विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लासूर - मुंबई, पूर्वखानदेश जिल्हा, चोपडें तालुक्यांतील एक गांव हें चोपडयापासून ८ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारें २००० सांप्रत लासूर गांवी कांही एक नसून कुडाच्या झोंपडया व अस्ताव्यस्त बांधलेली लहान पडकीं घरें मात्र दृष्टीस पडतात. परंतु तेथील किल्ल्याचा अवशेष, एक उत्तम विहीर व एक मशीद हीं मात्र गत वैभवाची साक्ष देण्याकरितां केवळ मुठींत जीव धरून अद्याप कशीतरी उभीं आहेत. कर्नाटकी लोकांचा उपद्रव या प्रांताला असह्म झाला होता तेव्हां गुलझारखान ठोके यानें किल्ला बांधून वर अरबांची शिबंदी ठेविली. त्यांनां वेळच्या वेळेला पगार मिळेना म्हणून त्यांनी गुलजार व त्याचा मुलगा यांनां मारण्याचा बेत केला. अलफखान नांवाचा गुलजारचा दुसरा मुलगा होता तो निसटून या वेळच्या निंबाळकराच्या आश्रयास गेला. तिकडून निंबाळकरानें दिलेले भाडोत्री कर्नाटकी लोक घेऊन तो लासूरला आला कर्नाटकी लोकांनीं अरबांना फन्ना उडविला. परंतु निंबाळकरांच्या सांगण्यावरून ते किल्ला वेढून बसले. अलफखान फार निराश झाला. त्यानें भिल्लांच्या मदतीने हल्ला केला. शेवटीं १०००० रूपये निंबाळकरांनां द्यावे व ते दिल्यावर निंबाळकरांनी किल्ला सोडावा असें ठरलें. ही रक्कम इंग्रंजांनी देऊन किल्ल्यावर इंग्रज (घोडेस्वार) ठेवले. परवांपर्यंत ठोके घराण्यांतील एक मनुष्य लासूरचा मुख्य असून आसपासचा प्रदेश व डोंगरपट्टी त्याच्या नजरेंत असे.