याला पाहिजे तर केवळ 'नाट्य कल्पना' म्हणावें. दुसर्यांत कमी अधिक वैयक्तिक किंवा वीणाकाव्यप्रवृत्ति नियामक म्हणून असते; याला सापेक्ष 'नाट्य' कल्पना म्हणावें. स्तोत्रें, गीतें, शोकगीतें, भावगीतें या सर्वांनां सापेक्षकल्पनेची जरूरी असते. बहुतेक काव्यप्रबंधांत तें वरवर पाहिल्यास केवळ कल्पनोद्वम दिसलें तरी ही सापेक्षकल्पनाच अंतरंगांत वावरत असते. आशिया खंडांतील बहुतेक सर्व वाङ्मयांतून केवळ कल्पनेचा अभाव दृष्टीस पडतो. खरें नाट्य प्रसविण्याची मनःप्रवृत्ति फक्त यूरोपांत सांपडेल असें कांही पाश्चात्य पंडित छातीठोकपणें सांगतात. विश्वांतील अतर्क्य चमत्कार, दैवाच्या अद्भुत लीला व अघटित घटना यांसारख्या गोष्टी आशियाखंडांतील कवीच्या डोक्यांत खेळत असतात. या प्रसंगांत सापडणार्या पात्रांच्या अंगचा चमत्कार किंवा कर्तबगारी त्यांनां दिसत नाही. परंतु ती पाश्चात्य कवींनां कळते; म्हणून त्यांनी आकिलीझ, ओडेसिअस, हेलेन, प्रायम यांसारखी पात्रें निर्माण केलीं असें ते म्हणतात.
सापेक्ष व केवळ कल्पनांत फरक कसा कीं, सापेक्ष कल्पना कल्पित परिस्थितींत कवीच्या स्वतःचें अस्तित्वं जागृत ठेविते; तर केवळ कल्पना त्या कल्पित परिस्थितींत कवीहून निराळ्या व विशेष व्यक्ति कवीद्वारें आपल्यापुढें ठेवते. सापेक्ष कल्पनेचे कवी बाह्यसृष्टि सामान्यपणें रंगवितात, तर केवळ कल्पनेचे कवी निसर्गाशी स्पर्धा करून सामान्यावलोकनाबरोबरच सृष्टीचें विशिष्टावलोकनहि करितात. हें खरें धरून चालल्यास आपणाला काव्याचें व कवींचें वर्गीकरण करण्यास जागा मिळेल. सर्व कवी गायक असतात. या गायकांचे तीन वर्ग पडतात; शुद्ध वीणागायक - यांपैकी प्रत्येक आपल्या एका आवाजानें एकच सूर काढितो; महाकवि हे वृत्तान्त निवेदक व अर्धनाट्य कवी असून आपल्या एकाच आवाजानें अनेक सूर काढतात; व तिसरा वर्ग खर्या नाट्यकवींचा हे अनेक आवाजांनी सर्व सूर गातात.
एक दोन प्रकारांखेरीज काव्यकलेचे सर्व प्रकार सापेक्ष काल्पनेनें पोसलेले असतात. नाट्यकल्पना ही मात्र प्रत्पक्षपणें केवळ कल्पनेंत येते. ईलियडसारखें ग्रीक महाकाव्यहि यांत थोडेंबहुत येऊं शकेल.
संस्कृत प्राकृत - काव्य या शब्दाचा अर्थ कविता असा असून उच्च कल्पनांचा अवलंब करून लिहिलेली कविता असा काव्याचा विशेषार्थ आहे. प्रत्यक्ष वस्तुविषयापेक्षां तीवरील कल्पनेला अधिक महत्व देणें हा असल्या काव्यांचा विशेष होय. भारतीय राजांच्या दरबारी या प्रकारच्या काव्यांची विशेष वाढ झालेली असल्यानें साहजिकच अशा काव्यास बंदिगीतें किंवा सूतकाव्यें असें नांव देण्यास हरकत नाहीं.
रामायण व महाभारत यांमध्यें आढळणारी व पुढें विशेष लोकप्रिय झालेली प्राचीन वीररसपर कविता आरंभी तरी बहुधा या बंदिगीतांच्या अथवा सूतकाव्यांच्या स्वरूपाची होती. सूत अथवा भाट हे असल्या कवितेचे पुरस्कर्ते असून ते राजदरबारीं राहून नृपस्तुति करीत असत. चक्षुर्वैसत्यं या न्यायानें वीरांची कृति पाहण्यास स्वतः समरभूमीवर जाऊन ते योध्यांच्या कृतीसंबंधी काव्य करीत असत. यांचा पंडितजनांपेक्षा योध्यांच्या निकट परिचय असे. वीरांचें सारथ्य करून ते लढाईत प्रत्यक्ष भाग घेत. हीं वीररसप्रधान काव्यें जन्मास आली तो काळ सांस्कृतिकदृष्ट्या फारसा प्रगत झालेला नव्हात. कां की, त्या काळांत युद्धें, आर्ष चालीरीती, शिकार, द्यूत इत्यादि सर्व गोष्टी प्रचलित असून राजांनां यांपासून मोठी करमणूक वाटत असे. उत्सवाचे प्रसंग मोठालीं संमेलनें, विजयोत्सव, सत्रादि प्रचंड यज्ञसमारंभ अशा विविध प्रसंगी हे भाट लोक आपलें काव्य गात असत. पुढें राजदरबारांत जास्त सांस्कृतिक प्रगति होऊं लागल्यानंतर ब्राह्मण संप्रदायांत वाढलेल्या व ब्राह्मणांशी पांडित्यांत अहमहमिका बाळगणार्या विद्वान कवींनीं भाटांची जागा काबीज केली. हे लोक केवळ ऐकीव माहितीवरून युद्धांचीं वर्णनें करीत व त्यांचे लिहिणेंहि ठराविक साच्याचें असे. नावीन्य, कल्पना व प्रतिभा या गुणांपेक्षां पांडित्य व भाषास्वारस्य यांकडेच जास्त लक्ष्य देण्यांत येत असे. (प्रासंगिक उपम देऊन आपल्या व्याकरणाचें पांडित्य दाखविण्यास कालिदास सुद्धां कचरत नसें). अत्यंत कृत्रिम कवितेच्या द्वारां आपल्या आश्रयदात्यांची स्तुति गाणारे प्रशंसाकाव्यप्रवीण लोकच काव्यकलाप्रवीण होते. प्रशंसा हा विषय या काव्यरीतीचा प्रथमविषयच असावा व त्याची वाढहि दरबारांतच झालेली होती. ॠग्वेदांत आपणांस गाथा नाराशंसींचा उल्लेख आढळतो. यावरून या काव्यपद्धतीचें, विशेषतः दरबारी काव्यपद्धतीचें मूळ काय होतें हें समजून येईल. कवी जितकें जास्त श्रम घेत, तितक्या प्रमाणांत त्यांस आपल्या कलेचा अधिक उपयोग करावा लागत असे. ज्या मानानें कवींचीं कलात्मक कृति अवघड असलेल्या मानानें राजांनांहि जास्त खुषामत झाल्यासारखें वाटे.
रामायणांत या तर्हेच्या स्तुतिपर कृत्रिम काव्याचें मूळ सापडते. या काव्याचा आदिकवि वाल्मिकी असून रामायण हेंच असल्या काव्याचें उदाहरण होय. या काव्यपद्धतीचा विशेष काय असतो हें महाकाव्यावरून दिसून येतेच. पण संस्कृत काव्याच्या अभिजात युगाचें जें दरबारी महाकाव्य आहे त्यावरून असें दिसते की, वरील दरबारी काव्यरीतीस त्यावेळी पूर्ण भर आला होता. एवढेंच नव्हे, तर वरील दरबारी काव्यानें भावनात्मक कविता, चुटके, नाटकें व कथा इत्यादि वाङ्मय व्यापून टाकून जैन व बौद्ध लोकांच्या धार्मिक कवितेचा प्रांतहि काबीज केला होता.
असल्या काव्यपद्धतीचे महत्वाचे विशेष खाली दिल्याप्रमाणें आहेत :- उपमा अलंकारांची गर्दी, लांबलचक वर्णनाकडे कल, रजनी, कौमुदी, सूर्योदय व ॠतु यांची ठराविक शब्दचित्रें; असल्या वर्णनांमुळें इतकी जागा अडून जाते कीं, मुख्य काव्यविषयच मुळी मागें पडतो व त्यामुळे एखाद्या महाकाव्याच्या सर्गांतील मजकूर अथवा एखाद्या अद्भत कथेचा बराचसा भाग दोन पानांतहि सांगून टाकतां येणें शक्य होतें. जोडयमकें, कृत्रिम वृत्तें, अपरिचित शब्द, अनेकार्थी सामासिक शब्द, श्लेष, शब्दच्छल व कोट्या, थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे सरळ न बोलतां मुद्दाम कृत्रिम बोलून वळसे घेऊन कूट स्वरूपानें प्रत्येक गोष्टीतून ध्वन्यर्थ काढणें, इत्यादि अनेक गोष्टी असल्या काव्यांत असतात. आनंदवर्धन कवीनेंहि या पद्धतिचा उल्लेख केलेला आहे. एकाच काव्यांतील एक किंवा अधिक शब्दांचे एकसमयावच्छेदेंकरून अनेक अर्थ करणें म्हणजे काव्याची परमावधी होय असें मानलें जात असे.
परंतु असलें काव्य जरी कृत्रिम असलें तरी विद्वत्ताप्रचुरहि असतें. खर्या कवीला गानाच्या विविध शाखांशी परिचय करून घेणें जरूर असते. अपरिचित शब्द हुडकून काढण्यास त्याला शब्दकोश अभ्यासावा लागतो. ते शब्दहि अनेकार्थी, व लांबलचक समासांत उपयोगिण्याजोगे असले पाहिजेत. अशा कवीला नियमांचे उल्लंघन होऊं नये एतदर्थ व्याकरण पढणें जरूर असतें. आपल्या काव्यांत योग्य युद्धवर्णनें व पारिभाषिक शब्द आले पाहिजेत म्हणून त्याला युद्ध व राजकारण यांवरील पुस्तकें चाळावी लागतात. त्याला कामशास्त्रांतहि प्रवीण व्हावें लागते; कारण शृंगारप्रसंग व प्रणयी जनांचे चंचल विकार रेखाटणें त्यास वर्णनप्रसंगानें भाग पडते. गुंतागुतीच्या कविता व भरपूर अलंकार यांनी आपलें काव्य सजविण्याकरितां त्यास काव्यशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. यूरोपियन, ज्याला काव्यशास्त्र किंवा साहित्य म्हणतात, त्यासच भारतीय लोक अलंकारशास्त्र असें नांव देतात.
बहुधा सातव्या शतकांत होऊन गेलेल्या दण्डि कवीनें आपल्या 'काव्यादर्श' नामक ग्रंथांत असें म्हटलें आहे कीं, प्रत्येक कवितेस शरीर व अलंकार असे असतात. शरीर म्हणजे शब्दावली होय, व ती अर्थाप्रमाणें वाक्यरूपानें विभागली जाते. गद्य, पद्य व मिश्र असेंहि काव्य असूं शकतें. कवितेला अनेक वृत्ते जरूर असून ती विराम व साक्षरमात्रागणवृत्तांनी युक्त अशी असतात. परंतु वृत्त हें कांही काव्याचें प्रधान अंग नव्हे. काव्य हें गद्य, पद्य व मिश्र असेंहि असूं शकतें, असा भारतीयांचा सिद्धांत आहे. नुस्त्या यमकांनी व वृत्तांनी युक्त असलेली कविता हें काव्य नव्हे एकाद्या शास्त्रीय ग्रंथाला जर छंदोबद्ध स्वरूप दिलें तर त्यास बोधपर कविता असें कोणीहि म्हणणार नाही. व्याकरण, शब्दकोश, वैद्यकीय व ज्योतिषविषयक ग्रंथांनां काव्याचें बाह्य स्वरूप दिले तर ते ग्रंथ काव्य या संज्ञेस पात्र होणार नाहींत. फार तर गद्यापेक्षां पद्याचा अवलंब करण्यानें तो विषय स्मृतीच्या अंकित लवकर होऊं शकेल. परंतु, वराहमिहिरकृत बृहत्संहिता या शास्त्रीय ग्रंथासहि कृत्रिमकाव्य म्हणतां येईल. तसेंच एखाद्या गद्य नवलकथेंत जर भरपूर अलंकार असतील तर छंदोबद्ध महाकाव्याप्रमाणें त्या कादंबरीसहि काव्य असें म्हणतां येईल.
संस्कृत व अपभ्रंश अथवा प्राकृत भाषेंत काव्य करण्यास कांहीच हरकत नाहीं अशी स्पष्ट लोकसमजूत होती. संस्कृताप्रमाणेंच प्राकृताचाहि उपयोग काव्यें करण्याकरितां भारतीय कवींनीं केलेला आहे. कित्येक वेळां कांही कवींनीं आपली कविता संस्कृत व प्राकृत अशा दोन्ही भाषेंत लिहिली आहे. परंतु प्राकृत काव्य म्हणजे संस्कृतची नक्कल होय हें उघड आहे.
काव्यारंभ - पाणिनी कवीनें पातालविजय व जांबवतिविजय असे दोन काव्यग्रंथ लिहिले असा, नमी व राममुकुट या कवींनी उल्लेख केलेला आढळतो. या काव्याचा कर्ता पाणिनि व व्याकरणकार पाणिनि हे जर एकच असतील तर काव्य हा विषय, ख्रिस्ती शकापूर्वी निदान चारशें (सातशें ?) वर्षांपासून सुरू झाला असला पाहिजे. परंतु वरील दोन्ही काव्यें उपलब्ध नसून पातालविजय व जांबवतिविजय हे दोन स्वतंत्र ग्रंथ आहेत हां एकाच ग्रंथाची भिन्न नावें आहेत हेंहि अनिश्चित आहे. पाणिनीनें, रूद्राच्या कृपेमुळें प्रथम व्याकरण लिहून नंतर जांबवतिविजय हें काव्य लिहिलें, असें राजशेखरानें म्हटलें आहे. दहाव्या शतकाच्या आरंभी होऊन गेलेला नाटककार राजशेखर यानें अनेक कवींचा आपल्या काव्यांत उल्लेख केला आहे. पाणिनीचा उल्लेख करणारा राजशेखर व नाटककार राजशेखर हे एक की दोन हा वादग्रस्त प्रश्न आहे. राजशेखराचा, वेदकालाच्या अखेर व्याकरण लिहिणार्या पाणिनीचा उल्लेख अपुरा असून नाटककार राजशेखराची भाषहि कालिदासाहून फारशी भिन्न दिसत नाहीं. शिवाय पाणिनीच्या पातालविजयांतील एका श्लोकांत कांही व्याकरणनियमबाह्य रूपें आढळून येतात व ती खुद्द पाणिनीचीच नसावीत. वरील रुपे नमी साधूनें १०६८ मध्यें झालेल्या रूद्रटाच्या काव्यालंकारावरील टीकेंत उद्धृत केली आहेत.
कृत्रिम वृत्तांत लिहिलेलें भावनात्मक काव्य आणि ख्रिस्ती शतकापूर्वी असलेली दरबारी काव्यपद्धति या दोहोंचे अस्तित्व पतंजलिकृत महाभाष्यावरूनहि सिद्ध होतें, कारण त्या ग्रंथांतहि कृत्रिम काव्य आढळून येतें सुभाषितादि काव्यसंग्रहांतून पतंजलीचा अनेक काव्यें करणारा म्हणून उल्लेख आढळतो. कालाच्या दृष्टीनें, पिंगल हा जर पतंजलीचा समकालीन मानला तर पिंगलाच्या वृत्तांवरील ग्रंथावरून ख्रिस्ती शकापूर्वी दोनशें वर्षे, शृंगारपर कृत्रिम काव्य होतें, हीच गोष्ट पुराव्यानें सिद्ध होत आहे. ख्रिस्ती शकापूर्वी दोनशें वर्षांपासून ख्रिस्ती शकानंतर दोनशें वर्षांपर्यतं, संस्कृत भाषेंत, दरबारी कृत्रिम पद्यरचना फारशी राहिली नाही. या काळांत भारतीय राजांच्या दरबारी प्राकृत काव्याची वाढ झाली व याच गोष्टीचें फल म्हणजे, दुर्दैवानें मूळ स्वरूपांत सध्यां उपलब्ध नसलेले, हालकृत सप्तशति व गुणाढ्यकृत बृहत्कथा हे ग्रंथ होत. बुद्धधर्मीय गाथेंतहि काव्यपद्धति असलेली आढळते. प्राकृतांतील दुसरें लिखाण म्हणजे नाशिक येथील लेण्यांतील शिलालेख होत. त्यांत इ.स. १५४ मध्यें असलेल्या आंध्र घराण्यांतील राजा पुलुमायि याच्या राज्याचें १९ वें वर्ष नमूद केलें आहे. या लेखांवरून कृत्रिम गद्य रीतीचे विशेष दिसून येतात.
याच कालाचा आणखी एक मोठा संस्कृत शिलालेख आहे व तो महासत्रप रूद्रदामन याचा होय. हा लेख म्हणजे एक कृत्रिम गद्य काव्यच होय. कारण त्यांत लांबलचक समास, जाडे शब्द, मोठमोठी वाक्यें व विविध अलंकार आहेत. या पद्धतीला 'विदर्भरीति' असें दंडीनें नांव दिलें आहे. इ.स. च्या दुसर्या शतकांत काव्यपद्धतीचें स्थलांतर गद्याच्या क्षेत्रांत झालें होतें व ती शिलालेखांत उपयोजिली जात होती. या दोन गोष्टीवरून असें दिसतें कीं, या पद्धतीची वाढ होण्यास बराच तयारीचा काल गेला असावा. इ.स.च्या दुसर्या शतकांतील बुद्ध कवि अश्वघोष याच्या काव्यावरून व नाटकांवरूनहि असें अनुमानतां येतें कीं, या कवीनें पूर्वापर नमुन्याबरहुकूम आपल्या कृतीस मूर्तस्वरूप दिलें असावें.
अलंकारशास्त्र व काव्य यांच्या अन्योन्य संबंधाकडे पाहिलें तर प्रथम एवढें म्हणतां येईल कीं, भारतीय नाट्यशास्त्र किंवा भामहकृत काव्यग्रंथ या दोहोंचा काल ठरविणें अशक्य आहे. भामहाचा ग्रंथहि अत्यंत जुना असला पाहिजे असें दिसतें.
का व्या चें अ भि जा त यु ग - पूर्वअभिजातयुग म्हणजे इ.स. तिसरें व चवथें शतक होय. तंत्राख्यायिका हेंच पंचतंत्राचें अत्यंत जुनें स्वरूप असावें. चवथ्या शतकांत भासाचीं नाटकें पुढें आलीं. वरील दोन ग्रंथ, अश्वघोष व त्याचे समकालीन यांच्या कविता, हालाची सप्तशति व गुणाढ्यकृत बृहत्कथा इत्यादि ग्रंथ, भारतीय काव्याच्या पूर्वअभिजात युगांतील मुख्य ग्रंथ म्हणून गणण्यास हरकत नाहीं. आंध्रराजे, पश्चिमेकडील क्षत्रप, कुशान राजे व त्यांचे समकालीन, या सर्वांच्या दरबारीं वरील वाङ्मयास बहर आला होता असें म्हणावयास हरकत नाहीं.
इ.स. ३२० मध्ये पहिल्या चंद्रगुप्तानें स्थापिलेल्या गुप्त घराण्याच्या राजवटींत काव्याचें सुवर्णयुग सुरू झालें. इ.स. ३४५ मध्यें असलेल्या समुद्रगुप्तावर राजकवि हरिसेन यानें एका प्रशस्ति लिहिलेली आहे व ती अलाहाबाद येथील एका स्तंभावर कोरलेली आहे. तिसरा गुप्तराजा म्हणजे दुसरा चंद्रगुप्त होय. याचें काव्यावर फार प्रेम असे. त्याच्यानंतर इ.स. ४१३ मध्यें पहिला कुमारगुप्त गादीवर बसला. या राजाच्या ४० वर्षांच्या अमदानींत लक्ष्मी व सरस्वती यांच्यातील वैर नाहीसें झालें होतें असा लौकिक आहे.
पुढें स्कंदगुप्तानें हूणांचा पराभव केला त्यावेळीं, गाझीपूर जिल्ह्यांतील भिलारी गांवीं एका स्तंभावर एक शिलालेख कोरण्यातं आला. परंतु इ. स. ४८० मध्यें स्कंदगुप्त वारल्यामुळें गुप्त घराण्याचें वैभव लयाला गेलें. त्याचे सर्व शिलालेख इ. स. ३५० ते ५५० या काळांतील असून कालिदासांच्या ग्रंथांचाहि त्यांत उल्लेख आहे. सौमिल्ल व रामिल यांचा काल अनिश्चित असून ते कालिदासाचे समकालीन होते कीं नव्हते हें अज्ञात आहे. मेन्था (भर्तृमेंथा हस्तिपक) नांवाच्या कवीनें काश्मीरच्या मातृगुप्त राजाकरितां ‘हयग्रीववध’ नांवाचें काव्य लिहिलें आहे. अमरु हा सहृदय व प्रसिद्ध कवि कालिदासाच्या कालाहून फार दूरच्या कालांत झाला नसावा. शूद्रक व विशाखदत्त या नाटककारांचा काल अनिश्चित आहे. भट्टी, भारवीप्रभृति महाकाव्यांचे जनक आणि शतकत्रयकर्ता भर्तृहरि हे इ. स. ६५० च्या पूर्वीच प्रसिद्धीस आले होते, एवढेंच या कवींबद्दल म्हणतां येईल. वराहमिहीर नांवाचा कवि व ज्योतिषी इ. स. ५८७ त वारला हें मात्र निश्चित आहे. सहाव्या शतकाच्या उत्तरपादांत सेतुबंध नावाचें प्राकृत महाकाव्य लिहिणारा किंवा लिहविणारा दुसरा प्रवरसेन राजा, हा काश्मिरास राज्य करीत असे. इ. स. सातव्या शतकाच्या आरंभीं दंडी व सुबंधू असे दोन कवी होऊन गेले यांत शंका नाही.
ऐतिहासिक पुराव्याच्या क्षेत्राकडे वळल्यास प्रथम एका नाटककाराचें नांव सुचतें व हा नाटककार म्हटला म्हणजे इ. स. ६०६ ते ६४७ मध्यें होऊन गेलेला व ठाणेश्वर आणि कनोजचा राजा हषर्देव अथवा हर्षवर्धन हाच होय. कादंबरीकर्ता बाण व वीणागीतात्मक रचना करणारा भावनाप्रधान मयूर कवी हे त्याच्या समकालीन होत. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात `शिशुपालवध’ कर्ता माघ हा होऊन गेला असावा. कारण इ.स. ६२५च्या शिलालेखांत उल्लेखिलेला राजा वर्मलाट, याचा पहिला प्रधान हा माघाचा आजा सुप्रभदेव हा होय. त्यानंतरचा कनोजाधिपति यशोवर्मन् हा वाङ्मयाचा आश्रयदाता होताच. शिवाय `रामाभ्युदय’ नावाचें नाटक त्यानें लिहिलें आहे असें म्हणतात. नाट्याचार्य भवभूति व `गौडवाह’ कर्ता प्राकृत कवी वाक्पतिराज हे यशोवर्मनच्या दरबारीं होते. वामनानें उल्लेख केलेला भट्ट नारायण नावाचा नाटककार फारसा उत्तरकालीन नसावा.
अ र्वा ची न यु गां ती ल प्र सि द्ध का व्य ले ख क.- चिप्पट जयपीड (८२६- ८३८) व अवन्तिवर्मन् (८५५- ८८३) नावाच्या काश्मिरी राजाच्या अमदानींत राजानक रत्नकर म्हणून एक महाकवि होऊन गेला. हरिविजय, वक्त्रोक्ति पंचशिका इत्यादि अनेक काव्यें त्यानें लिहिलीं आहेत. नवव्या शतकाचा अस्त व दहाव्या शतकाचा उदय, अशा वाङ्मयीन संधिकालात नाटककार राजशेखर होऊन गेला. तो आपणास महेंद्रपाळ राजाचा शिक्षक व कृष्णशंकरवर्मन् याचा समकालीन म्हणवितो. ११ व्या शतकांत माळव्यातील धारानगरीनें वाङ्मयासंबंधीं मोठें कार्य केलें आहे. मुंज राजा (९४७-९९५) हा स्वत:च कवि होता. ‘ नवसाहताकचरित’ हा ग्रंथ लिहिणारा पद्यगुप्त राजकवि होता. मुंजाचा पुतण्या भोज (१०१८-१०६०) याचाहि काव्यास चांगला आश्रय असे. हा राजा बर्याचशा काव्यांचा जनक असून त्याच्या दरबारचा कोणीहि प्रसिद्ध कवि आज आपणास माहीत नाहीं हें आश्चर्यच आहे ! ११ व १२ व्या शतकात `वाङ्मयभूमि’ म्हणून काश्मिरचा मोठा लौकिक असे. दृश्य काव्य, महाकाव्य व भावनात्मक काव्य लिहिणारा बिल्हण (१०७०-१०९०) यानें १०६५ ते बहुधा काश्मीर सोडलें असावें. अनेक दरबारांत प्रवेश करून शेवटीं तो पश्चिमेकडील चालुक्य घराण्यांतील सहाव्या विक्रमादित्य राजाच्या दरबारीं कवि झाला. पुढें त्याच्याकरिता बिल्हणानें ‘विक्रमांकदेव चरित’ नावाचा ग्रंथ लिहिला; यावेळीं काश्मिरचा राजा हर्ष (१०८१-१०८९) हा गादीवर होता. क्षेमेंद्र कवि काश्मिरांतच होऊन गेला. त्यानें महाकाव्यें व नाटकें लिहिलीं, रामायणमहाभारतांस संक्षिप्त स्वरूप दिलें आणि बृहत्कथा व कादंबरी यांनां छंदोबद्ध संक्षिप्त स्वरूप देऊन धर्मपर व उपदेशपर अशीं अनेक स्फुट काव्यें लिहिलीं आहेत. त्यानंतर १०६३ व १०८१ च्या दरम्यान सोमदेवानें कथानकात्मक काव्यें लिहिली. काश्मिरचा राजा जयसिंह (११२८-११४९) याच्या राजवटींत मंख कवि होऊन गेला व त्यानें ११३५ ते ११४५ च्या दरम्यान श्री कंठचरित हें महाकाव्य लिहिलें. ११४८ च्या सुमारास प्रसिद्ध इतिहासकार कल्हण यानें `राजतरंगिणी’ नांवाचा काश्मिरचा वृत्तांत संकलित केलेला ग्रंथ लिहिला. बाराव्या शतकांतील काश्मीरसारखें काव्याचें दुसरें केंद्र म्हणजे बंगालचा राजा लक्ष्मणसेन याचा दरबार हें होय. त्याच्या आश्रयानें उमापतिधर, धोई, गोवर्धन आणि गीतगोविंदकर्ता प्रसिद्ध जयदेव हे सर्व कवी उदयास आले. नैषधचरित लिहिणारा श्रीहर्षकवि हा बाराव्या शतकाच्या उत्तरार्धांत कनोजच्या चयचंद्र व विजयचंद्र या राजांच्या दरबारीं आश्रित म्हणून राहिलेला असावा.
आ धु नि क भा र ती य वा ङ्म यां ती ल का व्य:- भरतखंडाच्या आधुनिक सर्व भाषाप्रकारांत गाणीं व कथा असलेलें भरपूर वाङ्मय आढळतें. लौकिक अथवा रूढ कविता आणि काव्य या दोहोंतील सूक्ष्म भेद समजणें हें मात्र सर्वदाच सोपें नसतें. द्रविडी बहुजनसमाजांतील सुंदर रुढ गाण्यांपैकीं कांहीं गाणीं अशीं आहेत कीं, ज्यांनां रुढ अथवा लौकिक असें नांव देतां येणार नाहीं. तुळशीदास ( इ. स. १५३२-१६२४ ) यानें हिंदीं भाषेंत स्वतंत्र रीतीनें वाल्मिकीच्या आधारें रामायण लिहिलें आहे. तुळशीदासकृत रामायण हें विशिष्ट कव्यपद्धतींचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कारण त्यांतील सृष्टिवर्णनें, काव्यशास्त्रांतील ठराविक उदाहरणें पुढें ठेऊन न करितां, प्रत्यक्ष निसर्गावलोकनानेंच केलेलीं आहेत.
का व्या चें आ ण खी थो डे सें वि वे च न :- क्षेमेन्द्रकृत सुवृत्ततिलकामध्यें काव्य, शास्त्रकाव्य व काव्यशास्त्र यासंबंधीं भेद केलेला आहे. कालिदासाच्या नांवावर प्रसिद्ध असलेलें `नलोदय’ हें काव्य, काव्यरीतीचें परिणत स्वरूप दिग्दर्शित करितें. त्यांतील कृत्रिम वृत्तें व शब्दच्छल पहिला कीं, तें कालिदासाचें काव्य नव्हे ही गोष्ट स्पष्ट होते. तें रविदेवानें लिहिलें असावें. रावणवध अथवा सेतुबंध हें प्राकृत महाकाव्य, काव्यरीतीचें दुसरें उदाहरण होय. प्राकृतांतहि या काव्यरीतांचा अवलंब करतां येतो, हें ग्रंथकर्त्यास दाखवावयाचें होतें असें दिसतें. रामकृष्णकृत गोपाळकेलीचंद्रिका या नाटकांत रंगभूमिनिर्देशांच्या ऐवजीं काव्यवर्णनेंच फार आहेत.
प्र श स्ति:- ही स्तुतिगीतें म्हणजे ऐतिहासिक कागदपत्रेंच होत; एवढेंच नव्हे तर कृत्रिम वृत्तांत रचलेलीं व कधीं कधीं कृत्रिम गद्यांत लिहिलेली तीं घोटीव काव्येंच होत. देवालयांचें समर्पण व धार्मिक स्मारकें यांचा वृत्तांत त्यांत सांगितलेला असतो. प्रथम आशीर्वचन, संस्थापकाची वंशावळ व स्तुति, नंतर स्मारकाचें वर्णन, त्याचे हेतु, नंतर शिलालेखक व उपाध्याय यांचा निर्देश व शेवटीं, केव्हां केव्हां मितीचा उल्लेख इतक्या सर्व गोष्टी प्रशस्तिकाव्यांत सांपडतात.
का व्य री तीं त लि हि ले लीं स्तो त्रें:- बरीचशीं स्तोत्रें क्लिष्ट रीतीनें लिहिलेलीं असतात व तीं सर्व बहुधा आधुनिकच आहेत. इ.स. १५९० त पूर्ण झालेलें नारायणभट्टकृत नारायणीय हें एक स्तोत्रहि आहे व मोठें काव्यहि आहे. त्याचे दशक पाडले असून विषय भागवतपुराण हा आहे. केरळ देशांत हा भक्तिग्रंथ म्हणून मानला जातो; व कृष्णस्तव केल्यानें एका ब्राह्मणाचा संधिवात नाहींसा झाला, अशी लोक समजूत आहे. १७ व्या शतकांत रामभद्र दीक्षितानें परिणत काव्यरीतींत कांहीं स्तोत्रें केलीं आहेत. रामचयस्तव, रामवनस्तव, अष्टप्रास अथवा रामाष्टप्रास व वर्णमालास्तोत्र इत्यादि स्तोत्रें त्यापैकींच आहेत. या काव्यपद्धतींत चिनी व जपानी कवितेशीं बरेंच सादृश्य आहे.
म हा रा ष्ट्रीं ती ल का व्य.- महाराष्ट्रीला ‘उत्कृष्ट प्राकृत’ असें नांव दंडी देतो. हालकृत ‘सत्तसाइ’ हा या भाषेंतील सर्वांत प्राचीन ग्रंथ होय. ‘सेतुबंध’ (किंवा `रावणवध’) हें सुंदर काव्यपद्धतीतें लिहिलेलें एक प्राकृत महाकाव्य, बहुधा दुसर्या प्रवरसेनाचें किंवा त्याच्या सभेंतील एखाद्या कवीचें असेल. महाराष्ट्रीमध्यें लिहिलेल्या एका ग्रंथाचें उदाहरण म्हणून दंडी याचा उल्लेख करतो (काव्यादर्श, १. ३४). नाटकांमधील पदें (गाथा) नेहमीं याच भाषेंतली असतात. गाथांकरितां मुख्यत: महाराष्ट्री योजीत.
महाराष्ट्राचा विचार करतांना हेमचंद्रानें जैन महाराष्ट्रीकडे लक्ष पुरविलें आहे व तो `सत्तसाइ’ आणि ‘सेतुबंध’ यांतून महाराष्ट्रीचीं उदाहरणें निवडतो.
या हाल सातवाहनकृत सत्तसाइ (सप्तशती) मध्यें प्राकृत भाषेतींल ७०० भावगीतांचा संग्रह आहे. या ग्रंथावरून प्राचीन भारतीयांची प्रेमभाषा चांगली कळून येते. वास्तविक हीं गीतें लोकप्रिय दिसत नाहींत. तथापि लौकिक काव्याला अनुसरून काव्यकारांनीं हीं रचिलीं असावींत. हाल हा केवळ संग्राहक दिसत नसून त्यानें या गीतांची मोठ्या कौशल्यानें निवड करून त्यांनां काव्याची सुंदर छटा दिली असली पाहिजें; त्यानें आपल्याहि कांहीं कविता या संहितेंत घातल्या असाव्यात. एक अशी आख्यायिका आहे कीं, राजा हाल व त्याचा परिवार यांनां काव्यदेवी जी भारती तिनें स्फूर्ति दिल्यावर हालानें उपलब्ध असणार्या कवितांतून ७०० कविता निवडून काढल्या.
पुराणांतून आलेल्या आंध्र किंवा आंध्रभृत्य राजांच्या वंशावळींत हाल हा १७ वा राजा म्हणून दाखविला आहे. आंध्र राजघराण्याला सातवाहन किंवा शालिवाहन असें नांव असून ख्रि. पू. ३ र्या शतकाच्या आरंभापर्यंत हें घराणें दक्षिणेंत राज्य करीत होतें. हाल हा वंशावळीच्या मध्यभागीं येतो, त्या अर्थी तो इ. स. शतकांत राज्यावर असावा. तसेंच वरील आख्यायिका खरी दिसतें. कारण आंध्र राजाचे बहुतेक सर्व अंकित लेख प्राकृतांत आहेत. विंध्यगिरी व गोदावरी यांचा वारंवार उल्लेख सत्तसाईंत येतो. त्यावरून ज्या ठिकाणी आंध्रानीं राज्य केलें, त्या दख्वनच्या ईशान्य भागांत हा संग्रह निर्माण झाला असला पाहिजे असें दिसतें.
सत्तसाईच्या कमींत कमी ६ निरनिराळ्या प्रती उपलब्ध आहेत. या सर्व प्रतींतून फक्त ४३० कविताच आढळतात. थोड्या फार प्रमाणांत एकीकृत स्वरूपांत असलेला याचा मूळग्रंथ कदाचित् पुढील नकलनवीसांच्या हातून केवळ संकलित स्वरूपाचा बसला असेल. मूळ ग्रंथाचा काल इ. स. २ र्या शतकापासून धरतां येईल. म्हणजे सर्व प्रतींत आढळणार्या कवितांनांच फक्त हा काल लागू पडेल. इतर भाग पुढील काळचा असला पाहिजे यांत संशय नाहीं. तथापि महाराष्ट्री भाषेंतील हा सर्वांत जुना ग्रंथ होय.
सत्तसाईंतील प्रत्येक खंड सामान्यत: एक पूर्णपद म्हणतां येईल; कांहीं काहीं ठिकाणीं २।३ खंड मिळून एक पद बनलें आहे. यांत अगदीं थोड्या शब्दांत एखादी मन:स्थिति चित्रित केली आहे; किंवा एखादी तक्रार सांगितली आहे किंवा प्रेमानंद वर्णिला आहे. प्रवासाला गेलेल्या नवर्याबद्दल शोक करणारी स्त्री तर वारंवार दिंसते; तसेंच नवरा किंवा बायको मरण पावल्याबद्दलचा शोक, गुप्त प्रेम, प्रणयीजनांचीं भांडणें, मुलाला पहिल्यानें दात आल्याचें पाहून झालेला आनंद इत्यादि निसर्गाचें वर्णनहि मधून मधून येतें. “भटकणार्याला जसा त्याच्या सावलीचा उपयोग त्याचप्रमाणें कृपणाला त्याच्या संपत्तीचा उपयोग असतो”, यासारख्या बोधप्रद म्हणी या ग्रंथांत आढळतात. [ विंटरनिझ्झ ]
म रा ठी का व्य व प्रा ची न क वि: - मराठी भाषा उत्पन्न झाली तरी तिच्या प्रथमकाळांत कोणत्याहि प्रकारची भारदस्त ग्रंथरचना करणें ती संस्कृतांत करीत. त्याकाळीं सार्वलौकिक भाषा ही संस्कृत असल्यानें असें होणें साहजिकच होतें. देशी भाषांचा पुरस्कार प्रथम ब्राह्मणांनीं किंवा देशी राजानींहि केला नाहीं. कां कीं, ते सार्वराष्ट्रीय ब्राह्मणी संस्कृतीचे अभिमानी असत. बंगाल्यांत बंगाली भाषेचा पुरस्कार मुसुलमानी राजांनीं केला. निरनिराळीं संप्रदाय व पाखंडें ब्राह्मणांच्या तावडींतली जनता आपल्या तावडींत घेण्यासाठीं देशी भाषांचा आश्रय करीत त्यामुळें बौद्धांनी पाली, जैनांनीं अर्धमागधी व महानुभावांनीं मराठी भाषांचा आश्रय केला. त्यापूर्वीहि कदाचित मराठी भाषेंत पद्य ग्रंथ झाले असतील, कारण ज्ञानेश्वराच्या पूर्वी मराठी ही निदान २०० वर्षे तरी अस्तित्वांत आली असली पाहिजें; त्याशिवाय एकाएकीं ज्ञानेश्वरीसारखा अभिजात भाषेंत ग्रंथ निर्माण होणेंच शक्य नाहीं. परंतु आज त्यांपैकीं मुकुंदराजांच्या नांवावर खपणार्या ग्रंथांशिवाय इतरांचे ग्रंथ उपलब्ध नाहींत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, चोंभा, तुकाराम, रामदास, मोरोपंत या संतकवींनी संस्कृतांतील अगम्य ज्ञान खालच्या वर्गांतील समाजास सरसकट खुलें केलें. या मंडळीनें “मराठी भाषा ही संस्कृतपेक्षां हलकी नसून तिच्या बरोबरीची आहे, मग मराठींत ग्रंथरचना कां करूं नये” अशा अर्थाचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यांच्या कालींहि पंडितांचा एक वर्ग असून तो मराठींत काव्यरचना करणें हलकें समजत असे. अशा पंडितांची निर्भत्सना या संतकवींनीं केलेली आहे. “दूध सुंवर्ण चषकांतून प्राशन केलें काय किंवा तांब्याच्या भांड्यांतून प्यालें काय, दुधाच्या गोडींत काय फरक पडणार ? माझा मराठा बेल पैजेनें अमृतासहि जिंकेल, त्यास नांवें ठेवणार मत्सरी व आग्रही होत, भल्यानें हें मराठी पाहों नये असें म्हणणारे मूर्ख असून त्यांनां या परमार्थसुखाची सोय कशी समजणार, इत्यादि अभिमानाचे उद्गार यांच्या ग्रंथांत आढळतात.
काव्यग्रंथाचें विवेचन आणि पद्यमयग्रंथांचा इतिहास या दोन्हीं गोष्टींचें पृथक्करण येथील काव्यविवेचकांनीं चांगलें केलें नाहीं. धार्मिक किंवा भक्तिपर काव्य वगळलें असतां मराठी भाषेंत चांगलें काव्य फारच थोडें आहे. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी किंवा अमृतानुभव, वामन पंडिताची यथार्थदीपिका यांनां काव्यग्रंथ म्हणणें म्हणजे काव्यग्रंथाच्या स्वरूपाचेंच अज्ञान प्रदर्शित करणें होय. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे मराठींत कांहीं भक्तिपर काव्य आहे, संस्कृत काव्याचीं रुपांतरें झालीं आहेत. तीं रुपांतरें तयार करतांना काव्योत्पादन हा मुख्य हेतु नसून धार्मिक लोकशिक्षण हा मुख्य हेतु होता; आणि काव्य केवळ गाड्याबरोबर नळ्याला यात्रा या नात्यानेंच आलें आहे. काव्येतर ग्रंथांत काव्य उत्पन्न झालें असेंच ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांतील काव्यस्वरूपी सुंदर स्थलांविषयीं म्हणतां येईल. रामदासाच्या मनाच्या श्लोकांत काव्य आहे. पण दासबोधांत ते थोडेंच आहे. महिपतीचीं भक्तचरित्रें वाचलीं असतां त्यांत कांहीं काव्यस्थलें सांपडतील. पण त्या चरित्रांस काव्य म्हणण्यास जर जागा असेल तर ती मुख्य ही कीं जे दोष चरित्रांत चालावयाचे नाहींत पण जे काव्यांत चालतात, ते दोष ज्या अर्थी महिमतीच्या चरित्रसमुच्चयांत आहेत त्या अर्थी महिपतीच्या कृतीस काव्यच म्हटलें पाहिजे.
इंग्रजीपूर्वीच्या मराठींतील खरीं स्वतंत्र काव्यरचना म्हणजे लावण्या, पोंवाडे वगैरे होत. जेथें धार्मिक विषय परंतु धार्मिक बुद्धिहि अप्रधान आहे अशा कृतीनांहि काव्य म्हणतां येईल. अशांमध्ये राधविलास, राधाभुजंग, चंद्रावलीवर्णन इत्यादि काव्यें मोडतील. भाषांतरें करतांना काव्यहेतु मनांत धरून करतांना केलेल्या दुसर्या कृती म्हटल्या म्हणजे बिल्हणचरित्र (चौरपंचाशिकेचें रूपांतर) व विठ्ठलाची रसमंजरी ह्या होत. एकंदरीनें पहातां मराठींतील काव्यवाङ्मय म्हणजे उष्टें आणि भिकार होय यांत शंका नाहीं. सुशिक्षित श्रृगारिक वाङमय अलीकडच्या मासिकांतील भीत भीत प्रसिद्ध केलेल्या पद्यांशिवाय मराठींत नाहीं. आणि आहे तें अगदीं कनिष्ट प्रतीचें आहे. भावना सुशिक्षित होऊन त्यांचा विकास ज्या समाजांत नाहीं त्या समाजांत खरें प्रेमवाङ्मय कोठून दृष्टीस पडणार. पोंवाडे देखील निर्बुद्ध अशा लोकांनीच लिहिले असल्यामुळें त्यांत कवित्व जरी मधून मधून दृष्टीस पडलें तरी तें आजच्या वाङ्मयप्रेमी वर्गावर छाप टाकील असें नाहीं, आणि मोठमोठालीं चांगलीं काव्यें मराठींत झालींच नाहींत. इंग्रजी राज्यांतील ज्या मराठी काव्यांत काहीं कवींचें कौशल्य दृष्टीस पडते, आणि ज्या कवींचा दम जरा जास्त वेळ टिकला असें दिसतें अशीं नांव घेण्याजोगीं मराठीं काव्यें आमच्या मतें दोनच आहेत. एक चिंतामणिपेठकरांचें गंगावर्णन आणि दुसरें टिळकाचें एक वनवासी फूल हीं होत. काव्यांचे विषय शोधण्यांत स्वातंत्र्य, जन्मभर काव्याचा हव्यास विविध प्रकारचा अनुभव या गोष्टींचा लाभ महाराष्ट्रीय कवितेस कधींच प्राप्त झाला नाहीं. आणि आजपर्यंत झालेलें मराठी वाङ्मय सर्व जळून जरी गेलें तरी जगाचें काव्यनाश या दृष्टीनें कांहीं एक नुकसान व्हावयाचें नाहीं. झालें तर तें भाषेचा इतिहास, खुंटलेल्या राष्ट्राच्या मनस्थितीचें व ज्ञानमर्यादेचें उदाहरण व स्त्रीशूद्रांच्या धार्मिक शिक्षणासाठीं झालेल्या प्रयत्नचा इतिहास या नात्यानेंच होईल. मराठींतील बरीचशी प्रसिद्ध झालेली अर्वाचीन कविता पंचविशीच्या आतल्या पोरांनीं लिहिलेली आहे व त्याच मंडळींनीं प्रौढ वयांत कवितारचनेचा क्रम टाकून दिला आहे.
आतां पद्यरूपीं ग्रंथाची व कृतीची थोडीशी हजेरी घेऊं व ती घेतांनां ज्या ग्रंथामध्यें थोडथोडें काव्य स्वरूप आलें आहे त्यांचा व त्या स्थलांचा उल्लेखहि करूं.
प्रथम पंचतंत्रादिक लौकिक कथा बर्याच प्राचीन काळीं मराठींत काव्यरूपानें उतरल्या असाव्यात असें दिसतें. पुढें दहाव्या शतकात श्रीपतीनें रत्नमाळ ग्रंथ तयार केला. हा मराठी आद्यकवि होय. त्यानंतर मुकुंदराज यांनीं विवेकसिंधु व परमामृत वगैरे ग्रंथरचना केली. मुकुंदराजांनीं संस्कृतांतहि (दशोपनिषदभाष्य, विवेकसिंधु, ग्रंथराज वगैरे) काव्यरचना केली आहे. मराठींत ग्रंथरचना करणें हें आपण एक धाडस करीत आहों असें खुद्द मुकुंदराजासहि वाटत असावें. मुकुंदराजांची कविता साधी आहे. यानंतर हेमाद्रीनें मेस्तकें रचिलीं. कामराज नांवाच्या एका कवीच्या उल्लेखावरून तीं पद्यांत असावीं असें दिसतें. या सुमारासच ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी निर्माण झाली. मराठी वाङ्मयांत ज्ञानेश्वरीची योग्यता विशेष आहे. पुष्कळशा विद्वानांच्या मते तिच्यासारखा गीतेचा अर्थ सुलभ करणारा दुसरा ग्रंथ अद्याप निर्माण झाला नाहीं. जुन्या शब्दांचें दुर्बोधत्व एकीकडे ठेविल्यास सरस दृष्टांत व भाषेचें मधुर स्वरूप याहींकरून ग्रंथ इतका खुलविला आहे कीं, तो वाचीत असतां, वाचकांची आपोआप ग्रंथाशी तन्मयता होते. सहाशें वर्षे झालीं तरीं अद्यापि याची छाप महाराष्ट्रावर बसलेली आहे. ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव ग्रंथहि उत्तम आहे. मात्र भाषा थोडी जास्त कठीण आहे. मुक्ताबाईचे ताटीचे अभंग मधुर म्हणून प्रसिद्ध आहेत. नामदेवाचें सारें कुटुंबच कवी होतें. त्याचे व जनाबाईचे अभंग लडिवाळपणाचे आहेत. व त्यांत वात्सल्यरस बराच आढळतो. यांच्या अभंगांनीं विठ्ठलभक्ति समाजांत जास्त पसरली. नामदेव व तुकाराम यांचे अभंग वारकर्याच्या तोंडीं फार आहेत. तुकारामाच्या अभंगांत सडेतोडपणा व कवीस शोभण्यासारखा आवेश जास्त आढळतो. लोकांनां शिकवणूक देतांना शिव्या देण्याची खोडहि तुकोबांनां होती. खरोखर पाहिलें तर, आमच्या कवींच्या या प्रेमळ भक्तीच्या जोरावर मराठींत उत्तम काव्य निर्माण झालें आहे. चोंभा कवीची भाषा ज्ञानेश्वर व एकनाथ यांच्या दरम्यानची असल्यानें तिला ठाकठिकपणा येत चालल्याचें व संस्कृताचें सांनिध्य सुटून तिनें मराठीस विशेष जवळ केल्याचें आढळतें. एकनाथांची भाषा अधिक सुशिक्षित आहे. ते स्वत: पंडित होते. त्यांच्याच प्रमाणें वामनाची व मोरोपंतांची भाषा आहे. फरक काय तो तत्कालीन भाषेच्या जुन्या व नव्या वळणाचा आहे. मोरोपंत व मुक्तेश्वर यांत मोरोपंतांची भाषा जास्त ठाकठिकीची आहे. मोरोपंतांनां, त्यांच्या आधींच्या सर्व कवींच्या काव्यांचा भरपूर उपयोग करून घेतां आला त्यामुळें त्यांचें काव्य ठाकठिकीचें वठलें आहे. मोरोपंतांनां स्वराज्यांत काव्य करण्याचे भाग्य लाधलें होतें, हें विशेष आहे. पारतंत्र्यांत इतर वृत्तींप्रमाणें काव्योत्पादनशक्ति अगर वृत्तीहि जोमानें उदय पावत नाहीं. सारांश मोरोपंत म्हणजे मराठी साम्राज्यांतील एक नमुनेदार कवि होय असें म्हटल्यास वावगें दिसणार नाहीं. एकनाथांची भाषा ज्ञानेश्वरानंतरच्या तीनशें वर्षांची असल्यानें बरीच ओळखीची दिसते. नाथांच्या भागवताच्या व भावार्थरामायण वगैरे कथानकविषयक काव्यांच्या भाषेंत थोडा फरक आहे. पहिल्यांत भाषा सोपी आहे तर दुसर्यांत ती अवघड आहे. याचें कारण कदाचित् असें असूं शकेल कीं, वेदांताचें लोण अगदीं खालच्या वर्गापर्यंत नेण्याचें काम करावयाचें असल्यानें भागवत सोप्या भाषेंत रचिलें गेलें असावें. मराठी निरुपणात्मक काव्यांत ओंवी हा छंद विशेष रूढ आहे. याचें कारण तो सुलभ असून (संस्कृतांतील अनुष्टुपप्रमाणें) सहज समजणाराहि आहे. अध्यात्मवाङ्मयांत बहुतेक संत कवींनीं हाच छंद उपयोगांत आणिला आहे. ओंवीछंदांत काव्याचें चमत्कारित्व फारसें दृष्टीस पडत नाहीं; त्यास निरनिराळ्या वृत्तांचीं जरुरी असते. तरी पण मुक्तेश्वर, श्रीधर, वामन व एकनाथ यांनीं ओंवीबद्ध काव्यांत चमत्कारित्व व मनोहारित्व आणिलें आहे. एकनाथानें आख्यानवाङ्मयावर विशेष भर दिला; त्यानेंच याचा पाया घातला असें म्हणण्यास हरकत नाहीं. याच्या वेळच्या चिंतामणी कवीचें ध्रूवाख्यान गोड आहे. असली त्रोटक परंतु रसाळ काव्यें वामन, रघुनाथ पंडित वगैरे कवीचींहि आहेत. एकनाथकालीन एक ख्रिस्तपुराण म्हणून (स्टीफनचा) ग्रंथ आहे. त्याची भाषा एकनाथापेक्षां सोपी आहे. याचें कारण विषय कथेचा व ग्रंथ साधारण लोकांकरितां लिहिलेला हें असावें. मुक्तेश्वरास काव्य करण्यास वेदान्तपंथ किंवा वारकरीपंथ वगैरे कारणीभूत न होता स्वयंस्फूर्तीनें त्यानें काव्यास प्रारंभ केला. तो कोणत्याहि संप्रदायाचा नव्हता. कवींचें काम लोकशिक्षणविषयक किंवा मनोरंजक विचार अगर कथा, सृष्टींतील विषयांशी तादात्म्य पावून स्वयंस्फूर्तीनें गौरवून सांगण्याचें असतें. त्या दृष्टीनें मुक्तेश्वर हा उत्तम कवि होऊन गेला. त्याची भाषासरणी प्रौढ, मनोरम, प्रासादयुक्त आणि व्यवस्थित आहे. त्यानें सृष्टिवर्णनें चांगलीं केलेलीं आहेत. याच्या वेळेपासून मराठी भाषा काव्यांगणांत जोरानें पुढें सरसावली. याने सरस व विपुल अलंकार योजून मराठी कवितेच्या अंगावर बहुत अलंकार चढविले. याच्या काव्यांत महाकाव्यें, आख्यानें व वीणाकाव्यें हीं दृष्टीस पडतात. श्रीधराला रूपकाची फार आवड होती; याचें व महिपतीचें काव्य मुक्तेश्वराच्या खालच्या दर्जाचें असूनहि लोक तें फार वाचतात, याचें कारण तें लहान लहान कथात्मक आहे हें होय. रामदासस्वामी यांचा कांहीं निराळाच पंथ होता. वास्तविक ते कोणत्याच पंथाचे अनुयायी नसल्यानें त्यांचे ग्रंथ बहुतेक स्वतंत्र वृत्तीचे आहेत. रामायणादि थोडे अपवाद सोडल्यास, त्यांची सारी कविता लोकशिक्षणविषयक आहे. कोमल, मधुरपणा वगैरे त्यांत न आढळतां निसर्गाचा व सत्याचा नितांत कठोरपणा व तेजस्वितेचा अनुभव त्यांत सांपडतो. असल्या राजकारणी पुरुषाच्या काव्यांतून विचार आढळतात पण भाव थोडेच आढळतात ! तरी पण कारुण्य, वात्सल्य, अद्भुत, भक्ति व रौद्र हे रस त्यांच्या काव्यांत कांहीं ठिकाणीं आढळतात. त्यांनीं घालून दिलेल्या कित्याचें वळण वळवून काव्य उत्पन्न करणारा कवि त्यांच्या पश्चात् अद्यापपर्यंत एकहि झाला नाहीं असें कांहींचें म्हणणे आहे. पण कवि नात्यानें रामदासांची किंमत फारशी मोठी नाही. आनंदतनय यांची भाषा साधी आहे. अमृतरायाची कविता चटकदार व मनोहर असून भाषा प्रौढ दिसते. याचा कटाव जर एखाद्या उत्तम हरिदासाच्या तोंडून ऐकला तर श्रोते तन्मय होऊन जातात. वामन हा संस्कृत पंडित असल्यानें त्याच्या काव्यावर संस्कृताची व पांडित्याची छाया पडलेली आहे. याचीं पौराणिक आख्यानें चांगलीं रसभरित आहेत; वाणी जोरदार, ओजस्वी व प्रौढ आहे. स्वभावोक्ति सर्वत्र आढळते. मोरोपंतांनीं मराठी भाषेवर जितके उपकार केले तितके दुसर्या कवीनें केले नाहींत. त्यानें कथानकें जरी जुनीं घेतलीं, तरी त्यातील कोठ्या, विचार व त्यास लाविलेलें वळण नवीन आहे. मराठी कवितेंत संस्कृत शब्दांचा उपयोग करतांना कधीं कधीं अतिरेक केला आहे. त्याची कविता म्हणजे एखाद्या राजाची सर्वांगसुंदर, नाजूक, बहुमोल अलंकारादि आभरणांनीं युक्त व बहुविधकलाकुशल प्रौढ वयाची तरुणी होय. शब्दगौरव, भाषेची प्रौढी, रसानुकूलता भरपूर अलंकार, काल-व्यक्ती-प्रसंग यांनां अनुसरून वर्णनें, मुख्य सूत्र न सोडतां थोडक्यांत पुष्कळ अर्थ आणणें हें याच्या काव्याचें विशेष आहे. अर्थगौरव, पदलालित्य, माधुर्य, ओजस्विता हे याच्या कवितेचे मुख्य गुण आहेत.
मोरोपंतानंतर लक्ष्यांत घेण्यासारखे कवी म्हणजे शाहीर होत. यांत रामजोशी, परशुराम, अनंतफंदी, होनाजीबाळा व प्रभाकर हे मुख्य होत. यांच्या लावण्या देवांवर, उपदेशपर व अध्यात्मिक अशा थोड्या असून शृंगारपरच जास्त असत. भाषेच्या दृष्टीनें या चांगल्या आहेत. कित्येकांची भाषा अत्यंत गोड व उदात्तवर्णनपर आहे. या लोकांनीं पोवाडेहि केले आहेत. ते बहुतेक ऐतिहासिक प्रसंगांवरील असल्यानें वीररसप्रधान असतात. मराठी पद्यवाङ्मयाला (समर्थ रामदास सोडून) राजकीय उलाढाळींची वार्ता हि नाहीं; ती उणीव पोवाड्यांनीं भरून काढिली आहे. पोवाडे व लावण्या हें उत्तानकाव्य होय. काव्यांत पदें म्हणून जो भाग आहे त्याचा उपयोग कीर्तनांत व मनोरंजनार्थ गाण्यांत किंवा प्रसंगविशेषीं मनाच्या प्रक्षुब्ध स्थितींत होतो. मनोवृत्ती हालवून सोडणारें हें एक काव्याचें छोटेसें अंग आहे. बायकांचीं गाणीं ही काव्याची एक बाजू आहे. या बाजूनें मराठी भाषेचें जुने स्वरूप व त्यांतील कोमल रसांचा सांठा आजपर्यंत कायम ठेविला आहे.
संस्कृत काव्यांत सर्वसाधारण वृत्त म्हणजे अनुष्टुप छंद होय तसें मराठी काव्यांत ओवी व अभंग होत. ज्ञानेश्वरीची ओवी साडेतीन चरणी आहे तर एकनाथाची ओवी साडेचार चरणी (क्वचित पांच चरणी) आहे. पुढील कवींनीं एवढी लांब ओवी न ठेवितां चार चरणीं योजलेलीं आहे. ओवी व अभंग यांत फार थोडा फरक आहे. घनाक्षरी हें वृत्त तालावर म्हणण्याचें आहे; हें चार ओव्यांचें मिळून बनतें. कटाव हे सुद्धां तालावर म्हणतात; याला नियमितपणा नाहीं. जवळजवळ हें एक लांब गद्यच होय. हरिदासांच्यामुळें हे कटाव फार लोकप्रिय झाले. श्लोक या वृत्तांत पुष्कळ प्रकार आढळतात; पैकीं समर्थांचें आवडतें (मनाच्या श्लोकांत योजिलेले) भुजंगप्रयात हें एक होय; तें मुसुलमानी करिमा वृत्तासारखेंच आहे. दिंडी व साकी हीं वृत्तें गायनाच्या अनुरोधानें मुद्दाम बसविलेलीं आहेत. ही अभंग व ओवी यांसारखींच शुध्द मराठी वृत्तें आहेत.
मानभावी पंथांत ज्ञानेश्वराच्या नंतर कांहीं ओवीबद्ध ग्रंथ तयार झालेले आढळतात परंतु ते थोडे आहेत व आहेत तेहि प्रसिद्ध झालेले नाहींत त्यामुळें त्याबद्दल कांहीं विधान करितां येत नाहीं. [ महाराष्ट्र सारस्वत; मराठी भा. घटना. ]
आ धु नि क क वी :- रा. न. चिं. केळकर यांनीं बडोदें येथील दहाव्या मराठी साहित्यसंमेलनांत (स. १९२१) अध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणावरून पुढील मजकूर घेत आहों. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत, इंग्रजी अंमल महाराष्ट्रांत दृढ झाल्यावर समाजांत विलक्षण क्रांति घडून येऊन नानातर्हेचे स्थितिभेद, मतभेद व रुचिभेद अस्तित्वांत आले. या बहुविध परिवर्तनाचें पूर्ण निदर्शक असेंच आधुनिक कवितेचें स्वरूप आहे. सांप्रतच्या कवींपैकीं कांहींची कविता जुन्या धर्तीची व कांहींचीं (इंग्रजी) भाषांतराची व रूपांतराची बनली; हे प्रयत्न बरेच सफल झाले. या कारणामुळें भाषारचना व विषय यांचें वैत्रित्र्य आधुनिक कवितेंत अतिशय दिसून येतें. पुराणकथांचें विवेचन व अध्यात्माचें निरुपण यांबरोबरच आगगाडींतील प्रवास व उडणारी म्हातारी देखील या कवितात आढळते. कुरुंदवाडकर, लेंभे व दासगणू यांची कविता जुन्या थाटाची आहे, तर मोगरे, टिळक व केशवसुत यांची कविता पोप, वर्डस्वर्थ किंवा ब्राउनिंग या इंग्रज कवींच्या वळणाची आहे. मुजुमदार, भिडे, लेले, पांगारकर, आगाशे व अनंततनय यांच्या रचनेचें मोरोपंती वळण; मोगरे, चंद्रशेखर व लेंभे यांची कांहींशीं संस्कृतप्रचुर परंतु डौलदार व रमणीय श्लोकपद्धति; माधवानुज, सुमंत, नागेश व माधव यांची सफाईदार रचना, चिपळूणकर, विनायक यांची सहजमधुर साकी, तुकारामी व श्रीधरी थाटाचे टिळकांचे अभंग, ओंवी, केशवसुत व ठोमरे यांची विषयानुरूप तुटक, ओजस्वी व परिणामकारक नवीन वृत्तयोजना; तांबे व दत्त यांची लावणी पदांच्या धर्तीवरील हृदयंगम कवनें गोविंदाग्रज व रेंदाळकरांची ललित नादमधुर पण कृत्रिम भाषा आणि टेकाडे व बेहरे याच्या वाणींतील तडफ हे सर्व विशेष आधुनिक कवितेला शोभादायकच आहेत. तिचें हें स्वरूप जसे वैचित्र्यपर तसेंच चमत्कृतिजनक व आनंददायकहि आहे. या कवींपैकीं भाषांतरकार कवि बरेच आहेत. केवळ स्वतंत्र अशी कविता फक्त लेंभे, खरे, चंद्रशेखर विनायक कोल्हटकर, गोविंदाग्रज व ठोमरे यांचीच म्हणतां येईल. संस्कृत व इंग्रजीप्रमाणेंच आतां बंगाली, ऊर्दू व क्वचित् गुजराथी आणि फ्रेंच या कवितांचींहि भाषांतरें होऊं लागली. परंतु यांत दोष असा आहे कीं, याचा परिणाम कवींच्या प्रतिभेवर होतो. स्वतंत्र कृति प्रसवावयाला समर्थ असलेली या कवींची प्रतिभा परावलंबनाची दुष्ट सवय जडल्यामुळें पुष्ळकदां शिथिल किंबहुना नष्ट झाल्याचें आढळून येतें. सध्या चालू असलेला हा भाषांतराचा प्रघात पाहिला म्हणजे प्राचीन कवींप्रमाणें अर्वाचीन कवीहि कोणत्या तरी ना कोणत्या तरी सारस्वताचे भक्त बनून नेहमीं परभृतच रहाणार कीं काय असें भय वाटतें.
“वीणाकाव्य’’ हा आधुनिक कवितेचा एक अत्यंत महत्त्वाचा विशेष आहे. ही अभिनव पद्धति केशवसुतांनीं मराठींत प्रथम सुरू केली. गेल्या वीस पंचवीस वर्षांत जी मराठी कविता लिहिली गेली, ती बहुतेक या केशवसुती वळणाचीच आहे. त्यामुंळे या काळाला केशवसुताचें युग असें कांहीं जण म्हणतात. या काळांतील ही कविता बरीच त्रुटित व स्फुटगीतात्मक अशी आहे. हदयंगमता हा काव्याचा मुख्य गुण या वीणागीतांत जसा आढळतो तसेंच त्यांत थोडेंबहुत नादमाधुर्यहि आढळतें. केशवसुत, टिळक व विनायक यांचीं काव्यें भावनोद्दीपक जास्त आहेत. हल्लींची दुसरी महत्त्वाची रचना चतुर्दशक ही होय. परंतु हा प्रकार मराठी वाचकांनां फारसा रुचलेला अगर कवींना साधलेला असा दिसत नाहीं. हल्लींच्या कवींत काहीं दोषहि आढळतात. वृत्तशैथिल्य, गांवढळ शब्दांचा योजना, ग्राम्य रचना व विचार, अर्थशून्य शब्दरचना, अनिवार, निरंकुशपणा वगैरे हे दोष होत. यामुळें मराठी कवितेंत ही सदोष व शिथील रचना रूढ होण्याचें भय वाढत आहे. होतकरू कवींनां भाषासौंदर्याची व रचनेच्या ठाकठिकीची परवा वाटेनाशी झाली आहे. आधुनिक कवितेच्या या दोषांची छाननी रसिक टीकाकारांकडून अवश्य झाली पाहिजे.
टी का त्म क वा ङ्म य- मराठी कवितेवर हें बरेंच उत्पन्न झालें आहे. तथापि त्यांतल्या त्यांत महत्त्वाचे ग्रंथ थोडेच आहेत. संतकवींची मराठी यादी सं त क वि का व्य सू चि ही होय. टीकात्मक वाङ्मयाची बरीचशी नोंद म हा रा ष्ट्री य वा ङम य सू चींमध्ये सांपडेल. संतचरित्रें महिपतीनें प्रथम गाइलीं. याशिवाय अनेक कवींनीं समकालीन किंवा पूर्वकालीन कवींच्या प्रशस्ती लिहिल्या आहेत. कविचरित्राचा एक संग्रह रा. ज. र. आजगांवकर यांनी लिहिला आहे. पण तो बराच काळजीपूर्वक पुन्हां तपासला पाहिजे.
ज्ञानेश्वर, एकनाथ, मोरोपंत, तुकाराम व रामदास या कवीच्या चरित्रांवर इतर कवींपेक्षा अधिक वाङ्मय उत्पन्न झालें आहे. ज्ञानेश्वरावर भिंगारकरांचा व मोरोपंतांवर पांगारकरांचा व्यासंग विशेष आहे. वामन पंडितावर विद्याधर वामन भिडे यांचे परिश्रम झालें आहेत. त्यांत त्यांनी यथार्थदीपिकेचा कर्ता वामन व राधाभुजंगाचा कर्ता वामन या दोन निरनिराळ्या व्यक्ती आहेत असें मांडलें आहे. राजवाडे यांनीं दासबोधाचें पृथक्करण चांगलें करून त्यांतील विचारप्रणालि सुलभ तर्हेनें खुली करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाभिमान महाराष्ट्रीय कवींस होता असें सिद्ध करण्यासाठीं पांगारकरांनीं एक लेख १९०३ च्या सुमारास केसरींत प्रसिद्ध केला होता; मोरोपंतांवर चिपळुणकर व हंस यांचे निबंध प्रसिद्ध आहेत. अनेक टीकालेख पहातां असें दिसून येईल कीं, मराठी कविकृतीचें काव्य या दृष्टीनें परीक्षण करण्याच्या बाबतींत टीकाकारांनीं फारसें कौशल्य दाखविलें नाही. व विशिष्ट ओळी उद्धत करून, “अहाहा ! या किती मजेदार आहेत” असे उद्गार काढण्यापलीकडे टीकाकारांची मजल फारशी गेली नाहीं.
एकंदर जगाचा काव्योदधि पहाण्यास येथें अवकाश नाहीं. तथापि येथें एवढेंच सांगतां येईल कीं निरनिराळ्या देशांत व निरनिराळ्या काळांत आव्योत्पत्ति प्राचीन मथावर्णन, भक्ति देशभक्तिप्रवर्तन, इत्यादि हेतूंनें झालीं आहें व अनेक काव्यें एकीकृत होऊन अनेक प्रसंगीं महाकाव्यें निर्माण झालीं आहेत (महाकाव्य पहा.)