विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महाराष्ट्रीय उर्फ मराठी साम्राज्य- महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्रीयांचा अम्मल जेथें जेथं होता त्या सर्व प्रदेशाला मिळून महाराष्ट्रीय किंवा मराठी साम्राज्य म्हणतात. तथापि या सर्व प्रदेशावर सातारच्या राजाची अनियंत्रित सत्ता (अकबर, औरंगझेबाप्रमाणें) नव्हती आणि त्याचें मुख्य प्रधान जे पुण्यास रहाणारे पेशवे यांच्या हातीं जरी राज्यकारभाराची मुख्य व्यवस्था होती, तरी साम्राज्यांतील निरनिराळया भागांत मराठयांनीं वसाहती स्थापून कोल्हापूरकर व नागपुरकर भोंसले, शिंदे, होळकर, गायकवाड, वगैरे मराठे सरदार, या साम्राज्याचें संरक्षण व विस्तार करण्याच्या कामीं लष्करी मदत करण्याच्या करारावर अलीकडील ब्रिटिश साम्राज्यांतील वसाहतीप्रमाणें आपापल्या प्रांतांत संपूर्ण स्वराज्याचे हक्क चालवीत होते.
महाराष्ट्रियांनीं जें साम्राज्य स्थापिलें त्याला एक प्रकारचें निश्चित धोरण होतें. त्याची फोड, ठोकळमानानें पुढीलप्रमाणें करतां येईलः- १६४० सालपर्यंत मराठयांचं धोरण मुसुलमानी अंमलाखालीं मानमरातब मिळवून व जहागिरी उपभोगून थोडेसें स्वतंत्रपणें वागावयाचें होतें. शिवाजीच्या वेळीं महाराष्ट्रापुरतें लहानसेंच पण पूर्ण स्वतंत्र असें स्वराज्य स्थापावयाचें व आणीक मिळविण्याचा प्रयत्न करावयाचा असा त्या धोरणांत फरक झाला. शिवाजीच्या पश्चात् शाहू सुटून येईपर्यंत स्थापलेल्या राज्याचें औरंगझेबापासून हरप्रयत्नानें मराठयांनीं रक्षण केलें. शाहूपासून सवाई माधवरावापर्यंत, हें जुनें स्वराज्य सांभाळून, सर्व हिंदुस्थानावर आपली सत्ता स्थापण्याची व दिल्लीची मोंगल पातशाही नांवाला राखून प्रत्यक्ष व्यवहारांत आपली हिंदुपदपातशाही गाजवावयाची असें हें धोरण बळावलें (आणि महाराष्ट्रीय साम्राज्याचा महत्त्वाचा काळ काय तो हाच आहे). पुढें रावबाजीपसून मराठयांचें साम्राज्यविस्ताराचें धोरण पुन्हां संकोचित होऊन, इंग्रजांपासून स्वराज्याचें संरक्षण करावयाचें व साधल्यास पुनरपि स्वातंत्र्य मिळवावयाचें हा प्रयत्न सुरू होता. १८१८ सालीं मराठीं साम्राज्य अनेक कारणांनीं लयास गेलें. तेव्हांपासून आजतागायत हयात असलेल्या मराठी संस्थानिकांचें धोरण आरंभीं सांगीतलेल्या स. १६४० पूर्वीच्या मराठयांच्या धोरणावर येऊन बसलें आहे.
शि वा जी चें सा म्रा ज्य.- शिवाजीनें स्थापण्यास आरंभ केलेल्या राज्याचें मूळ म्हणजे पुणें, सुपें, इंदापूर, ही त्याची लहानशीं जहागीर होय. या प्रदेशाचें ठोकळ क्षेत्रफळ २३०० चौरस मैल आहे. तीस वर्षांत त्याच्या राज्याचा विस्तार कल्याण ते गोवें, भीमा ते वारणा यांमधील १५००० चौरस मैलांवर पसरला, आणि शिवाजीच्या मृत्यूच्या वेळीं तर पुढील प्रांताचा समावेश मराठी राज्यांत झाला होता, मावळ, वांईसातारा, पन्हाळा, दक्षिणकोंकण, बागलाणत्र्यंबक, धारवाड, बिदनूर, कोलार, श्रीरंगपट्टण, कर्नाटक, वेलोर व तंजावर या देशांतील मिळून एकंदर २६७ किल्ले. राज्याची ठोकळ चतुःसीमा पूर्वेस भीमा; पश्चिमेस अरबी समुद्र; उत्तरेस गोदावरी; व दक्षिणेस कावेरी होय. या एकंदर प्रदेशाचें क्षेत्रफळ साधारणपणें १२०००० चौरस मैल येईल व उत्पन्न दीड ते पावणेदोन कोटी रुपयांचें होतें.
नं त र चें सा म्रा ज्य.- शिवाजीच्या प्रश्चात् मराठी राज्य दक्षिणेकडे फारसें वाढलें नाहीं, उलट हैदर, टिप्पू, इंग्रज हे प्रबळ झाल्यावर थोडें फार कमीच झालें. त्यावेळीं साम्राज्यविस्ताराचा भर उत्तरेस व पूर्वेकडे होता. उत्तरेस राजपुताना धरून पंजाबपर्यंत, व पूर्वेस बंगालपर्यंत असा (साडेपांच लक्ष चौरस मैल) हा विस्तार होता. त्यावेळीं उत्तर हिंदुस्थानांत एकंदर १५ सुभे असून त्यांचा वसूल ३२ कोटी, ४६लक्ष होता; दक्षिणेंत ६ सुभे असून सर्व हिंदुस्थानच्या या २१ सुभ्यांचा वसूल ५० कोटी, ७३ लक्ष होता. त्यांत मराठी साम्राज्याचा वांटा १२ कोटी ४२ लक्ष २० हजारांचा होता. हे आंकडे इ. स. १८०३ च्या वेळचे आहेत. सारांश, शिवाजीच्या जहागिरीचें रूपांतर होऊन जें मराठी साम्राज्य वाढलें तें त्याच्या मूळच्या जहागिरीच्या २३९ पट वाढलें व उत्पन्न ५४ हजार पटीनें वाढलें.
सा म्रा ज्य वि स्ता रा चे प्र का र.- मराठी साम्राज्याचा विस्तार जो झाला तो निरनिराळया रीतींनीं झाला (१) स्वराज्य, (२) जहागिरी व वसाहती, (३) चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्याच्या हक्काचा मुलूख, (४) केवळ खंडणी वसूल करण्याचा म्हणजे मांडलिक राजांचा मुलूख, (५) घांसदाणा मिळविण्याचा मुलूख, व (६) मुलूखगिरीचा मुलूख. स्वराज्य म्हणजे खास शिवाजीनें मिळविलेलें राज्य; त्यानंतर सरंजामपद्धत निघून व काम केल्याबद्दल इनाम म्हणून जहागिरी परप्रांतांत मराठे सरदारांनीं मिळविल्या (ही पद्धत राजारामापासून सुरू झाली, व पुढें पेशव्यांनीं तींत भर टाकली); चौथाई सरदेशमुखी ही शिवाजीनें प्रथम उत्पन्न केली आणि तिच्या आधारावरच पुढें सर्व पेशव्यांनीं हिंदुस्थान पादाक्रांत केलें. ''आज चौथाईसरदेशमुखीचा अंमल बसतो, पुढें संस्थान आपलें होतें,'' हा तर मराठयांचा साम्राज्यधोरणाचा महामंत्र होय. बुंदेलखंडांतील व राजपुतान्यांतील आणि कर्नाटकांतील पुष्कळसे लहान राजेरजवाडे मराठयांनां आपले सम्राट म्हणून मानीत. दिल्लीच्या बादशहाचे गुमास्ते किंवा सेनापती म्हणून मराठे हिंदुस्थानांतील इतर राजेरजवाडयांपासून प्रांताचा वसूल घेत. या जोरावर त्यांनीं इंग्रजांकडे सबंध बंगालच्या चौथाईची मागणी केली होती. ज्या आदिलशाहीचा एक सरदार म्हणून प्रथम शिवाजी होता, त्याच आदिलशाहीनें पुढें त्याला सालीना खंडणी देऊन त्याचें स्वतंत्र राजेपण मान्य केलें.
वि स्ता र क सा हो त गे ला.- हा विस्तार केव्हां व कसा झाला याची साग्र माहिती येथें देतां येत नसल्यानें ठोकळ मानानें सांगतों. शिवाजीच्या मृत्यूच्या वेळीं राज्याचा विस्तार किती होता तो वर दिलाच आहे. संभाजी, राजाराम व दुसरा शिवाजी यांच्या कारकीर्दीत औरंगझेबाच्या स्वाऱ्यांमुळें या राज्याचा कांहीं काळ बराच संकोच झाला; मात्र कायमचा झाला नाहीं. कारण औरंगझेबानें मराठी मुलूख एकदां जिंकून पुढील प्रांत घेण्यास चाल केली कीं, मराठयांनीं पुन्हां आपला गेलेला प्रांत परत जिंकून घ्यावा; तरीपण बराचसा कर्नाटकाचा भाग मोंगलांनीं कायमचा घेतला (१६८०-१७०७). त्यामुळें मराठी राज्याच्या वसुलाला बरीच खोट बसली (कारण कर्नाटकप्रांत पुष्कळ श्रीमंत असे). तसेंच कुत्बशाही व आदिलशाही मोंगलांनीं बुडविल्यानें तिकडून येणाऱ्या खंडण्यांसहि मराठयांस मुकावें लागलें. या सुमारास निझामानें महाराष्ट्रांत आपलें ठाणें देऊन एव्हांपासून पेशवाईअखेरपर्यंत संधि सांपडली म्हणजे मराठी राज्याचे लचके तोडण्याचें काम चालू ठेविलें. शाहु गादीवर आल्यावर प्रथम बाळाजी विश्वनाथानें चौथे-सरदेशमुखी व स्वराज्याच्या सनदा आणिल्या, आणि मग बाजीरावानें सय्यदबंधूंच्या भानगडीचा फायदा घेऊन माळवा, गुजराय, बुंदेलखंड, वऱ्हाड या प्रांतांत हातपाय पसरले. थोडयाच काळांत हे प्रांत व राजपुतान्यांतील कांहीं मुलूख मराठी राज्यांत पूर्णपणें सामील झाला. हिंदुपदपातशाहीच्या चढाईच्या धोरणास बाजीरावानें सुरवात केली. बरेचसे रजपूत राजे मराठयांचे मित्र व कांहीं मांडलिकहि बनले आणि शाहू गादीवर येण्यापूर्वी मराठी राज्याचा जो विस्तार होता, त्याच्या दुप्पट विस्तार बाजीरावाच्या मृत्यूच्या वेळीं झाला. नानासाहेब पेशव्यांनीं कांहीं दिवस उत्तरेकडे लक्ष घालून अंतर्वेदि, पंजाब, ओरिसा, संयुक्तप्रांत या प्रदेशांतील बराचसा मुलूख हाताखालीं घातला. या वेळीं तर दिल्लीच्या बादशहानें स्वतःसाठीं कांहीं नेमणूक ठरवून पेशव्यांस आपल्या रक्षणाचें व राज्यकारभार करण्याचें काम सांगितलें आणि तें काम शिंदे, होळकर यांनी पेशव्यांतर्फे पार पाडलें. दिल्लीची मोंगल पातशाही पुण्याच्या हिंदुपातशाहीच्या पंखाखालीं प्रथम जी गेली ती याच सुमारास. उत्तरेकडे याप्रमाणें अंमल बसल्यावर नानासाहेबांनीं दक्षिणेकडे लक्ष घालून कर्नाटक मिळविण्याचा उद्योग केला आणि ''उत्तरेकडील व दक्षिणेकडील सुवर्णनद्यांचा संगम मध्यें पुण्यास केला.'' कर्नाटकचे नबाब, निझाम, फ्रेंच, इंग्रज यांच्या भांडणाचा फायदा घेऊन नानासाहेबांनीं कर्नाटकांतील शिवाजीनें मिळविलेल्या प्रांतापैकीं जवळ जवळ १/४ प्रांत परत घेतला. निझामाकडूनहि उदगीरच्या लढाईंत खानदेश, नगर व विजापूर वगैरे जिल्ह्यांतील ६२॥ लक्षांचा मुलूख घेतला; इतक्यांत पानपत होऊन उत्तरेकडील मराठयाच्या अंमलास धक्का बसला, परंतु थोरल्या माधवरावानें २३ वर्षांच्या अवधींत पुन्हां आपला गेलेला प्रांत परत मिळविला आणि पुनरपि दिल्लीच्या बादशहास आपल्या लगामीं लाविलें. यानंतर सवाई माधवरावाच्या वेळीं शिंदे, होळकर, भोंसले या उत्तरेंतील सरदारांनीं दिल्लीच ताब्यांत घेऊन, नानासाहेबांच्या वेळचा तिकडील सर्व प्रांत हस्तगत केला आणि दक्षिणेंतहि कर्नाटक मोकळें करून निझामाकडून खडर्याच्या लढाईंत ४० लक्षांचा मुलूख घेऊन बहुतेक निझामाचें राज्य खालसा केलें माधवरावाच्या कारकीर्दीत सर्व मराठी साम्राज्याचा वसूल २० कोटीपर्यंत असावा. व विस्तार प्रत्यक्षाप्रत्यक्ष सर्व हिंदुस्थानच्या ३/४ भागावर असावा. रावबाजीच्या वेळच्या वसूलाचा आकडा मागें दिलाच आहे.
सा म्रा ज्या चा का र भा र.- शाहूच्यापर्यंत छत्रपती स्वतः राज्यकारभार पहात असत. त्याच्या मदतीला अष्टप्रधान ही संस्था असे. ती साधारणपणें सांप्रतच्या इंग्लंडच्या कॅबिनेटच्या पद्धतीची असे. ही एक प्रकारची एकमुखी (राजाच्या हुकमतीखालची) राजशासनपद्धति होती. प्रजेला तींत फारशी भागीदारी नसे. सामाजिक बाबतींत ग्रामपंचायती सर्रहा अमलांत असल्यानें राजा तींत हात घालीत नसे. प्रजेच्या राजकीय हक्काची कल्पना व सांप्रत आपण पहातों तशी तिला अनुसरून केलेली योजना १७ व्या शतकांत यूरोपमध्येंहि अंमलांत नव्हती. मात्र एकोणिसाव्या शतकांत तिकडे ती अमलांत आली असतां हिंदुस्थानांत (अर्थात मराठी साम्राज्यांत) तिची कोणीहि ओळख करून घेतली नाहीं. मराठी साम्राज्यांत परदरबारचे प्रांत जिंकून तेथें जे मराठी सरदार रहात असत, ते छत्रपती (अथवा पेशवे) चे नोकर अथवा मांडलिक म्हणून असून त्यांना जबाबदार असत; परराज्याशीं तह अथवा लढाई करण्याचें स्वतंत्र अखत्यार त्यांस नसत. दत्तकाची परवानगी हि या मध्यवर्तीसरकारकडून घ्यावी लागे; हा नियम मराठी साम्राज्याचे राजपुतान्यांतील, बुंदेलखंडांतील, कर्नाटकांतील व इतर प्रांतांतील जे मांडलीक राजे होते त्यांनांहि लागू होता. परकीय शत्रूपासून संरक्षणाच जबाबदारी साम्राज्यास घ्यावी लागे व त्याबद्दल त्यांच्याकडून खंडणी मिळे. त्यांनां साम्राज्य सांगेल तितकी फौज साम्राज्यसेवेसाठीं ठेवावी लागे. शिंदे, होळकर, भोंसले वगैरे या साम्राज्याचे सरदार म्हणजे आजचे गव्हर्नर, यांना आपल्या जहागिरीचे हिशेब मध्यवर्तीसरकारांस द्यावे लागत. शाहूनें मृत्यूसमयीं आपल्याच हातानें नानासाहेब पेशव्यांस साम्राज्याची कुलअखत्यारी दिल्यापासून पुण्यास मध्यवर्ती सरकारची गादी स्थापन झाली. प्रथम हे सरदार पेशव्यांनां हा मान देण्याचा नाखूष असत, परंतु पेशव्यांनीं सर्व साम्राज्याची सत्ता एकमुखी करून आपल्या हातीं आणली. या सरदारांनां आपल्या प्रांताच्या वसुलापैकीं कांही ठराविक रक्कम साम्राज्यसरकारांत भरावी लागे. यांनां ठराविक लष्कर ठेवण्याबद्दल सरंजाम तोडून दिलेले असत. यांच्याशिवाय लहान लहान जहागीरदार, इनामदार लोक असत, त्यांनां लष्करी नोकरी माफ असे. मात्र वेळप्रसंगी वसुलांत १/४ १/४ असा पैका सरकारांत भरावा लागे.
ल ष्क र व आ र मा र.- लष्कराला (घोडदळ, पायदळ, तोफखाना), पगार काय असे त्याची एकंदर व्यवस्था कशी असे हें पहावयाचें असल्यास खऱ्याचें ऐ. ले. सं. चे भाग पहावेत. खडर्याच्या लढाईंत मराठी साम्राज्याचें लष्कर सर्वांत जास्त होतें (१ लाख, १३ हजार) आणि पानपतच्या वेळीं ७० हजार होते. इ .स. १८०० च्या सुमारास साम्राज्याचें लष्कर २७४००० होते. सरदार, सरंजामदार, इनामदार यांचा लष्कराच्या बाबतींत साम्राज्याशीं कसा संबंध असे, तें वर सांगितलेच आहे. आरमाराचें महत्त्व शिवाजीनें ओळखून त्याचा उपयोग करून घेतला. पेशव्यांनींहि तेंच धोरण पुढें चालविले. थोडया फार फरकानें पेशवाईअखेरपर्यंत कोंकणकिनाऱ्यावर मराठी साम्राज्याचें वर्चस्व होतें. अखरेरीच्या सुमारास इंग्रजांनीं अंमल बसवियास सुरवात केली. कान्होजी आंग्रयास तर इंग्रज, फिरंगी हे चळवळा कांपत असत. नानासाहेब पेशव्यांनीं एक चूक करून आंग्रयांनां हतप्रभ केलें व इंग्रजांनां कोंकणांत हात घालावयास सवड दिली. पण नानसाहेबांच्या या चुकीस एक कारण होतें. नानासाहेब हा मराठी साम्राज्याचा मुख्य अधिकारी होता, अर्थांत त्याच्या अनुरोधानें सर्व सुभेदार, सरदार, अंमलदार यांनीं चालावयास पाहिजे होतें. परंतु तें कांहीं चालत नसत. त्यांत कान्होजीहि एक होता. तो नानासाहेबांच्या आंखलेल्या आरमारी योजनांच्या धोरणास विरोध करी, म्हणून त्याच्या हातून आरमारी सत्ता काढून घेणें श्रीमंतांस भाग होतें. त्याप्रमाणें ती हाती आल्यावर पेशव्यांनीं आरमाराचा सुभा धुळपास देऊन ती एक बाब कह्यांत ठेवली. हैदरटिप्पूवरील व शिद्दी-पोर्तुगज यांच्यावरील स्वाऱ्यांत पुढें या आरमाराचा साम्राज्याला फार उपयोग झाला. या आरमारांत ४०० टनपर्यंतची लढाऊ जहाजें असत आणि त्यांवर ५ पासून ५० पर्यंत तोफा असत. एका विजयदुर्गच्या आरमारी सुभ्यांतच ३ हजारापर्यंत नाविक दळ होतें.
व्या पा री धो र ण.- मराठी साम्राज्यांत व्यापारास पुष्कळ प्रकारांनीं उत्तेजन देण्यांत येई. इंग्रज, फिरंगी वगैरे परकीय व्यापाऱ्यांस फार सवलती असत; व्यापारी मालावर जकात थोडी असे. दुष्काळ वगैरे पडल्यास सरकार व्यापाऱ्यांनां ठराविक स्वस्त दरानें विक्री करण्यास सांगे व प्रसंगविशेषीं स्वतःहि दुकानें काढून प्रजेचा जीव वांचवी. त्याचप्रमाणें विशिष्ट प्रकारचा व्यापार सरकारनें आपल्या हातीं ठेविला होता. साम्राज्याच्या वसाहतींनां व नोकरांनां जकातीच्या बाबतींत बऱ्याच सवलती असत. माळवा, बुंदेलखंड, वऱ्हाड, खानदेश, मावळ, कर्नाटक वगरे प्रांत निरनिराळया हवापाण्याचे व निरनिराळे पदार्थ व वस्तू उत्पन्न होणारे असल्यानें अनेक दृष्टींनीं साम्राज्यांतून सुबत्ता नांदत होती.
साम्राज्याची दरबारी भाषा अर्थातच मराठी होती. मात्र इंग्रज, मोंगल, टिप्पू वगैरे परराजांशीं पत्रव्यवहार फारशी भाषेंत होय. ते दरबारहि मराठी साम्राज्याशीं पत्रव्यवहार फारशींतच करीत. पण याखेरीज साम्राज्यांत सर्वत्र मराठी भाषा वापरीत. लेखन मोडी लिपींत चाले. वसाहती केलेल्या लोकांनीं मराठी भाषेबरोबरच मोडी लिपीचाहि प्रसार हिंदुस्थानांत सर्वत्र केला. मद्रासकडे ५०।६० वर्षांपूर्वी व म्हैसून कडे २५।३० वर्षांखली इंग्रज व म्हैसूरकारांच्या कचेरीतील बरेंचसें लिखाण मोडींत चालू होते आणि अद्यापिहि कर्नाटकांत जमाखर्चांत भाषा कानडी परंतु लिपी मोडी असा प्रकार आढळतो.