विभाग अकरावा : काव्य - खतें
कुत्बशाही- हें राज्य म्हणजे प्राचीन वरंगळचें काकतीयांचेंच राज्य होय. तें १४२३ मध्यें अहमदशहा बहामनी यानें बुडविलें. हा प्रदेश गोदा व कृष्णा यांच्यामधील होय. पूर्वेस बंगालचा उपसागर व पश्चिमेस बेदरीराज्य ही त्याची हद्द होती. प्रदेश मूळचा फार सुपीक होता, हिंदू व मुसुलमान राजांनीं कालवे खणून जास्त सुपीक केला. यांच्यावर इराणांत जन्मलेल्या एका तुर्की सरदाराला महंमद गवान यानें सुभेदार नेमिलें. याचें नांव कुत्बुद्दीन (कुत्बउल मुलक,) याला इराणांतून इकडे आल्यानंतर प्रथम महंमदशहा बहामनीनें आश्रय दिला. पुढें वाढत वाढत कुत्ब उल् मूल्क हा वर सांगितल्याप्रमाणें सुभा झाला. याला १४९३ त जामकोंडाचा किल्ला घेण्यास पाठविलें असतां तेथें तो मेला. त्यानंतर त्यांचा मुलगा सुलतान कुली याला याच्या पदव्या व अधिकार मिळाले व गोवळकोंड्याची जहागीर मिळाली. गवानला अन्यायानें फांसावर चढविल्यावर यानें बेदरचा संबंध सोडला आणि १५१८ त स्वतंत्र होऊन सुलतान कुलिकुत्बुशहा ही पदवी घेतली व कुत्बशाहीचा संस्थापक झाला. हा पराक्रमी व महत्त्वाकांक्षी होता. यानें राज्यविस्तार बराच केला. गोवळकोंडा येथें त्यानें राजधानी केली. प्रथम हें लहान खेडें होतें तें त्यानें वाढविलें. मुसुलमानी धर्माचा तो अभिमानी होता व त्यामुळें तो हिंदु प्रजेस त्रासहि देई. त्यावरून कमामेंत कंडापिली व ओढ्या या प्रांतांच्या हिंदू राजांशीं त्याच्या लढाया होत. विजयानगरच्या कृष्णानें याचा १५१६ त पराभव करून त्याचा पुष्कळ देश काबीज केला होता. बेरिदशहा व आदिलशहा यांच्याशींहि त्यानें लढाया मारल्या होत्या. शेवटीं शेवटीं त्याचा मुलगा जमशीद यानें बंड केलें असतां त्यास यानें कैदेंत ठेविलें. एकदा शहा एका मशीदीची बांधणी पहात असतां जमशीदच्या सांगण्यावरून कोतवाल हमदानी यानें जंबियानें त्याचा खून केला. त्यावेळीं तो ९० वर्षांचा होता; त्यानें साठ वर्षें (१६ वर्षें सुभेदारी व ४४ वर्षें स्वतंत्र) राज्य केलें. याची कारर्कीद १५१२-१५४३ च्या दरम्यानची होय.
ज म शी द.- (१५४३-१५५०) यानें वडील भावास कैदेंत टाकून व त्याला आंधळें करून तख्त बळकाविलें. यानें आदिलशहावर स्वारी केली. तींत याचा पराभव झाला; त्यामुळें पुढें तो स्वार्यांच्या भानगडींत पडला नाहीं. तो बहुधा विलासांत निमग्न असे. शेवटीं हा १५५० त मेला. याच्या कारकीर्दींत जगदेवराव (निंबाळकर?) हा मराठा सरदार फार पुढें आला. जमशीदनंतर त्याचा मुलगा सुभान गादीवर आला. परंतु थोडक्याच दिवसांत तो पदच्युत झाला.
इब्राहिम.- (१५५०-१५८०) हा जमशीदचा भाऊ; जमशीदच्या धाकानें विजयानगरच्या राजाजवळ आश्रयास होता. याला जमशीदच्या मरणानंतर दरबारी मंडळीनें (सुभानला काढून) गादीवर बसविलें. हा कृतघ्न होता. ज्या विजयनगरकरांनीं त्याला आश्रय दिला त्याच रामराय राजाविरूद्ध हा इतर मुसुलमान शहांनां सामील होऊन त्यानें विजयनगर बुडविलें. व उपकारकर्त्याचें ऋण अशा रीतीनें फेडलें. हुसेन निजामशहाचा हा स्नेही होता.
यानें १५६४ त राजमहेंद्रीवर चढाई केली. परंतु तेथील हिंदु राजांनीं त्याचा पराभव केला. प्रथम रामराजाचा व आदिलशहाचा स्नेह होता, पण तोहि शेवटीं रामराजांच्याविरुद्ध गेला. इब्राहिमनें बेरिदशहावर अपराधापासून स्वारी केली असतां रामरायानें त्याचा निषेध केला होता. तें शल्य त्याच्या मनांत सलत होतें. मागें सांगितलेल्या जागदेवरायानें याला गादीवर बसविण्यांत श्रम केल्यानें त्याला यानें दिवाण केलें. त्याच्या हाताखालीं रायाराव नांवाचा एक प्रख्यात मराठा सरदार होता. यावेळीं राज्यांत मराठ्यांचें प्रस्थ फार माजलें होतें तें मुसुलमान लोकांनां न रुचून त्यांनीं जगदेवाबद्दल शहाचे कान भरले. तेव्हां शहाची त्याच्यावर गैरमर्जी झाली. जगदेव गोवळकोंड्याहून निघून शहाचा प्रांत उद्ध्वस्त करीत वर्हाडपर्यंत गेला. बुर्हाणच्या निजामानें त्याला आश्रय दिला; परंतु पुढें तेथून तो निघाला व पुन्हां कुत्बशाहींत लुटालूट करूं लागला. त्याच्या पदरीं आरबी, इराणी, हबशी, मराठे वगैरे फौज होती. इब्राहिमला त्याच्याशीं सामना देववेना. इब्राहिम व हुसेन निजाम यांनीं आदिलशहावर स्वारी केली. तेव्हां जगदेव व विजयानगरकर रामरायाचा भाऊ व्यंकटाद्रि हे आदिलशहाला मिळून त्यांनीं या स्वारी करणार्यांचा पराभव केला. जगदेवानें पुढें तर कुत्बशहाचे बहुतेक किल्ले व प्रांत घेतले. तेव्हां नाइलाजानें इब्राहिमनें त्यांच्यांशीं तह केला. इब्राहिमनें यानंतर ओढ्या, चंद्रबार व कंडदेव पल्ली येथील हिंदु जमीनदारांनां आपले मांडलिक बनविले. याचा दिवाण मुरारराव म्हणून होता. त्यानें प्रजेस फार त्रास दिला. शहा १५८० त मेला. त्याला एकंदर तीस मुलें झालीं त्यानें लढाया बर्याच मारल्या. तो विद्वान होता व प्रजाहिततत्पर होता. त्यानें बर्याच सुंदर इमारती बांधल्या. गोवळकोंड्याचा तट इब्राहिमबाग, फुलबाग, इब्राहिमतला, हुसेनसागर, वडवलचा बंधारा, पाठशाळा वगैर कामें यानें केलीं. व्यापारास यानें चांगलें उत्तेजन दिलें. न्यायहि तो बरा करी. यानें वडील मुलास वीष देऊन मारलें होतें.
म ह म द.- (१५८०-१६११) हा इब्राहिमचा तिसरा पुत्र. १२ व्या वर्षीं गादीवर बसला. यानें विजयानगरकराची एक शाखा पेनकोंड्यास होती ती बुडविण्याकरितां पुष्कळ मोहिमा केल्या; पण त्या व्यर्थ गेल्या. यानें आपली बहीण आदिलशहास देऊन या दोन राज्यांत सख्य केलें. याच्या वेळीं गोवळकोंड्याची वस्ती दाट होऊन पाणीपुरवठा चांगला नसल्यामुळें पांच कोसांवर चांगली जागा पाहून यानें तेथें एक नवीन शहर वसविलें. याची भागावती (भागमती) नांवाची एक आवडती स्त्री होती. तिचें नांव त्यानें या नव्या राजधानीस ठेंविलें. त्याचा मुलगा हैदर यानें भागानरचें हैद्राबाद असें नाव पुढें बदललें. महंमदनें भागानरास पाणीपुरवठा उत्तम केला. जुम्मामशीद, चार मिनार, दवाखानें, हमामखाने, बगीचे वगैरे त्यानें तयार केले. यानें फारशीं युद्धें केलीं नाहींत. याच्या दरबारीं इराणचा वकील राहिला होता. इराणचा शहा अब्वास यानें आपली मुलगी याच्या मुलास देण्याचा विचार केला होता. याच्या कारकीर्दींत प्रख्यात मीर जुम्ला किंवा अमीर उलमुल्क हा दिवाण होता (मीरजुम्ला पहा.) हा शहा चौतीस वर्षे राज्य करून १६२६ त मेला. यानें लोकोपयोगी कामांत अडीच कोटी रुपये खर्च केले. हा विद्वान होता. यानें ‘कुलिआत् कुत्बशाह' म्हणून एक फारशी, हिंदी व दक्षिणी कवितांचें मोठें पुस्तक प्रसिद्ध केलें आहे.
अ ब्दु ल्ला हु से न.- (१६२६-१६७२) हा महंमदचा पुत्र. यानें शांततेनें राज्य केलें. या वेळीं शहाजहाननें निजामशाही बुडविली आणि आदिलशहापासून खंडणी घेतली.नंतर याच्या वर शहाजहान चालून आला असतां यानेंहि खंडणी कबूल केली (१६३४). याचाहि वजीर मीरजुम्ला होता. औरंगझेब हा दक्षिणचा सुभेदार झाला असतां व मीरजुम्ल्याचें व शहाचें वांकडें आलें असतां मीरनें औरंगझेबचा आश्रय घेतला. औरंगझेबास गोंवळकोंड्याची संपत्ति पाहिजे होती. आणि औरंगझेबानें कांहीं तरी निमित्त काढून व मागण्या मागून त्या नाकारल्याबद्दल गोंवळकोंड्यास वेढा दिला.
अखेरीस शहाजहानच्या सक्तीच्या हुकुमावरून नाइलाजानें औरंगझेबनें वेढा उठविला व तह केला; कुत्बशहाची मुलगी सुलतान महंमदला दिली. त्यानें अमीनला बंधमुक्त करून जुम्ल्याची संपत्ति व जहागीर सोडली. मोंगलाल थकलेली खंडणी देऊन रामगीर जिल्हाहि दिला. या स्वारींत मोंगलाला फारसा फायदा झाला नाहीं असें औरंगझेंबानें बापास कळविलें. मात्र सारी लूट स्वत: दाबून ठेवून उलट २० लाखांचें कर्ज त्यानें बापास दाखविलें. यानंतर १६६६ त कुत्बशहानें समदु:खी जाणून औरंगझेबाविरुद्ध आदिलशहास मदत केली. या सुमारास शिवाजी छत्रपति याचा धुमाकुळ सुरू झाल्यानें यानें त्यांच्याशीं सालीना पांच लक्ष खंडणी देण्याचें ठरवून तह केला (१६६८). पुढें त्यानें मराठ्यांनां त्रास दिल्यामुळें महाराजांनीं १६७२ त ह्याच्यावर स्वारी केली व बरीच संपत्ति काबीज करून त्याचा मोड केला (अबदुल्ला कुतबशहा पहा ज्ञानकोश विभाग ६). याच वर्षीं शहा मरण पावला.
अ बू ह स न.- अबदुल्ला निपुत्रिक होता म्हणून त्याचा जांवई अबु हसन (१६७२-१६८७) हा गादीवर आला. हा गादीवर येण्यापूर्वीं बराच विषयासक्त व मद्यपी होता. गादीवर बसविण्यांत याला मादण्णा(मदन)पंतानें बरीच मदत केल्यानें त्याला यानें दिवाणपद व त्याचा भाऊ अकण्णा (एकनाथ)पंतास सेनापतिपद दिलें. मादण्णाच्या कारकीर्दीत राज्यांत फार सुधारणा झाल्या. यावेळीं आदिलशाही दुर्बळ झाल्यानें व मोंगल आपल्या नाशावर टपलेला पाहून यानें मादण्णाच्या संमतीनें शिवाजी महाराजाशीं प्रथम मैत्रीचा व नंतर मांडलिकीचा तह केला (१६७६). संभाज छत्रपतीशींहि तोच तह त्यानें कायम ठेवला. शिवाजी छत्रपती हे कर्नाटकांत मोहिमेवर गेले असतां यानें त्यांना सैन्याची मदत दिली होती. पुढें (१६७७) मोंगलांचा दिलेलखान व विजापूरकरांचा अबदुल करीम हे एकत्र होऊन गोवळकोंड्यावर आले, तेव्हां मादण्णानें त्यांचा पराभव केला. पुढें १६८३ त खासा औरंगझेब दक्षिणेंत चालून आला. या वेळीं हसनशहाची तयारी चांगली होती. त्याचें सैन्य व संपत्ति पुष्कळ होती. मादण्णाची कारकीर्द सर्व हिंदूंनां प्रिय झाली होती. मात्र मुसुलमान सरदार त्याच्या विरुद्ध शहाचे कान भरीत, परंतु त्याने तिकडे, लक्ष दिलें नाहीं. नंतर (१६८५) संभाजी छत्रपतीस शहानें खंडणी दिली. एकमेकांचे दोस्त व शत्रू एकच व परस्परांनीं परस्परांस सहाय्य करावें असा तह शिवाजी महाराजांपासून अंमलांत होताच. औरंगझेबाच्या मनांत आतां गोवळकोंडें खालसा करावयाचें आलें. कारण कुत्बशहा हा वेळीं आदिलशहास मदत करतो, तेव्हां आधीं गोवळकोंडें घेतल्याशिवाय विजापूर पडत नाहीं. असें ठरवून कांहीं कुरापती काढून त्यानें स्वारी केलीं. त्यापूर्वीं आपल्या वकिलाकडून त्यानें कुत्बशहाचे अनेकदां अपमान केले होते. त्याची त्याला सांगीच होती कीं, “तूं कुत्बशहाचा नेहमीं अपमान करीत जा. म्हणजे केव्हां तरी तो तुझा अपमान करील व असें झालें म्हणजे मला लढाईस कारण सांपडेल.'' सारांश, शहानें १६५६ चा तह पाळला नाहीं. “खंडणी वेळेवर देत नाहीं, शिवाजी संभाजी सारख्या काफरांनां खंडण्या देतो'' वगैरे बाह्य कारणें दाखवून औरंगझेबानें लढाई पुकारली.
त्याचे सरदार सादतखान व खानजहान गोवळकोंड्यावर आले (१६८६). मादण्णानें सेनापति इब्राहिमला त्यांच्यावर पाठविलें. मलखेड येथें लढाई होऊन तींत मोंगलांचा पराभव झाला; तेव्हां औरंगाझेबानें सुलतान मुअज्जमला मदतीस पाठविलें. त्यावेळीं इब्राहिमनें फितूर होऊन त्यांनां अडविलें नाहीं. मोगंल हैद्राबादेस आला. तेव्हां मादण्णाचा सल्ला न ऐकतां भिऊन शहा गोवळकोंड्यास गेला. तिकडे इब्राहिमला औरंगझेबानें लांच देऊन फोडलें त्यामुळें मोंगलांचा सुखासुखी हैद्राबादेंत प्रवेश झाला. या गडबडींत मादण्णाचा खून त्याच्या मुसुलमान शत्रूंनीं केला. परंतु सैन्याची तयारी चांगली करून ठेविली होती. त्यामुळें विजापूरला मदतीची अपेक्षां असल्यानें औरंगझेबानें हैद्राबाद पडलें तरी दोन कोटींची खंडणी घेण्याचें ठरवून कुत्बशहाशीं तह केला व खंडणीवसुलीस मुअज्जमला तेंथे ठेविलें (१६८६). यानंतर विजापूर पडलें तेव्हां गोवळकोंडें घेण्याचें नक्की ठरवून व कुलबुर्ग्याच्या एका फकीराच्या थडग्याच्या दर्शनाचें निमित्त करून तो कुत्बशाहींत उतरला. तत्पूर्वीं कर्नाटक, अदवानी इकडील मदत गोवळकोंड्यास येऊन पोहोंचूं नये म्हणून त्या बाजूस त्यानें गाझीउद्दीन यास पाळतीवर ठेविलें (१६८७) व सादतखानाकडून गोवळकोंड्याच्या सैन्यांत फितुरी चालविली. तसेंच वाटेल त्या नीच युक्त्या अंमलांत आणून व धाकदपटशहा दाखवून त्यानें कुत्बशहाचा पैसा उपटण्याचा क्रम अव्याहत चालविला. शेवटीं तर शहानें आपल्या बायकोच्या अंगावरील दागिने सुद्धा दिले तरी औरंगझेबाला त्याची दया आली नाहीं. शेवटीं बदफैलीपणा, कारभारी ब्राह्मण नेमणें व मूर्तिपूजक संभाजी छत्रपतीशीं दोस्ती करणें वगैरे आरोप त्याच्यावर उघडपणें ठेवून औरंगझेबानें लढाईस सुरुवात केली. कुत्बशहा या कृत्यामुळें चिडला. अगदीं विश्वासू लोकांसह तो हैद्राबादहून गोवळकोंड्याच्या किल्ल्यांत गेला. यावेळीं मादण्णाची त्याला फार आठवण झाली. औरंगझेबानें किल्ल्याला वेढा दिला. त्याचे सारे अंमलदार फितूर झाले. खजिना आधींच औरंगझेबानें रिता केला होता. आठ दहा महिने वेढा दिला असतांहि शहानें मोठ्या शौर्यानें किल्ला लढविला. अखेर वरील सर्व कारणें एकवटून व विश्वासघात होऊन मोंगलानें किल्ला घेतला. अबुहसन कुत्बशहा औरंगझेबाच्या हातीं पडला (१६६७ सप्टंबर). त्याला त्यानें कैद करून दौलताबादेच्या किल्ल्यावर कैदेंत टाकिलें; तेथें तो मरेपर्यंत होता. याच्या बदफैलीपणाबद्दल मोंगल इतिहासकारांनीं अवास्तव वर्णनें दिलीं आहेत. राज्यावर आल्यानंतर यानें आपलें वर्तन सुधारलें. त्याला पकडून नेल्यानंतर त्याच्यासाठीं त्याची प्रजा फार हळहळली. त्याच्या शौर्याच्या व न्यायाच्या अनेक गोष्टी अद्यापि त्या प्रांतीं ऐकूं येतात. या घराण्यानें १७५ वर्षें राज्य केलें. त्यांत सहा सुलतान झाले. त्यांनीं बांधलेल्या इमारती व कामें अद्यापि शिल्लक आहेत. हे सुलतान रयतेची, काळजी घेणारे होते यामुळें दंगेधोपे झाले नाहींत. या घराण्यांतील शहांच्या कबरी बहुधा गोवळकोंड्यास आहेत [मुसुलमानी रियासत; काफीरखान; द. हिं. घराणीं; मोडक; बील.]