विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भाजीपाला, भा जी पा ल्याचा म ळा.- हा मळा करण्यास जमीन फार उत्तम नको; पण अगदीं हलकीहि चालणार नाहीं. इमारतीचा चुना, रोडे, कप-या वगैरे पडलेल्या जमिनींत भाजीपाला चांगला येणार नाहीं. अशा जमिनींत बहुतकरून रोपास खाणा-या किड्यास दडण्यास जागा असते. उत्तम जमीन थंड असते; तींत मुळांचा शिरकाव होत नाहीं. म्हणून भाजी जोरानें वाढत नाहीं. रेताड जमिनींत मुबलक पाणी व खत यांचा जास्त पुरवठा असलाच पाहिजे. उत्तम जमीन म्हणजे तांबूस काळसर रंगाची, थोडी चुनखडी असलेली, भुसभशीत रहाणारीं, पाण्याचा निचरा होण्यास योग्य अशा प्रकारची असावी म्हणजे तींत केलेल्या श्रमाचा व खर्चाचा मोबदला मिळून भाजी उत्तम प्रकारची होते. नदीकांठच्या पोयट्याच्या जमिनींत भाज्या उत्तम होतात. अशा जमिनींत खताची विशेष जरूरी नसते. पावसाच्या पाण्यांत आलेला गाळ अनायासें खताच्या कामीं उपयोगी पडतो.
खत- खताशिवाय भाजीपाला होणार नाहीं, मग तें खत कोणत्याहि रूपांत असो. पोयटा, गाईम्हशींचें शेण, बक-यांच्या लेंड्या, जनावरांचें मूत, घरांतील केर, राखुंडा हीं खतें विहिरीच्या पाण्यावरील भाजीपाल्यास उत्तम पाटाचें पाणी मुबलक असल्यास सोनखत वापरलें तरी चालेल. वरील खतांच्या अभावीं अगर त्यांच्याच जोडीनें कृत्रिम खतें वापरण्यास मिळाल्यास भाजीपाला उत्तम प्रकारचा होतो.
पूर्वींची मशागत:– जमीन चांगलीं नांगरून कुळवून ढेंकळें फोडून मोकळी केली पाहिजे. जमिनींत चढउतार उपयोगी नाहीं. पाटानें पाणी द्यावयाचें असतें म्हणून पाणी संथपणें वाहून सर्व ठिकाणीं सारखें मिळेल अशी सपाट केलेली जमीन असावी. खडे, रोडे वेंचून काढून टाकावेत. पूर्वींच्या पिकांचीं घसकटें वेंचून टाकावींत खत पुष्कळ असल्यास जमिनीवर पसरून कुळवानें मिसळून टाकावें. सपाट केल्यानंतर स-या, वाफे, वरंबे, पाण्याचे पाट, दंड वगैरे तयार करून ठेवावे. जी भाजी करावयाची तीस जरूर तो आधींची मशागत वेळींच केलेली पाहिजे.
बीं:– बियाची योजना विचारपूर्वक आगाऊ करावी. आयत्यावेळीं मिळेल तें बीं वापरल्यानें कधीं कधीं मनासारखी भाजी उत्पन्न होत नाहीं. विश्वासु व अनुभाविक बींवाल्यापासून बीं आणावें. हळवें अगर गरवें जसें जरूर असेल तशा प्रकारचें बीं चांगली चौकशी करून आणावें बीं खोटें, न उगवणारें व जी जात करावयाची त्या जातीचें नसल्यानें वेळ, पैसा व मेहनत व्यर्थ जाऊन नुकसान होतें म्हणून त्याबद्दल फार काळजी घेतली पाहिजे. बीं पेरावयाचें तें ज्याचा हंगाम ज्या वेळीं असेल त्यावेळींच पेरलें पाहिजे. तसेंच ज्या जातीचें बीं पेरावयाचें त्या जातीची भाजी पेरण्याच्या ठिकाणच्या हवापाण्यांत पूर्ण दशेस पोहोंचते अगर नाहीं याची चौकशी करून पेरावें बहुतेक प्रकारचें बीं मातींत टाकून त्याजवर पाणी दिल्यास तें उगवून त्यांचें रोप होणें हा बियांचा धर्मच आहे परंतु त्या रोपापासून पुढें भाजी तयार होऊन ती उपयोगीं होणें हें हवामान व ॠतुमान यांवर अवलंबून असतें. उदाहरणार्थ, पावसाळ्यांत कोबी, फुलवर हीं कोंकणांत लावल्यास बीं उगवलें तर भाजी तयार होऊन हातीं मिळणार नाहीं. ही भाजी पावसाळा संपल्यानंतरच लावली पाहिजे. तसेंच पावसाळ्यांत होणा-या पालेभाज्या व फळभाज्यांचे वेल हिवाळ्यांत लावले असतां त्यांचें बीं चांगलें असलें तरी बहुश: उगवणारच नाहीं, कदाचित् उगवल्यास रोप वाढून त्यापासूनच भाजी मिळणार नाहीं. कारण त्यास अवश्य लागणारी उष्णता थंडीच्या दिवसांत मिळत नाहीं. ज्या ठिकाणीं थंडी थोडी असते त्या ठिकाणीं गरव्या कोबीचें अगर फलवरचें पीक लाविल्यास त्यापासून भाजी उत्पन्न होणार नाहीं; नुसता जनावरांकरितां पालाच मिळेल. त्याचप्रमाणें जास्त थंडीच्या ठिकाणीं हळव्या जातीची लावणी झाल्यास भाजीची पूर्ण वाढ आपल्या इच्छेच्या आधींच होऊन जाईल. ज्या विलायती भाज्या आपण इकडे करावयास लागलों आहों. उदा. कोबी, फुलवर, नोलकोल, सलगम, बीट, गाजर, वगैरे त्यांचें जें बीं मिळतें त्यांत हळवें (अर्ली) व गरवें (लेंट) अशा दोन जाती निरनिराळ्या असतात. त्यांतींल हळवें जातीचेंच बीं आपल्याकडे लावल्यापासून त्याची भाजी आपल्या हातांत मिळते असा अनुभव आहे. तसेंच भाजीच्या उंच नीच वाढीवरून ठेंगणी (डार्फ) मध्यम (मीडियम) व उंच वाढणारी (टॉल) अशा तीन जातींचें बीं निरनिराळें असतें. आपणांस ज्या प्रकारचें बीं हवें असेल व आपल्या प्रदेशांत जें होत असेल त्याच प्रकारचें बीं आणून पेरावें. सारांश बीं चांगलें मिळवणें हें भाजीपाल्याच्या मळ्यांत एक मुख्य काम आहे.
बियांपासून रोप तयार करण्याची जागा ज्या ठिकाणीं सावली नाहीं, दोन प्रहारानंतरचें कडक ऊन फार लागणार नाहीं, वारा बेताचा लागेल अशाच स्थळीं असावी. एखाद्या उंच झाडाखालीं ती जागा नसावी. कारण उंच झाडावरून पावसाच्या पाण्याचे अगर दंवाचे थेंब रोपावर तें लहान असतां पडल्यानें त्यास इजा होते. दाट सावलींत उजेडाच्या अभावीं रोप फिकट व नाजूक रहातें व उंच वाढतें. भाजीचें रोप करण्याची जागा राबलेली असल्यास उत्तम झाडपाला, गोंवर, गवत, गोठ्यांतील कचरा हीं त्या जागेवर पसरून जाळावीं म्हणजे जमीन तापलेली व भुसभुशीत राहील तींतील कृमीहि मरून जातील. रोपाकरितां बीं पेरण्याचे वाफे असे असावेत कीं, रोप वाढत असतांना त्यांस खुरपणी करणें सोपें जावें व खुरपणाराच्या हालाचालीस जागा असावी. वाफे लांब व अरुंद सुमारें ४X२ हात असावेत म्हणजे वाफ्यांतील रोप न तुडविता खुरपितां येईल. रोपाच्या वाफ्यांत खत जलाल असतां कामा नये व वाफ्यांतील माती भुसभुशीत राहील असें असावें. राखुड्याचें खत यास चांगलें उपयोगी आहे. परंतु त्यांत घरांतील केरकचरा असल्यास सर्व प्रकारच्या तणाची भर असते, त्यामुळें कधीं कधीं उलट त्रासच होतो; म्हणून स्वच्छ राखेचें खत असावें अगर वरीलप्रमाणें राबलेल्या ठिकाणीं वाफे करावे.
बीं मिळविल्यानंतर बियाचें रोप करून तें मोठें झाल्यावर त्याची लावणी करावी लागते अगर बीं जागच्या जागीं पेरून त्याच ठिकाणीं उगवून त्याचीं भाजी तयार होते याचें ज्ञान पाहिजे. कारण मेथीच्या भाजीचें रापे उपटून दुसरीकडे लावावयाचें नसतें. तसेंच मिरच्या, वांगीं, कोबी यांचें रोप तयार करून योग्य अंतरावर लावणी न केल्यास भाजी होणार नाहीं. रोप तयार करण्यास किती जागेंत कितीं बीं टाकिल्यानें रोप चांगलें जोमदार येऊन लवकर लावणीस तयार होईल याचेंहि ज्ञान पाहिजे. उदाहरणार्थ, कोबीचें एक तोळा बीं पेरण्यास निदान ४-५ चौरस यार्ड जमीन लागते त्याऐवजी तेंच मूठभर दिसणारें बीं निम्या जागेंत पेरल्यास रोप दाट उगवेल व जोरानें वाढणार नाहीं; पुष्कळसें मरेल. असें झालें म्हणजे बींच वाईट म्हणून लोक ओरडतात. कित्येक वेळीं चाकवत पोकळ्याचें बींसुद्धां इतकें दाट टाकतात कीं रोपास उगवून वर येऊन वाढण्यास जागाहि मिळत नाहीं बीं पेरण्याच्या दोन रीती आहेत. १) वाफ्यांत फोडून (फेंकून) टाकण्याची व २) खुरपण्यानें अवश्य लागणा-या खोलीच्या स-या (रेघा) पाडून तयांत चिमटीनें बीं टाकावयाची. पहिल्या रीतीनें बीं पेरणारा मनुष्य अनुभाविक नसल्यास बीं जास्त अगर कमी पडण्याचा संभव असतो. बीं टाकल्यानंतर रहाळ हालवतांना कांहीं बीं वरच उघडें राहिल्यानें तें उगवतहि नाहीं. दुस-या रीतीनें आपणांस पाहिजे त्या खोलीवर, अंतरानें व पातळानें बीं टाकतां येतें. त्यास वेळ थोडा जास्त लागतो; परंतु रोप जास्त जोमदार येतें. शिवाय बियाबरोबर नेहमीं तणहि उगवतें. अशा बेळीं रेघांच्या खुणेवरून रोप कोणतें व तण कोणतें हें समजण्यास मार्ग राहतो.
रोप तयार झाल्यानंतर त्याची लावणीहि योग्य अंतरावर झाली पाहिजे. कोणत्याहि जातीच्या भाजीचें पूर्ण वाढ झालेलें झाड जेवढें पसरणारें आहे तेवढी जागा रोप लावतांनाच ठेविली पाहिजे; तसें न केल्यास भाजीचें झाड खुरटलेलें राहून फळेंहि चांगलीं वाढणार नाहींत.
बीं पेरल्यानंतर तें चुकीनें जास्त पेरलें गेल्यामुळें दाट उगवल्यास रोप उपटून तें विरळ करावें. रोपास पाणी देणें तें जपून रोप आडवें पडणार नाहीं अशा रीतीनें द्यावें. रोपांतील तण वेळींच उपटून काढावें व त्याच्या मुळाजवळची माती जपून दोन तीन वेळ भुसभुशीत करावी. इतकी काळजी योग्य वेळीं घेतल्यास रोप जोमदार वाढेल.
साधल्यास अनेक वेळां नाहीं तरी एक वेळ तरी रोपाची अर्धी वाढ झाली म्हणजे त्याची दुस-या जागीं वाफ्यांत अगर ओट्यावर बदलणी करावी. ही बदलणी करतांना रोपारोपांत पहिल्यापेक्षां जास्त अंतर ठेवावें म्हणजे रोप ठोसर होईल व लवकर वाढेल. अशा त-हेनें रोपाची बदली करण्याची आपल्याकडे चाल नाहीं. देशी भाज्यांचीं रोपें एक किंवा दोन वेळ बदल्यानें जास्त जोमांत वाढतात असा अनुभव आहे. हें काम एका अर्थीं दाट रोप विरळ केल्यानें साधतें परंतु जें रोप दुस-या ठिकाणीं लाविलेंच पाहिजे अशा रोपाची लहानपणीं १/२ वेळ बदलणी करण्यापासून फायदा होतो. जास्त किमतींच्या बिंयापासून केलेल्या रोपाची बदलणी अवश्य करावी (उदाहरणार्थ, फुलवर, कोबी वगैरे) म्हणजे रोपाची मर कमी होईल.
रोपाची लावणी करतांना तें उपटून काढल्यानें त्याच्या मूळांस इजा होईल. म्हणून डाव्या हातांत रोप घरून खुरप्याच्या अणीनें तें वर उचलून पाटींत नीट ठेवावें. रोप काढणें झाल्यानंतर त्यावर पाण्याचा हापका मारून तें लावण्याच्या ठिकाणीं न्यावें. तें लावीपर्यंत कडक उन्हांत ठेवूं नये. वाफे तयार करून योग्य अंतरावर कुदळीनें, ठोकणीनें अगर खुरप्यानें खांचा करून डाव्या हातानें रोप धरून त्याच्या मुळ्या खचित सोडून त्यांवर उजव्या हातानें माती लोटावी, व दोन्ही हातांच्या बोटांनीं खाचेंतील माती दाबावी म्हणजे खांच पोकळ न रहातां पाणी दिल्यावर रोप आडवें पडणार नाहीं.
रोपाची लावणी वाफ्यांत स-या करूंन सरीच्या बगलेंत किंवा सत्तेच तळाशीं करतात. ज्या भाजीच्या रोपाची अर्धी वाढ झाल्यानंतर गळेभरणी करणें फायदेशीर आहे अशा जातीचीं रोपें सरीच्या तळाशीं लावावीं लागतात. गळेभरणीच्या वेळीं स-यामोडून सपाट केल्या म्हणजे रोपाच्या गळेभरणीस माती सहज मिळते. अशा प्रकारची लावणीच नेहमीं चांगली फायदेशीर होते. वाफ्यात लावलेल्या रोपासहि चाळणी देऊन नंतर रोपाभोंवतीं माती लाविल्यानें हें काम होतें; म्हणून तसें करतांना केव्हां केव्हां माती ओढतांना रोपाच्या मुळ्या वरच असल्यास त्या उघड्या पडण्याचा संभव आहे.
पाणी:– रोपाची लावणी झाल्यानंतर त्यास पाणी वेळच्या वेळीं दिलें पाहिजे. भाजीपाल्यास पाणी माफक दिलें पाहिजे, उंसासारखें पाणी भाज्यास लागत नाहीं. भाजीस थोडेथोडें पाणी पुष्कळ वेळां मिळाल्यास मानवतें. पाणी गोडें असावें. खा-या पाण्यानें कित्येक भाज्या खेरीजकरून बाकीच्या खुरटतात. लावलेल्या सर्व भाजीस पाणी पोहोंचतें आहे. अशा बद्दल काळजी घ्यावी लागते. भाजी लहान असतांना पाणी थोडें लागेल पण मोठी झाल्यावर मुबलक दिलें पाहिजे कांहीं भाज्यांस, त्या तयार होण्याच्या सुमारास पाणी कमी करावें लागतें.
पहिलें पाणी बेताचेंच द्यावें म्हणजे फुटाफूट न होऊन वाफ्याची माती घट्ट बसेल. दुस-या पाण्यास “आंबवणी” म्हणतात तें पहिल्या पाण्याची ओल उडुन जाण्याच्या सुमारास जमिनीच्या मगदुराप्रमाणें ३ ते ६ दिवसांनीं देतात. तिस-या वेळच्या पाण्यास “चिंबवणी” म्हणतात तें दुस-या प्रमाणेंच लवकर देतात. पाणी देण्याचा मुख्य हेतु भाजीची वाढ करणें हा आहे. जास्त पाणी दिल्यास रोपें गारठतात. कमी दिल्यास त्यांच्या वाढीस योग्य मदत होत नाहीं. लवकर अगर उशीरां पाणी देणें हें जमिनीच्या निच-यावर व हवेंतील उष्णतेवर अवंलबून असतें. जमीन वाळसर व हवेंत कोरडी उष्णता असल्यास पाणी लवकर द्यावें जमीन चिकटवण आणि हवेंत थंडाई व सर्दपणा असल्यास दोन पाण्यांतील अंतर जास्त जास्त राहूं द्यावें. भाजी पूर्ण तयार होण्याच्या वेळीं एक दोन पाणी लवकर दिल्यानें ती तजेलदार व रसभरित असते. कित्येक भाज्यांचीं फळें पिकल्यावर वापरावयाचीं असल्यास तीं पिकावयास लागल्यावर पाणी कमी करावें लागतें. चवथ्या पाण्यानंतर दर २ पाण्यानंतर खुरपणी दिल्यानें रोप चांगलें जोरानें वाढतें.
खुरपणी– भाज्या लहान असतांना खुरपणी फार काळजीनें झाली पाहिजे. तण चांगलें मुळासकट उपटून न काढतां तोडून काढल्यानें दुस-या फुटीच्या वेळीं भाजीपेक्षां कधीं कधीं तण व फार जोर करतें; म्हणून पहिल्या व दुस-या खुरपणीच वेळीं विशेष काळजी घेतली म्हणजे तणाचा बीं मोड होतो व खत चांगलें स्वच्छ प्रकारचें वापरलें असल्यास तणाचा मागमूसहि नाहींसा होतो. भाजीच्या मळ्यात तण असलें तर त्या मळ्याचे २५ गुण कमी होतात तण काढतांना दुसरी काळजी घेणें ती ही कीं, मजूर लोकांस चांगलें माहीत नसेल तर तगाच्याऐवजीं भाजीचें रोप उपटलें जातें; तसेंच मिश्र भाज्या लावलेल्या असल्या म्हणजे काहीं लवकर वाढतात व कांहीं फार सावकाशीनें वाढतात. खुरपतांना अशा सावकाश वाढणा-या भाज्या खुरपणा-याच्या नजरेस आणून न दिल्यास अशा भाज्या तण म्हणून कधीं चुकीनें खुरपल्या जाण्याचा संभव असतो. खुरपणीचे मुख्य हेतू दोन: एक तण मारणें व दुसरा लहान रोपाभोंवतीं भुसभुशीत माती करणें कीं ज्याच्या योगानें रोपें चांगलीं पोसावींत.
जमिनींत लवकर विरघळणारें मुबलक खत असल्यास लावणीनंतर खत देण्याचें कारण साधारणपणें घडणार नाहीं परंतु जमीन पहिल्यानें चांगली खतावलेली नसल्यास एक दोन अगर तीन वेळाहि बरेच दिवस लागणा-या भाज्यासं खत द्यावें लागतें. लावणीनंतर सुमारें एक दीड महिन्यानें उत्तम कुजलेलें खत अगर अमोनियम सल्फेट किंवा पेंडीचें खत दिल्यानें रोपें लवकर जोमानें वाढतात पुढें भाजी तयार होण्याच्या पूर्वीं महिनाभर पुन्हां थोडें कुटी अगर मासळीचें खत दिल्यानें भाजी चांगली खुलून येत व तयार होण्याच्या वेळीं तेजस्वी व स्वादिष्ट होते कोबी, कालीफ्लावर वगैरे बरेच दिवस घेणा-या भाज्यांस अशा प्रकारें दोनदां खत मिळालें तर त्या भाज्या जरूर तयार होतात. हीं मागून दिलेलीं खतें रोपांच्या अगदीं जवळ न देतां त्यांपासून सुमारें एक वीत अंतरावर जमिनींत चार बोटें खोलीवर देऊन मातीनें झांकून टाकून नंतर पाणी द्यावें. म्हणजे त्याचा उपयोग रोपास तात्काळ होतो.
भा ज्यां चे व र्ग.- भाज्यांचे पुढें दिल्याप्रमाणें ८ वर्ग करतां येतील १) कंद-मुळेंभाज्या ज्यांच्या कंदाची बगर मुळांची भाजी करतात २) पालेभाज्या ज्यांचा पाला व कोंवळे देंठ भाजी करण्या वापरतात. ३) फुलभाज्या ज्यांच्या फुलाची भाजी करतात. ४) फळभाज्या-ज्यांच्या फळांची भाजी करतात. ५) शेंगभाज्या ज्यांच्या शेंगा (फळांची) भाजी करतात. ६) शेंगदाणेभाज्या ज्यांच्या शेगांतील ताज्या बियांची भाजी करतात. ७) बीजभज्या- ज्यांच्या वाळलेल्या दाण्यांची म्हणजे बियांची भाजी करतात. ८) मसालाभाज्या ज्यांचा पाला, मुळें अगर फळें दुस-या स्वाद आणण्याकरितां वापरतात.
पोटवर्ग- कंदमुळेंभाज्यांचे पुढील प्रकार आहेत. देशी भाज्या- अळकुड्या, कणगें, (कणगरें) कमळ, कांदा, कारिंदे, कोनफळ, गरमळ, गरमाळू, गाजर, गोराडू, चविणी, बटाटा, मुळा, रताळीं, लसूण, सुरण विलायती – नोल- कोल, बीट, मुळा, लीक, कांदा सलगम (टरनीप)
पालेभाज्यांचे खालीं दिलेले प्रकार महशूर आहेत. देशी; १) मळभाज्या अळूं, ओंवा (पानाचा) अंबाडी, कांदेपात, कोथिबींर, घोळ, चवळाई, चंदनबटवा, चाकवत , चुका, तांदुळजा, पालक, पोकळा, मोपंळा, मुळा, मेथी, राजगिरा, वेलगुंडी, बिरस, शेपू हरभरा २) रानभाज्या - अंबोशी, आस्वल, कांटेमाठ, कुंजर, कुर्ड, केणी, खापरखुंटी, चावेत, विलघोळ, टाकळा, दिंडा, नाळी, पाथरी पेढरें भारंगी, भोवरी, माठ, मोरस, लाना ( लानी) विलायती – कोबी, ब्रगसेलस्प्राउट, सालीट सेलरी.
फुलभाज्यांचे पुढें दिलेले प्रकार आहेत. देशी:- अशोक, अगस्ता (हातगा), कमळ, केळफूल, शिरदोडी, शेवगा. विलायती-कालीफुलवर.
फळभाज्यांचे प्रकार, देशी:- या प्रकारांत झुडुपें होणा-या, वेल वाढणा-या व झाडे होणा-या असे तीन भेद आहेत ते अनुक्रमें अ, आ, इ या संज्ञा पूर्वीं देऊन दाखविले आहेत. अ) अंजीर आ) करटुली (करटोली), आ) कांकडी, आ) कारलें, आ) काशीफळ (गंगाफळ - चक्की) इ) केळीं, आ) कोहाळा, आ) खरबूज, आ) खिरा आ) घोसाळें (पारोशी) आ) टरकांकडी आ) टरबूज कलिंगड अ) डिंगरी, आ) तसवी आ) तोंडली आ) दुध्या तुंडी आ ) दोडका-तुराई-शिराळें, (आ) धेंडसी (दिलपसंत), (आ) पडवळ, इ) पपयी, इ) फणस अ) भेंडी आ) भोंपळा, अ) मिरची (भोपळा, धारवाडी) अ) मोगरी, अ) वांगी आ) वाघांटी आ) शेंदाड (चिबूड) आ) शेन्या विलयती - चोचो, टोमाटो ( बेलवांगी)
शेंगभाजी:– अगस्ता, अबई, गवार, घेवडा, चवळी, बालवापडी, शेवगा (शेकट, शेगट) श्रावणघेवडा;
शेंगदाणे भाजी:- शेंगदाणे भाज्यांचे खालील प्रकार आहेत:- आबई, घेवडा, चवळी, डबलबी; तूर पावटा, भुईमुग, वाटाणा, वाल हरभरा.
बींभाज्या:- यांत खालीं दिलेल्या प्रकारच्या आहेत. अळसुंदे, उडीद, कमळबीज, चंवळीं, डबलबी, तूर, भुईमूग, मटार, मठ, मटकी, मसूर, मुग, मेथ्या, वाटाण, वाल (कडवा), वालगोडा, (पावडा), वालपापडी, श्रावणघेवडा, हरभरा, हुलगा (कुळीथ)
मसालेभाज्यांचे खालीं दिलेले प्रकार आहेत: देशी:- अहाळींव, ओंवा, कोथिंबीर, गरमळ, पानांचा ओंवा, पुदीना, मिरच्या मोहरी, विलायती पासली ( ले. पा. सी. कानेटकर)