विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गरुडपुराण- अठरा महापुराणांतील एक. हें पुराण वैष्णवपंथाचें आहे; यामध्यें गरुड पक्ष्यानें विष्णूच्या आज्ञेवरून या परमेश्वरा (विष्णू) च्या महिम्याचें तत्व वर्णन केलें आहे. जगदुपत्ति, आदित्यरूपी विष्णूंची भक्ति, विष्णूची अमूर्त पूजा, शिव व इतर दैवतांची पूजा व इतर समारंभ वगैरे गोष्टी यांत आल्या आहेत. यांत सूर्य व सोमवंशी राजांच्या वंशावळी दिल्या आहेत. रामायण, महाभारत व हरिवंशांतील माहिती यांत दिली आहे व इतर हरएक माहिती- वैद्यक, साहित्यशास्त्र, व्याकरण इत्यादि – दिली आहे. शिवाय सर्व प्रकारचीं माहात्म्यें- गयामहात्म्य (गयातीर्थाचें श्राद्धपक्षांसंबंधी महत्व) आणि प्रेतकल्प (मृतांच्या आत्म्यांविषयीचे विधी)- या पुराणांपैकीं होत असें मानतात. या गरुडपुराणाचे (१) आचारकाण्ड, व (२) धर्मकाण्ड असे दोन विभाग असून त्यांपैकीं आचार काण्डांत एकंदर २४० अध्याय आहेत. धर्मकाण्डाचेहि (१) प्रेतखंड व (२) ब्रह्मखंड असे पोटविभाग पाडलेले असून प्रेतखंण्डांत ४९ अध्याय व ब्रह्मखंडांत २९ अध्याय आहेत.
आ चा र कां ड.- मंगलाचरणानंतर नैमिषारण्याध्यें सूत पुराणिकास शौनकादिक ॠषींनीं नारायणकथाबद्दल विचारलें असतां पूर्वी गरुडानें कश्यपमहर्षीस व नंतर व्यासानें सूतास सांगितलेलें गरुडपुराण शौनकादिकांस सांगण्यास सूत प्रारंभ करितात. त्यांत विष्णूनें कुमार, सूकर, सात्वतमार्गप्रवर्तक देवर्षि, नंतर नरनारायण, सांख्यमतप्रवर्तक कपिल, दत्तात्रेय, यज्ञदेव, उरुक्रम, पृथु, मत्स्य, कूर्म, धन्वतरी, मोहिनी, नृसिंह, वामन, परशुराम, व्यास्र, दाशरथी राम, रामकृष्ण, भविष्यत् कालीं कीकटांत होणारा बुद्ध व विष्णुयशापासून कल्की अशा रीतीनें घडलेले भगवंताचे अवतार वर्णन करून गरुडपुराणाच्या उत्पत्तीचे हेतू वर्णिले आहेत. दुस-या अध्यायांत ॠषींनीं गरुडपुराणाची परंपरा विचारल्यावरून पूर्वी विष्णूपासून रुद्रास, ब्रह्मदेवास व नंतर त्याजपासून व्यासनारदयक्षांस व त्यापासून सूतांस हें पुराण कळल्याबद्दल सूत सांगतात. याला 'गरुड पुराण' हें नांव पडण्याचें कारण पूर्वी एकदा गरुडानें विष्णूस आपल्या विनता नांवाच्या आईस सोडविण्यास व आपल्या नांवाची पुराणसंहिता रचण्याविषयीं आपण समर्थ व्हावें म्हणून प्रार्थना केली. त्यावेळीं विष्णूनीं आपलें ध्यान करून त्यास राण रचण्यास सांगितलें.कश्यपानें 'गरूडपुराण' ऐकून त्या प्रभावानें वठलेल्या वृक्षांस फलपुष्पांनीं समृद्ध केलें. ३ र्यांत मी तुम्हास पुराण सांगतों असें सूत शोनकादिकांस सांगतात. ४ थ्यांत रुद्रास विष्णु प्राकृत वैकृतिक सृष्टि सांगतो तीः प्रथम अनंतापासून अव्यत्तच्-आत्मा-बुद्धि-मन-ख (आकाश)-वायु-तेज पाणी- भूमि हीं तत्वें परंपरेनें उत्पन्न होतात. प्रभु हिरण्मय अंडांमध्यें शरीर धारण करतो व तोच प्रभु रजोगुणयुक्त ब्रह्मदेवस्वरूप धारण करून सृष्टिरचना, विष्णुस्वरूपानें पालन व कालस्वरूपानें नाश करतो. पहिली महत्सृष्टि, दुसरी तन्मात्रासृष्टि व तिसरी वैकारिक म्हणजे इंद्रियसृष्टि व चौथी स्थावरसृष्टि. पांच वैकृत सर्ग व तीन प्राकृत सर्ग, अशा-रीतीनें चराचर सृष्टि उत्पन्न होते. ५ व्यांत ब्रह्मदेवापासून सप्तर्षी व मरीचाच्य आंगठयापासून दक्ष व त्याची पत्नी यांची उत्पत्ति, दक्षयज्ञामध्यें शंकराचा अपमान झाल्यामुळें सतीनें देहत्याग करून हिमालयापासून मेनकेच्या ठिकाणीं जन्म धारण व नंतर पार्वतीपासून विनायकोत्पत्ति दिली आहे.६व्या अध्यायांत स्वायंभुव- शतरूपा ह्यांच्यापासून प्रियव्रत व उत्तानपाद, उत्तानपादापासून सुनीति व सुरुचि ह्यांच्या ठिकाणीं ध्रुव व उत्तम ह्यांचें जन्म, त्याचप्रमाणें कश्यपास अदितीच्या ठायीं द्वादशादित्य व त्याचप्रमाणें दितीच्या वंशाचें वर्णन-७ व्यांत तंत्रपद्धतीप्रमाणें सूर्य, सशत्तिच्क सरस्वती इत्यादींची पूजा कशी करावी हे सांगितलें आहे. नंतर वज्रनाभ मंडल काढून विष्णूची पूजा करण्याचा विधि ८ व्या अध्यायांत वर्णन केला आहे. ९ व्यांत विष्णुदीक्षा देतांना गुरूनें व घेतांना शिष्यानें काय काय गोष्टी कराव्या ह्याचें वर्णन आहे. १० व्या अध्यायांत पद्ममंडलाची रचना कशी करावी व त्यांत देवतांची स्थापना करून समंत्रक महालक्ष्मीचें पूजन कशा रीतीनें करावें ह्याचें वर्णन आहे.११ व्यांत नऊ व्यूह कोणकोणते व त्यांची अर्चा करण्याचा विधि काय ह्याचें विस्तृत विवेचन आहे. १२ ते ४८ या सदतीस अध्यायांमध्यें विष्णुपंजर, तसेंच विष्णुसहस्त्रनाम इत्यादि स्तोत्रें त्याचप्रमाणें विष्णु, सूर्य, शिव वगैरे देवतांचें तांत्रिक विधींस अनुसरून पूजन करण्याचे प्रकार,त्याचप्रमाणें साप, नाग, ह्यांसारखें विषारी प्राणी चांवले असतां त्यांच्या विषाची बाधा निवारण करण्याचें मंत्र, ग्रहपीडा रोग निरसन इत्यादि करणारी सुदर्शनचक्रासारखी मंडलें व त्यांचे पूजनविधी, त्याचप्रमाणें द्विजांनीं संपूर्ण पापांचा नाश करण्याकरितां करावयाचे संध्याविधी इत्यादिकांचे वर्णन आहे. त्याचप्रमाणें ॠषि, देवता, गोत्र इत्यादिंच्या विनियोगन्यासासह गायत्रीमंत्र जपण्याचा विधि इत्यादि वर्णन आहे. त्याचप्रमाणें विष्णुलोक प्राप्त करून देणारें सूर्यार्चन कसें करावें, कार्यांत सिद्धि मिळण्याकरितां दुर्गाजप कसा करावा, ज्या मंत्रांनीं पत्नीचा लाभ किंवा वध करतां येतो ते मंत्र, त्याचप्रमाणें सर्व मनोरथ पूर्ण करणारें ब्रह्ममूर्तीचें ध्यान कसें करावें, प्रावृट्कालीं विष्णूच्या पवित्रा रोहणापासून वर्षभर विष्णूपूजा केल्याचें फल कसें प्राप्त होतें, त्याचप्रमाणें चारी पुरुषार्थ साधून देणारीं शालग्राम मूर्तीचीं लक्षणें कोणतीं, घरें, राजवाडे, देवालयें, बागवगीचे इत्यादींचीं शुभाशुभ लक्षणें कोणतीं इत्यादि विविध विषयांचें वर्णन ह्या अध्यायांतून आलें आहे. ४९ ते ५२ ह्या चार अध्यायांपैकीं पहिल्या अध्यायांत स्मृत्युक्त वर्णधर्म व आश्रमधर्म यांचें संक्षेपानें विवरण आहे व तदनंतरच्या अध्यायांत सर्व वर्णांनां सामान्य असा दिनचर्याविधि निरू पण केला आहे. ५१ व्या अध्यायांत दानविधीच्या नित्य, नैमित्तिक व काम्य अशा तीन प्रकारांचें विवेचन असून ५२ व्यांत पांच महापातकें कोणतीं व त्यांस प्रायश्चित्तें कोणतीं ह्याचा विचार आहे. ५३ व्या अध्यायांत प्रश्नोत्तरादि नसतां एकदम निराळ्या विषयांचें विवेचन सुरू होतें त्यावरून हा प्रक्षिप्त भाग असावा. ह्यांतील विषय मार्कंडेय पुराणांतील ६६ व्या अध्यायांतील आहे तो असा:- पद्म, महापद्म, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, शंख असे आठ दैविक निधी आहेत ते पूर्वपुण्याईनें मनुष्यप्राण्यास प्राप्त झाले असतां त्यास निरनिराळ्या प्रकारची फलें प्राप्त होतात.ह्या देवतारूप निधींपैकीं पद्म व महापद्म हें सात्विक, मकर व कच्छप हे तामस, मुकुंद व कुंद हे राजस, नील हा सत्व रजोयुक्त व शंख हा रजस्तमोयुक्त असतो असें वर्णिलें आहे.
५४ ते ५८ या पांच अध्यायांत भूगोल व खगोलसंबंधी सर्व पौराणिक कल्पनांचें वर्णन आलें आहे. स्वायंभूव वंशांतील प्रियव्रत यानें आग्नीध्रादि सात मुलांनां सात द्वीपें वांटून दिलीं त्यापैकीं जंबुद्वीपाचा राजराजेश्वर आग्नीध्र यानें आपल्या नाभी प्रभृति नऊ मुलांनां नवखंडें विभागून दिलीं;भरतखंडामध्यें निरनिराळ्या दिशांस किरात, यवन, आंध्र,ब्राह्मणादिकांची वस्ती असल्याचें वर्णन आहे. त्यानंतर महेंद्रादिपर्वत व तापीपयोष्णी वगैरे नद्यांची माहिती आहे. ५६ व्या अध्यायांत इतर द्वीपें, त्यांचे अधिपती वगैरेंचे वर्णन आहे. ५७ व्यांत नागलोक, पाताळ लोक त्याचप्रमाणें पुष्करद्वीपांतील रौरवदि नगरकांचें वर्णन आहे.५८ व्या अध्यायांत खगोलसंबंधीं म्हणजे सूर्य व चंद्र इत्यादींचा वास, त्याच प्रमाणें सप्तर्षी वगैरे नक्षत्रांच्या परिभ्रमणासंबंधी हकीकत आली आहे.
५९ ते ६७ व्या अध्यायांतील मुख्य विषय फलज्योतिष व सामुद्रिक इत्यादिकांसंबंधी आहे. सत्तावीस नक्षत्रांच्या देवता कोणत्या, मोठमोठ्या इमारती बांधण्यास किंवा कार्यसिद्धि तत्काल होण्यास शुभमुहूर्त कोणते, नवग्रहांच्या दशा व त्यांची शुभाशुभ फलें व तन्निवारणीय उपाय कोणते,बाराव्या स्थानीं असलेल्या चंद्राचें फळ काय, लग्नकुंडली विज्ञानावरून शुभाशुभ योग कोणते, सामुद्रिक शास्त्राप्रमाणें स्त्रीपुरुषांच्या हस्तरेषांचीं फलें काय, लक्षण काय,त्याचप्रमाणें स्वरोदयानुसार उजव्या व डाव्या नासिकेंतून स्वर वहात असतांना कार्यसिद्धीचीं शुभाशुभ लक्षणें कोणतीं इत्यादि गोष्टींचा उहापोह केलेला आहे.
६८-८० या तेरा अध्ययांतील विषय म्हणजे वज्र, मोतीं,पद्मराग, मरकत, इंद्रनील, वैडूर्य, पुष्पराग, कर्केतन, भीष्म, पुलक, रुधिराक्ष, स्फटिक व विद्रुम इत्यादि मूल्यवान रात्नांची उत्पत्ति कशी होते, त्यांच्या किंमतींची परीक्षा कशा रीतीनें करावी, त्यांचीं शुभाशुभ लक्षणें कोणतीं इत्यादि गोष्टींबद्दल उपयुक्त विवेचन आहे.
८१ ते ८६ यांत गंगाद्वार, प्रयाग, वाराणसी, कुरुक्षेत्र, प्रभास,द्वारका, सरस्वती, केदार, संभलग्राम, बदरिकाश्रम, श्वेतद्वीप, माया,
नैमिषारण्य, पुष्कर तीर्थ, अयोध्या, चित्रकूट, गोतमी, रामगीर्याश्रम, कांची, तुंगभद्रा, श्रीशैल, सेतुबंध रामेश्वर, कामतीर्थ, उज्जयनीं, कावेरी, चंद्रभागा, मथुरा, शोणनद, जंबूसर, महेंद्रपर्वत, कावेरी, गोदावरी, पयोष्णी, विंध्य, नर्मदा,गोकर्ण, गोवर्धन पर्वत, कृष्णवेणी, भीमरथी, गण्डकी, इरावती, बिंदुसरतीर्थ इत्यादि महातीर्थ प्रसिद्ध आहेत. परंतु त्या सर्वांत गया क्षेत्र अक्षय ब्रह्मलोक देणारें आहे. कारण अशी ख्यायिका आहे की पूर्वी गयासुर नामक दैत्यानें देवांनां तपानें जिंकल्यामुळें सर्व देव विष्णूला शरण गेले,तेव्हां एकदां क्षीरसागर समुद्रांतून शिवपूजेकरितां कमलें आणून गयासुर कीकट देशांत विश्रांति घेण्याकरतां पहुडला त्यावेळी विष्णूंनीं आपल्या गदेचा आघात करून त्याचे प्राण हरण केले व तेव्हांपासून गदाधर विष्णू तेथें नेहमीं मुक्ति देण्यास उभे आहेत. ह्या ठिकाणीं प्राण्यांनीं श्राद्ध,दान इ. केल्यास त्यांनां मुक्ति मिळते असें सांगितलें आहे.८६ व्या अध्यायांत एकंदर गयाश्राद्धाचा विधि सांगितला आहे.
८७ व्या अध्यायांतस स्वायंभुव, स्वारोचिष, औत्तम,तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्ण्य, दक्ष, सावर्ण्य,धर्मपुत्र, दक्षपुत्र मनु, रौच्य, भौत्य इत्यादि पहिले सहा गत मनू, सध्यां चालू असलेला मधला वैवस्वत व पुढील होणारे सात मिळून चौदा मनू, त्यांचे पुत्र,ॠषि, देव वगैरे दिले आहेत. ८८ व्या अध्यायांतील कथा म्हणजे रुचि नामक प्रजापति हा दारसंग्रह म्हणजे पापाचें मूळ असें समजून अग्नीची पूजा न करतां फिरत असतां त्याच्या पितरांची गांठ पडली व त्यांनीं पुत्राशिवाय कोणासहि सद्गति मिळणार नाहीं असें सांगून ते अंतर्धान पावेल.८९ व्या अध्यांयातील कथा भाग म्हणजे हा पितृगणांचा उपदेश ऐकून रुचीला दारापरिग्रह करावा असें वाटूं लागलें, परंतु कन्या मिळेना तेव्हां त्यानें ब्रह्मदेवास संतुष्ट करून निरनिराळ्या स्तोत्रांनीं पितरांस संतुष्ट केलें. नंतर त्याला सुंदरी नांवाची भार्या प्राप्त होऊन तीपासून मन्वंतरकर्ता पुत्र होईल असा वर मिळविला. ह्या पितृस्तोत्राच्या पठनानें कोणतें फळ मिळतें हेंहि मध्यंतरी सांगितलें आहे. ९० व्या अध्यायांत वरुणाचा मुलगा पुष्कर याच्या प्रम्लोचा स्त्रीच्या ठिकाणीं उत्पन्न तिच्यापासून रोच्यमून उत्पन्न झाला. ९१ व्या अध्यायांत यंभुवादि मनूंनीं भगवंताचें ध्यान कोणत्या० प्रकारें केलें ह्याचें वर्णन आहे. ९२ व्या अध्यायांत भगवंताच्या व्यक्त व अव्यक्त उपासनांपैकीं व्यक्त उपासना कशी करावी हें सांगितलें आहे.
९३-१०४ यांतील पहिल्या यांतील मजकूर बहुतेक याज्ञवल्क्यस्मृतींतून अनुक्रमभेदानें घेतलेला आहे व शेवटचा १०७ वा अध्याय हा पराशरस्मृतीवरून घेतलेला दिसतो. प्रथम ९३ व्या अध्यायांत गर्भाधानादि संस्कार विवाहाशिवाय अमंत्रक करावे असें वर्णन आहे. ९४ व्या अध्यायांत ब्रह्मचर्याश्रम निरूपण व ९५ व्या अध्यायांत गृहस्थाश्रम धर्मनिरूपिला आहे. ९६ त संकरजातींचीं कर्में सांगितलीं आहेत. ९७ व्यांत वर्णराजतताम्रदि पात्रांची शुद्धि करण्याचे प्रकार सांगितले असून ९८ व्यांत दानधर्म व प्रतिगृह घेण्यास अधिकारी कोण हें सांगितलें आहे. ९९ व्यांत अमावास्या वगैरेसारख्या पर्वदिनी करावयाचा श्राद्धषवधि सांगितला आहे. १०० व्यांत विनायक नांवाच्या ग्रहाच्या पीडेचें निवारण कसें करावें हें सांगितले आहे. १०१ व्यांत सूर्यादि नवग्रहांची शांति कशी करावी हें सांगितलें आहे. १०२ या अध्यायांत वानप्रस्थाश्रमधर्म व १०३ अध्यायांत संक्षेपानें याज्ञवल्क्यप्रणीत संन्यासधर्मांचें निरूपण केलें आहे.१०४ मध्यें मानवी प्राण्याच्या पातकांमुळे त्याला नरक यातना कशा भोगाव्या लागतात व राहिलेल्या पातकामुळें निरनिराळ्या प्रकारचे रोग कसे होतात इत्यादि वर्णन आहे १०५ अध्यायांत ब्रह्महत्यादि पांच महापातकें व त्यांचीं प्रायश्चित्तें ह्यांचें निरूपण आलें आहे. १०६ व्या अध्यायांत खनन व अग्निदहन करण्यास योग्य कोण व त्यांचें अशौच किती ह्याचें विवेचन आहे. १०७ अध्यायांत पराशरोक्त वर्णाश्रमधर्माचें सामान्य निरूपण आहे.
१०८-११५ ह्यांपैकीं १०८ व १०९ ह्या दोन अध्यायांत सामान्य नीतिदर्शक सुभाषितांचा संग्रह केला आहे. ११० मध्यें राजनीतिवर्णन असून राजानें कसें वागावें ह्याबद्दल, त्याचप्रमाणें १११ व ११२ ह्यामध्यें राजपुरोहित, मंत्री, इत्यादि कशा प्रकारचे नेमावेत ह्याबद्दल विवेचन आलें असून पुढील तीन अध्यायांत स्त्रिया व पुरुष यांनीं सामान्य वागणूक कशी ठेवावी याबद्दल सुभाषितें ग्रथित केलेलीं आहेत.
११६-१३७ ह्या २१ अध्यायांत द्वादशमासांतील निरनिराळ्या व्रतांचें निरूपण आलें आहे. प्रथम ११६ व्या अध्यायांत प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत असणारीं निरनिराळीं व्रतें व त्यांच्यादेवता इत्यादिकांचें विवेचन असून नंतर पुढें क्रमाक्रमानें अनंगत्रयोदशीव्रत, अखंडद्वादशीव्रत,अगस्त्यार्ध्यव्रत, रंभातृतीयाव्रत, चातुर्मास्यव्रत आश्विन शुक्ल ११ पासून कार्तिक शुक्ल ११ पर्यंतचें मासोपवासव्रत, भीष्म पंचकव्रत, शिवरात्रीव्रत व त्या प्रसंगी सुंदरसेनक नामक फासेपारध्याला अजाणतां हें व्रत घडल्यामुळें शिवलोकाची प्राप्ति कशी झाली ही कथा, एकादशी व्रत, नारायणार्चन विधि, माघ शुक्लैकादशीच्यावेळीं सुवर्णाच्या वराह देवतेचें पूजन करण्याचा विधि, एकंदर सर्वसामान्य व्रतांची परि भाषा, उद्धारपंचमी, मरीचसप्तमी, फलसप्तमी, ओदनसप्तमी, विजयसप्तमी, दूर्वाष्टमी, गोकुळाष्टमी व कृष्णजन्मोत्सव व्रत, बुधवासरयुक्त षौषाष्टमीला बुधाचें पूजन व वीरनामक ब्राह्मणाची कथा आहे ती अशीः- पाटलिपुत्रनगरांत वीर नामक ब्राह्मण रहात असून त्याची रंभा नांवाची पत्नी व कौशिक नांवाचा एक पुत्र व विजया नांवाची मुलगी होती. कौशिक आपल्या बनपाल नामक बैलास घेऊ गंगा नदींत क्रीडा करीत असतां कांहीं चोरटया गवळयांनीं बैल चोरून नेला त्यामुळें कौशिक दुःखित होत्साता अरण्यांत फिरूं लागला व विजयहि फिरूं लागली. एके ठिकाणीं सरोवराच्या कांठी कांही समारंभ चालत असतांना क्षुधित झाल्यामुळें त्यांनीं अन्नाची याचना केली. तेव्हा त्या दिव्य स्त्रियांनी त्यांना बुधाष्टमी व्रत करण्यास सांगितलें. यानंतर १३३ अध्यायांत अशोकाष्टमी व्रत, महानवमी व्रत, दमनकनवमी व्रत, दिग्दशमी व्रत, ऋष्येकादशी व्रत, श्रवणद्वादशी त,अनंगत्रयोदशी व्रत, धाम व्रत, व वारव्रत्तें हींहि सांगितलीं आहेत. ह्या आठ अध्यायांत एकंदर भूतभविष्य राजांचीं वंशवर्णनें आहेत. प्रथम विष्णूच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या आंगठया पासून दक्ष, त्यापासून अदिति, तिजपासून सूर्य व त्यापासून पुढें सूर्यवंशांतील अनेक राजे झाले. ब्रह्मदेवाचा पुत्र
अत्रि, त्यासून चंद्र, चंद्राचा गुरुपत्नी तारा हिच्या ठिकाणीं उत्पन्न झालेला बुध, त्याचप्रमाणें पुढें कर्णसुत जो वृषसेन त्याच्यापर्यंत चंद्रवंशाची हकीकत आली आहे. त्याचप्रमाणें परिक्षित जनमेजयापासूनचे भावी राजे कोणकोण होणार हें थोडक्यांत सांगितलें आहे. पुढें विष्णूचे दहा अवतारवर्णन व त्याचवेळीं सीतेच्या पातिव्रत्याचें वर्णन करून त्या प्रसंगानें अनुसूयानामक पतिव्रतेनें मांडव्य ॠषीच्या मृत्युकारक शापापासून आपल्या कौशिक नामक कोडया नवऱ्यांचें कसें संरक्षण केलें ह्याचें वर्णन असून पुढें थोडक्यांत श्रीरामचरित्र व श्रीकृष्णचरित्र हेंहि वर्णिलें आहे. त्याचप्रमाणें शेवटी समग्र भारते तिहासाचा रांशहि दिला आहे.
१४६-१९४ व्या अध्यायांतील विषय म्हणजे आर्य वैद्यकशास्त्राचें संपूर्ण विवेचन हा होय. ह्यांत निरनिराळे ज्वर, क्षयादि रोग, त्यांची लक्षणें, त्यांचे प्रकार, त्यांवर औषधोपचार इत्यादि सशास्त्र विवेचन आहे. ह्यावरून हे श्लोक कोठून तरी उद्भृत केले असावेत असें वाटतं. एकंदर सर्व आर्यवैद्यक-
प्रकरण धन्वंतरीनें सुश्रुतास सांगितलें असें दाखविलें आहे.प्रथम रोगांचें निदान सामान्यतः कसें करावें हें सांगून कफ वातपित्त या त्रिदोषाप्रमाणें ज्वरभेद सांगितले असून नंतर रक्तपित्त, कास, श्वास, हिक्का, राजयक्ष्मा, अरोचक, आम्लपित्त, मदात्यय, अर्श, अतिसार, मूत्राघात, प्रमेह, विद्रधि, उदर, पाण्डुरोग, विपर्स, कुष्ठ, कृमि, वातव्याधिरोग इत्यादींचीं निदानें पृथक् अध्यायांत विवेचन केलीं असून सर्व सामान्य वैद्यकशास्त्राची परिभाषा निरूपण केली आहे. व त्यानंतर निरनिराळे ज्वररोग, नाडीव्रणरोग, स्त्रीरोग, त्याचप्रमाणें रोग हरण करणारीं मधुरतिक्तद्रव्यें इत्यादींचें निरूपण आहे. १७४ व्या अध्यायापासून पुढें स्मरणशक्ति वाढवणारें ब्राह्मीघृत, नारायण तेल, अजमोदा तेल, टक्कलावर शोत्पत्ति
करणारें भृंगराजतेल, कर्णरोग हरण करणारें देवदारू तेल लिंगबाहुस्तनकर्ण इत्यादि अवयवांची वृद्धि करणारे निरनिराळे लेप, कावीळ, भाजलेलें अंग, डांस, पिसवां, ढेंकूण,इत्यादिकांचे नाश करणारे धूप व तेलें, स्त्रीपुरुष्ज्ञ वशीकरणास उपयोगी असे धूप, तिलक, तांबूल वगैरे, त्याचप्रमाणें अग्नि मांद्य, कुष्ठ, शूळ, निरनिराळया विष्ज्ञारी प्राण्यांचीं विषें उतरविण्याचे लेप इत्यादींचें सांगोपांग निरूपण आहे व सरते शेवटीं सर्वरोग हरण करणारा विष्णुपूजाविधि व वैष्णव कवच यांचें निरूपण आहे. प्रथमष्णवकवचाच्या पठनानें चित्रकलेतूला विद्याधराधिपत्य प्राप्त झाल्याबद्दल वर्णन असून नंतर मोक्षप्रद असा विष्णुधर्म सांगितला आहे. १९७ व्यांत एकंदर नागजाती वश करण्याचे गारुडमंत्र निरूपिले आहेत व नंतर नित्यक्लिन्नानामक विद्या सांगितली असून स्त्रीपुरुषांचें यशापयश सुचविणारें डामणिसंज्ञकयंत्रोद्धरकथन असून उजव्या व डाव्या नाकपुडींत श्वासोच्छ्वास होत असतां त्याचीं फलें काय हें सांगितलें आहे. २०१ अध्यायांत हत्ती, घोडे, यांच्या रोगनिवारणाबद्दल औषधक्रिया कशी करावी हें सांगितलें असून २०२ मध्यें स्त्रियांचा योनिशूल हरण करण्याचा उपाय, जराहरणाचा उपाय, वाजीकरणाचा उपाय हे सांगितले आहेत. पुढील दोन अध्यायांमध्यें चतुष्पाद जनावरें व वनौषधी यांच्या रोगावरील उपायांचें विवेचन आलें आहे.
२०५-२१२ ह्या आठ अध्यायांतील विषय म्हणजे व्याकरण, छंदःशास्त्र यांचें विवेचन होय. ह्यांपैकीं पहिल्या(२०५।२०६ ह्या) दोन अध्यायांत ''सुप्तिङन्तं पदं ख्यातं'' अशी पदाची व्याख्या देऊन सात विभक्ती कोणत्या, मुख्य व्यंजनसंधी कसे होतात, समासाचे प्रकार कोणते त्याचप्रमाणें संहिता ग्रंथांतील सिद्धप्रयोगाची उपपत्ति कशी लावावी हें विवेचन आहे. त्यानंतर पुढील सहा अध्यायांत छंदःशास्त्राचें विवेचन असून, आर्यावृत्तें, समविषमअर्धसमवृत्तें विवेचली असून पुढील दहा अध्यायांत गृहस्थाश्रमी लोकांचे आचार व कर्तव्यकर्में यांचें वर्णन केलें आहेः- उदाहरणार्थ, समंत्रक स्नानविधि कसा करावा, पंचमहायज्ञांची काय अवश्यकता आहे. ब्राह्मणांनीं संध्याविधि अवश्य कां केला पाहिजे, पार्वण श्राद्धें, वृद्धिश्राद्धें, सपिंडीकरणश्राद्धें करण्याचे नियम इत्यादि गोष्टीचें विवेचन आलें असून चातुर्वणीय लोकांस सर्वसामान्य असे सदाचार नियम विवरण केले आहेत.
आचार काण्डांतील शेवटल्या १८ अध्यायांत तादिचतुर्युगांमध्यें प्रचलित असलेल्या धर्मांचें स्वरूप काय आहे, नैमित्तिक व प्राकृतिक प्रलय कोणते, प्राण्याला नाना विध देह धारण कां करावे लागतात, अष्टांग योगाचें स्वरूप काय, विष्णुभक्ति व विष्णुपूजा कशी करावी, शिवकृत नृसिंहस्तोत्रनिरूपण, त्याचप्रमाणें मृत्युसंसारविमोचक भगवत्घ्यान करावयाचा प्रकार, ब्रह्मज्ञानप्राप्ति व आत्मसाक्षात्कार कसा करून घ्यावा, अर्जुनास श्रीकृष्णांनीं सांगितलेल्या गीतेचें सार, त्याचप्रमाणें ब्रह्मगीतेचें सार व सरते शेवटीं मंत्र, तंत्र, ज्योतिष, वैद्यक, व्याकरण इत्यादि विविध विषयांनीं युक्त अशा गरुड पुराणाच्या पठणाचें फल काय हेंहि सांगितलें आहे.
ध र्म कां ड, प्रेतखंडः- या धर्मकांडार्गत प्रेतखंडाचे एकंदर ४९ अध्याय आहेत. नांवाप्रमाणेंच अन्वर्थक असे यांतील विभाग आहेत. मनुष्य मृत झाला असतां त्याचे अंत्य संस्कार वर्णाश्रमधर्मांप्रमाणें कोणते, त्याचप्रमाणें प्रेत स्थितींत गेलेल्या मनुष्यास भोगाव्या लागणाऱ्या स्वर्ग नरकादि गोष्टींचें कल्पनाचुर वर्णन वगैरे भाग फारच मनोरंजक आहे.
पहिला अध्याय हा एकंदर प्रेतखंडास प्रस्तावनेदाखल असून त्यांत शौनकादिक ॠषींनीं नैमिषारण्यांत सूतास एकदां नित्यकृत्यें समाप्त झालीं असतां असा प्रश्न केलां कीं ''हे सूता, कोणी म्हणतात कीं तृणजलौकन्यायानें देही हा अन्य शरीरें धारण करतो व कांही म्हणतात कीं देहीं हा मध्यंतरी स्वर्गनरकादि उपभोगून नंतर अन्यदेह स्वीकारतों; तर त्यांपैकीं खरी गोष्ट काय?'' त्यावर सूतांनीं उत्तर केलें कीं हे ॠषिगणहो, पूर्वी भगवान् विष्णु व वैनतेय ह्यांमध्यें ह्याच विषयाला अनुसरून संवाद झाला वेळीं भगवंतांनीं गरुडास, मृतांच्या पुत्रादि आप्तेष्टांनीं मरणानंतर मृताची उन्नती कशीं करावी, त्याचप्रमाणें मृतास कर्माच्या गुणाप्रमाणें कशीं फलें मिळतात इत्यादि विषयांनीं युक्त असा 'प्रेतकल्प' नांवाचा विषय कथन केला तोच मी तुम्हाला सांगतो असें सांगितलें.
वरील गरुडप्रश्न ऐकून विष्णूनीं प्रेतकल्प सांगण्यास सुरुवात केली. ह्या दोन अध्यायांत कोणतें कर्म केलें असतां कोणता परिणाम होतो, त्याचप्रमाणें मृताचें र्औध्वदेहिक कसें करावें हें सांगून नंतर रौरव, कालसूत्र, अतिशीत इत्यादि नरकांचें साधन कोणत्या पातकांनीं होतें व चौऱ्यांशीं लक्ष योनींची प्राप्ति कां होते याचें विवेचन आहे.
प्रथम मरणातुरानें दशदानें द्यावींत ती गाय, जमीन,तीळ, सोनें, तूप, वस्त्र, धान्य, गूळ, रुपें, मीठ ह्यांपैकी असावीत. नंतर यमाच्या वैतरणी नदींतून नीट पार पडण्या करितां आतुरानें कपिली गाय, किंवा इतर दान केल्यावर मरणासन्न प्राण्यास शक्य तर संन्यास द्यावा, म्हणजे तो ब्रह्मत्वास जातो. प्राणी गतप्राण झाल्यावर त्यास पुत्रादिकांन स्नान घालून शुद्ध वस्त्रें, चंदन वगैरेनीं शरीर आच्छादित करावें, व मृताचे जागीं एकोद्दिष्ट श्राद्ध करावें. नंतर तिल,दर्भ, घृत, इंधन बरोबर घेऊन यमगाथा म्हणत मृतास आप्तांनीं न्यावें. दक्षिणदिशेस असण्यामध्यें दहनभूमि करून वाटेंत पूर्वोक्त दोन श्राद्धें करून नंतर चिताभूमीवर प्रेताची स्थापना करावी व पुनः श्राद्ध करावें. नंतर सुतादिकांनीं स्वतः चितासंभार घ्यावा व यथाशास्त्र वेदी करावी. प्रेत वस्त्राचे दोन भाग करून एकानें प्रेताच्छादन करावें व एक स्मशानरक्षकास द्यावा. नंतर प्रेतहस्तांत पूर्वोक्त विधीनें पिंड द्यावा व प्रेतास मंत्राग्नि देऊन नंतर स्नान वगैरे करून पुनः पुत्रादि आप्तांनीं तर्पण करावें व गृहीं परत यावें व अश्रुपात न करतां संसाराची नश्वरता लक्षांत घेऊन त्याप्रमाणें वर्तन करावें असें सांगितलें आहे.
५-७ पांचव्या अध्यायांत अशौचाचे सामान्य, नियम,अस्थिसंचयनकाल, त्याचप्रमाणें प्रेतसंबंधीं दानविधि, व प्रेतास परलोकीं त्रास न व्हावा म्हणून करण्यांत येणारा वृषोत्सर्गंविधि, नवश्राद्धाचा काल कोणता, एक वर्षपर्यंत प्रेताच्या सुखाकरितां करण्यांत येणारे विधी, यमदूतांचे व वैतरणी नदीचें भयानक वर्णन इत्यादि विषय आहेत. साहाव्या व सातव्या अध्यायांत अनुक्रमें वृषोत्सर्गानें व विष्णुस्तुतीनें उत्तम गति कशी मिळते याबद्दल कथा सांगितल्या आहेत.
८-१० या अध्यायांत र्औध्वदेहिक क्रियेस अधिकारी नसतांनां जिवंतणी आपला आपण श्राद्धविधि कसा करावा त्याचें निरूपण आहे. क्रियाधिकारी आप्त नसल्यास राजास तो अधिकार आहे असें नवव्या अध्यायांत सांगितलें असून त्याबद्दल कथा सांगितली आहे ती अशीः- बभ्रुवाहन राजा
मृगया करीत असतां मार्ग चुकला. तों त्याला एक प्रेत भेटलें. त्यावेळीं प्रेतानें त्या स्थितीचें कारण त्यास सांगितलें व त्याच्या निवृत्तीचा उपाय सांगितला; त्यावेळीं राजानें वृषोत्सर्ग विधि केल्यावर त्या प्रेतास मुक्ति मिळाली. १० व्या अध्यायांत श्राद्धांत विप्रास वाढलेलें अन्न द्विजशरीरांतून पितरांनां कसें पोहोंचतें व त्यासाठीं श्राद्धविधि अत्यंतावश्यक कसा आहे याचें निरूपण आहे. पुष्करतीर्थावर श्रीरामचंद्र यांनीं दशरथाच्या श्राद्धाकरितां ब्राह्मण बोलाविले असतांनां सीता ब्राह्मणांस पाहून लाजली. श्राद्धसमाप्ति झाल्यावर श्रीरामानें लज्जेचें कारण विचारलें त्यावेळीं तिनें दशरथास पाहिल्याबद्दल सांगितलें असें वर्णन आहे.
यानंतर प्राण्यांनां उच्चनीच गती कशा प्राप्त होतात याबद्दल ११ व्या अध्यायांत विवेचन आलें असून १२ व्यांत अण्डज, जारज, स्वेदज, उद्भिज्ज ह्या चार स्थित्यंतराप्रमाणें ८४ लक्ष योनीचें निरूपण केलें आहे. व हीं शरीरें मृत्युकालीं सोडावीं लागतात, एकटा धर्म प्राण्याच्याबरोबर असतो असें सांगितलें आहे. १३ व्यांत वृषोत्सर्गविधि, निरनिराळे दानधर्म व आत्मश्राद्धविधि यांचें निरूपण आहे. प्राणी आर्तदशेंत मृत्युशय्येवर पडला असतां त्याचीं कर्तव्यें म्हणजे हरि भक्ति, दानधर्म, वृषोत्सर्ग इत्यादि असल्याचें वर्णन आहे.
या नंतर १५ व्या अध्यायांत मरणसमयीं किंवा मरणानंतर पुत्रानेंच क्रिया करावी असें सांगून यमलोकाचा विस्तार केवढा आहे तें व त्यांतील प्राण्यांनां भोगाव्या लागणाऱ्या निरनिराळ्या यातनांचें वर्णन आहे. १६ व्यांत यातना भोगण्याकरितां धारण केलेल्या शरीराचा मृत्यु समयीं पुनः त्याग केल्यानंतर यमदूत प्राण्यास पुनः यम लोकास नेतात असें सांगितलें आहे. १७ व्यांत त्रैलोक्यामध्यें काय काय गोष्टीं घडत आहेत ह्याजवर नजर ठेवण्याकरितां ब्रह्मदेवानें उत्पन्न केलेल्या श्रमणा नामक देवतांचें केवढें माहात्म्य आहे याचें निरूपण आहे. १८ व्यांत वृषोत्सर्ग, कुंभदान, शय्यादान इत्यादींचीं फलें मृतात्म्यास काय मिळतात त्याचें निरूपण आहे. नंतर जीव यममंदिरांत प्रवेश करतो व यमाज्ञेनें मनुष्य, पशु, पक्षी इत्यादि जन्म जीव कसे घेतो याचें विवेचन आहे. अशा रीतीनें ८४ लक्ष योनी फिरून पुढें प्राणी प्रेतपिशाच्चरूपानें आपल्या घरांतील किंवा मित्राच्या घरांतील आप्तांस कसें छळतात, त्यांचें खाद्यपेय कशा प्रकारचें असतें, इतरांस बाधा कशी देतात याचें २० व्या अध्यायांत सुंदर विवेचन आहे. २१ व्या अध्यायांत प्रेतपीडा अगर पिशाच्चबाधा होत असेल तर व प्रेतपिशाच्चांनां मुक्ति मिळावी याकरितां अयुत गायत्रीजप, किंवा विष्णुबलि किंवा वृषोत्सर्गविधि करावेत असें सांगितलें आहेत. २२ व्यांत जीवास प्रेतत्वास नेणारीं दुष्कर्में कोणतीं, याचें निरुपण असून आधारादाखल संतप्तक ब्राह्मणाचा इतिहास दिला आहे. २३ व्यांत प्रेतांचीं स्वरूपें,चिन्हें, निद्रा, विश्रांति या कशा असतात ह्याचें विवेचन आहे.
नंतर २४ व्या अध्यांयांत वेदांमध्यें प्राण्याचें आयुष्य शंभरवर्षे दिलें असतांनां अकालिक मृत्यूचें कारण काय असा ॠषींनीं सूतास प्रश्न केल्यावरून सूत सांगतात कीं निरनिराळ्या तऱ्हेचीं पातकें केल्यानें मनुष्य अल्पायुषी होतो व अशा रीतीनें अकाली मेलेल्या बालकाचा अल्प संस्कार कसा करावा हें सांगितलें आहे. २५ व्यांत मृत बालकाची अत्येंष्टि वृषोत्सर्ग वगैरेशिवाय करावी असें सांगितलें असून आईबापांची उत्तरक्रिया पुत्रादिकांच्या हातून होणेंच प्रशस्त आहे असें सांगितलें आहे. २६ व्या अध्यायांत सपिंडीकरणापूर्वी सर्व सगोत्रांस आशौच असतें, त्याचप्रमाणें सपिंडीकरणास योग्य काल कोणता व अधिकारी कोण याचें निरूपण आहे. २७ व्यांत बभ्रुवाहन राजा व प्रेत यांच्या संवादरूपानें प्रेतत्वाची निवृत्ति होण्यास खरा उपाय म्हणजे गृह, अनेक पदार्थांची दानें हे होत असें सांगितलें आहे. २८ त श्रीविष्णूंनीं गरुडानें केलेल्या, र्औध्वदेहिक क्रियेंत करावयाच्या अनेक दानांच्या फलांसंबंधीं प्रश्नास उत्तरें दिलीं आहेत. २९ व्यांत जीवास परलोकसुखप्राप्ति व्हावी एवढयाकरितां पुत्रादिकांनीं अष्टदानें द्यावींत असें निरूपण असून ३०-३१ ह्या दोन्ही अध्यायांत कार्पास, सप्तधान्यें, मीठ, लोह, हेम, जमीन, वस्त्रें इत्यादि वस्तूंचीं दानें केलीं असतां निरनिराळीं कोणतीं फलें प्राप्त होतात याचें निरूपण आहे.
३२-३४ ह्या तीन अध्यायांत मृत्यु, यमलोकाची पौराणिक कल्पना, त्या ठिकाणचीं काल्पनिक दुःखें व यातना, सप्तभुवनांचे स्वरूप, पुत्रशब्दार्थाचें विवेचन इत्यादि गोष्टी आल्या आहेत.
३५ व्या अध्यायांत प्रथम पिन्डमेलनविधि कसा करावा,त्याचप्रमाणें शव स्मशानांत नेऊन दाह करण्याचा विधि हे सांगितले आहेत. ३८ व्यांत मरणसमयीं भगवंताचें पादोदक घेतल्यानें विष्णुलोकाची प्राप्ति होतें असें सांगितलें आहे. ३७ व्यात यमलोकांत जात असतां पुत्रांदिकानीं दानधर्म केला असतां त्यास कमी यातना कशा होतात हें सांगितलें आहे. ३८ व्या अध्यायांत अयोध्यादि सप्तमोक्ष पुरींत मृत्यु आला असतां,त्याचप्रमाणें ब्राह्मणाकरितां मरण आलें तर, स्त्रियांनीं सहगमन केलें तर, त्याचप्रमाणें अनाथ प्रेतसंस्कार केला तर, सत्पात्रीं दान, एखादी शिवलिंगपूजा इत्यादि केल्यानें मोक्षप्राप्ति होतें असें विवेचिलें आहे. ३९ व्यांत निरनिराळ्या वर्गांतील लोकांनां सूतककालप्रमाण निरनिराळ्या प्रसंगीं कोणतें असावें त्याचें विवेचन आहे. ४० व्यांत वाईट तऱ्हेनें मरण आलेल्या प्रेतास सद्गति मिळण्या करितां नारायणबलि कसा करावा हें वर्णन आहे. ४१-४२ या दोन अध्यायांत वृषोत्सर्ग, गोभूमिदान इत्यादींचीं फलें निरूपण केलीं आहेत. ४३-४४ व्यांत जलांत बुडून, अग्नींत दग्ध होऊन मृत झालेल्या स्त्रिया, मुलें इत्यादिकांची नैसर्गिक शुद्धि असल्याचें व वाईट रीतीनें मृत झालेल्या प्रेतांस सद्गति प्राप्त होण्याकरितां एक वर्षानंतर शुद्ध एकादशीस विष्णु देवतेचें पूजन व पिंडदान कसें करावें हें विवेचन असून नाग वगैरे चावून मेलेल्यांची क्रिया करण्याचा विधि सांगितला आहे.
या शेवटच्या पांच अध्यायांपैकीं प्रथम ४५ व्या अध्यायांत वार्षिक श्राद्धविधि, ४६ व्यांत शुभाशुभ फलें उपभोगून मृत्यु लोकांत प्राणी पुनः आला म्हणजे त्याचीं देहचिन्हें कशीं असतात ह्याचें विवेचन आहे. ४७ व्यांत वैतरणीवर्णन व गोदानफल सांगितलें असून ४८ व्यांत भारतवर्षाची प्रशंसा व गर्भयातनांचें वर्णन आहे. ४९ आध्यायांत प्रथम मनुष्य शरीराचें दौर्बल्य, मोक्षधर्मवर्णन त्याचप्रमाणें ह्या प्रेतखंड श्रवणाचें फल सांगितलें आहे.
ब्रह्मखंडः- प्रथमारंभं शौनकादिक ॠषी हे सूतास ग्रंथारंभीं विष्णु देवतेसच कां नमन करण्याची चाल पडली आहे असा प्रश्न करितात. त्यास सूत पौराणिक उत्तर देतो कीं अष्टादशपुराणांपैकीं कांही राजस, कांही तामस व कांही सात्विक असून त्यांत भागवत, विष्णुपुराण व गारुड पुराण हीं श्रेष्ठ आहेत. कारण विष्णु हा सर्वांत पूजनीय आहे. पुढील अध्यायांत प्रलयानंतर सृष्टिरचनाकालीं एकंदर देवांपैकीं विष्णूचा श्रेष्ठपणा कसा पूजनीय आहे हें वर्णिले आहे.
१०-१४ त वैकृतिक व प्राकृत सृष्टिवर्णन आहे. प्रथम विष्णु ब्रह्मदेव-महत्तत्व व त्यापासून इतर देवता उत्पन्न झाल्याचें वर्णन असून १४ व्यांत देवाकरितां योग्य अन्न कसें असावें ह्या विषयावरून वस्तुसारासार निरूपण आहे. प्रथम विष्णूच्या असंख्य अवतारांतील मुख्य अवतार सांगितले असून १६ व्यांत लक्ष्मीचे अवतार दिले आहेत. १७ व्यांत भारतीचे द्रौपदी वगैरे अवतार देऊन १८ व्यांत सूत्रनामक वायूपासून गरुडाची उत्पत्ति व शेषावतारवर्णन, त्याचप्रमाणें एकादशरुद्रवर्णन आलें आहे. १९ व्यांत हव्यवाहनकन्या नीला हिच्या तपश्चर्येनें संतुष्ट होऊन भगवंतांनीं तिचा अंगिकार कसा केला तें व २०व्यांत भद्रेनें केलेली भगवत्प्राप्ति, २१ व्यांत सूर्य कन्या, कालिंदी हिच्या तपानें प्रसन्न होऊन भगवंतांनीं तिचा केलेला स्वीकार, २२ व्यांत श्रीकृष्ण लक्ष्मणा यांच्या विवाहाचें कारण, २३ व्यांत जांबवंतीची पूर्व कथा व त्याप्रसंगानें २४,२५ व २६ यांत श्रीव्यंकटगिरिवर्णन व महात्म्य आलें आहे. पुढील २७ व्यांत नंदानदीमाहात्म्य, कुमारीतीर्यमाहात्म्य,सोमपुत्रीचें निवासास पाहून तपाचरण व तीस जांबवंतीचा पुनर्जन्म आला असें वर्णन आहे. २८ व्यांत विष्णूखेरीज इतर देवता त्याज्य हें जीवाच्या सुबुद्धि व दुर्बुद्धि नामक भार्यांच्या संवादात्मक रूपकावरून दर्शविलें आहे. २९ व्यांत धर्माचें जगधारणाचें स्वरूप, भागीरथी वगैरे देवतांचें तारतम्यसांगून विष्णुसंतोषकर धर्मवर्णन व भगवत्तत्व निरूपण करून
ग्रंथ समाप्ति केली आहे.