विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वनस्पतिशास्त्र भाग ७
शारीरविज्ञान:- वनस्पतिशास्त्रांतील अंत:शारीरविज्ञानापैकीं शारीरविज्ञान किंवा सूक्ष्मशारीर याजसंबंधीं ज्ञान इतर प्राचींनाप्रमाणेंच आमच्याहि प्राचीनांस मुळींच नसल्यामुळें त्यासंबंधीं येथे विचार करण्याचें मुळींच कारण नाहीं. परंतु बागबागाईत, शेतकी आणि वनस्पतिचिकित्सा (वैद्यक) यांत त्यांची पुष्कळ प्रगति झालेली असून ही प्रगति होण्याच्या मार्गात त्यांनां वनस्पतींचें मूल, स्कंध व पर्णे हे मुख्य भाग व त्यांचे निरनिराळे प्रकार; मोड, डोळे आणि अंकूर हीं बीजाव्यतिरिक्त पुनर्जननाचीं इंद्रियें आणि फूल व फळ हे प्रसव व त्यांतील दल, केंसर, बीज, गीर, साल इत्यादि घटकभाग या सर्व गोष्टींविषयीं किती माहिती झालेली होती याविषयीं सामान्य कल्पना कोणालाही करता येण्याजोगी असल्यामुळें त्याविषयीं पुढें सविस्तर उहापोह न करतां त्यासंबंधीं जेवढें विशेष महत्त्वाचे वाटलें तेवढेंच दिलें आहे.
वनस्पतींच्या मूळ, स्कंध आणि पर्णे या तीन मुख्य भागांची अनेक रूपें किंवा प्रकार असून कांहीं स्कंध, मूलरूप व कांही पर्णे स्कंधरूप असतात; असे मूलरूप स्कंध, स्कंध म्हणून व त्याचप्रमाणें स्कंधरूप पर्णे, पर्णे म्हणून ओळखण्यास शारीरविज्ञानाच्या थोड्या सोपपत्तिक ज्ञानाची आवश्यकता असते; आणि असें कांहीं शरीरविज्ञानविषयक सोपपत्तिक ज्ञान आमच्या प्राचीनांनां होतें हें पुढील अवतरणांत दिलेला उतारा व त्याचप्रमाणें कदलीदंड-स्कंध या जोड शब्दावरून दिसून येतें. ''केळीच्या झाडाचें स्वरूप केळीच्या पानापासून भिन्न नाहीं. तिचा स्तंभहि एकावर एक गुंडाळलेल्या सोपटांचाच झालेला असतो. त्याचप्रमाणें जगत्भ्रम चित्तंतंत्र आहे.'' आतां कदलीदंड-स्कंध या शब्दाचा अर्ध 'भ्रम' असा आहे; म्हणजे कदलीचा जो स्कंध असतो तो पानापासून बनलेला असल्यामुळें स्कंध नसून स्कंधाचा भ्रम होय.
''पत्रोल्लास:'' असा एक सामासिक शब्द संस्कृतमध्यें आहे व त्याचा समास पत्राणां उल्लास: किंवा पत्रात् उल्लासः अशा दोन रीतींनीं सोडवितां येतो. 'पत्रोल्लास' चा अर्थ 'डोळा' असा असून पहिल्या रीतीनें तो समास सोडविल्यास हा शब्द बनविणार्यास डोळा हा अनेक सूक्ष्म पानांच्या समूहापासून बनलेला असतो हें माहीत होते असें अनुमान निघतें. परंतु तोच समास दुसर्या रीतीनें सोडविल्यास पान आणि स्कंध यांजमधील पानाच्या वरच्या बाजूस कोन ही 'डोळा' उत्पन्न होण्याची जागा असते हें त्यास ठाऊक होतें असें अनुमान निघतें.
फुलांचे सामान्यत: चार भाग असतात; ते पाकळ्या पाकळ्यांच्या बाहेरच्या बाजूस फुलांचे डेंख, पाकळ्यांच्या आंतील बाजूस पुंकेसर, आणि पुंकेसरांच्या आंत फुलाच्या मध्यभागी स्त्रीकेसर. आतां प्राचीन वाङ्मयाचें परीक्षण केलें असतां या चारी भागांचा जरी त्यांत उल्लेख केलेला आढळतो तरी ही गोष्ट तेव्हांच दिसून येते कीं, हे फुलांचे चार भाग कोणत्या कारणानें फुलामध्यें असतात हें कोणासहि ठाऊक नव्हतें; इतकेंच नव्हे तर हे भाग पुष्पत्वाचें लक्षण असून प्रत्येक फुलांत त्यांच्या अस्तित्वाची अपेक्षा करण्यास हरकत नाहीं असें सुद्धां कोणास वाटत असल्याचें दिसून येत नाहीं. मग या भागांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयांत आढळून येतो तें कसें? असा प्रश्न साहजिकच उद्भवतो. आतां या प्रश्नाचें उत्तर असें आहे कीं, वर सांगितलेल्या फुलाच्या चार भागापैकीं, एक किंवा अधिक भाग कांहीं फुलांत ठळक असून त्यांचें अस्तित्व तसें फूल पहाणार्याच्या ध्यानांत न येणें अपरिहार्य असतें; किंवा हीच गोष्ट कांहीं फुलें फार मोठीं असल्यामुळें घडून येतें. अर्थातच यामुळें तशा विशिष्ट प्रकारच्या किंवा फार मोठया फुलांतील हे भाग दृष्टोत्पत्तीस येऊन व एकदां एकाच्या दृष्टोत्पत्तीस आल्यानंतर त्याजपासून ते दुसर्यास ठाऊक होऊन वाङ्मयांत वेळोवेळी त्यांचा उल्लेख झाला आहे. वरील म्हणण्याच्या पुष्टयर्थ कमळाचें आणि कदंबाचें अशीं दोन फुलें घेऊन त्यांतील भागांचा उल्लेख वांरवार वाङ्मयांत कां आढळून येतो तें पाहूं. आतां कदंबाच्या फुलांत (पुं) केसर इतके विपुल व दाट असतात कीं, त्यांच्यामुळें तें फूल पहाणार्याचें त्या फुलाच्या इतर भागाकडें दुर्लंक्ष होऊन त्यांतील ठळक केसर तेवढे मनावर बिंबतात; आणि असा प्रकार झाल्यामुळेंच कदंबाचे केसर दृष्टोत्पत्तीस येऊन वाङ्मयांत त्यांचा उल्लेख होण्यास आरंभ झाला असला पाहिजे. कदंबाच्या केसरांचा श्रीमहाभारतांत एके ठिकाणीं उल्लेख पुढीलप्रमाणें आहे:- 'कदंबाच्या फुलावर केसर असतात त्याप्रमाणें त्या लोखंडी अशनीवर सारखे शूल लाविले होते'. कमळाच्या फुलाविषयीं पाहिलें असतांहि कमळाचें फूल फार मोठें असल्यामुळेंच त्यांतील भाग पृथक् पृथक् ओळखिले गेले असले पाहिजेत हें उघड आहे. कमळाला ‘सहस्त्रदल’ असा एक शब्द आहे. यानें कमळांत पाकळ्यांची संख्या फार मोठी असते हें दर्शविलें जाते. कमलाचे केसर प्राचीन काव्यग्रंथांतून अनेक ठिकाणीं उल्लेखिलेले असून त्यांचा रंग पिवळा असल्यामुळें त्यांनां कांचन असाहि एक पर्याय शब्द आहे. आतां कमलांतील 'स्त्रीकेसर' किंवा स्त्रीइंद्रिय याचा उल्लेख प्राचीन वाङ्मयांत कमलकोश या शब्दानें केलेला असून या शब्दाचा अर्थ कमलाचें वीज धारण करणारी पेटी असा आहे.
फुलांतील डेंख, पाकळ्या, पुंकेंसर व स्त्रीकेसर या चार भागांपैकीं पुकेसरांत 'पराग' नांवानें संबोधिली जाणारी कणमय पूड असते व स्त्रीकेसर किंवा स्त्री इंद्रियाच्या खालच्या भागांत (हा भाग कांहीं फुलांत, उदाहरणार्थ कमळांत, फुलांच्या देंठांत रूतलेला असतो) लहान लहान भावी बीजें किंवा अंडीं असतात. आतां प्राचीन वाङ्मयांत जरी स्त्रीकेसर किंवा स्त्री-इंद्रिय आणि त्यांतील भावी बीजें म्हणजे अंडी यांच्याविषयीं अगदीं क्वचित उल्लेख आढळून येतो तरी पुष्पपराग किंवा पुष्पधूली ही केसरापासून उत्पन्न होते हें सर्व सामान्य ज्ञान होतें, यामुळें पुष्कळ जातींच्या फुंलांच्या परागाचा काव्यांतून वगैरे विपुल उल्लेख झालेला आढळतो. पुष्पपरागाप्रमाणेंच फुलांतील मध आणि त्यावर आसक्त असणारा भ्रमर यांचाहि प्राचीन काव्यांतून बराच उल्लेख असून मध आणि भ्रमर हा एक हल्लींप्रमाणेंच पूर्वी कवींचा अत्यंत आवडता विषय होता. भ्रमर आणि मध यांविषयीं प्राचीन वाङ्मयावरून विशेष गोष्ट आढळून येते ती अशी कीं, प्राचीन निरीक्षकांनां भ्रमर आणि फुलांतील मध यांविषयीं सामान्य माहिती होती एवढेंच नव्हे तर भ्रमरांच्या पुष्कळ जाती असतात व विशिष्ट जातीचा भ्रमर विशिष्ट फुलावरच आसक्त असतों हेंहि त्यांना ठाऊक झालें होतें. आतां फुलांत जो मध सांठतो तो सर्वच जातींच्या जरी नाहीं तरी पुष्कळ जातींच्या फुलांत लहान लहान पिंड असतात त्यांच्यापासून उत्पन्न होतो. परंतु फुलांतील अशा प्रकारच्या पिंडाविषयीं प्राचीन निरीक्षकांस विशेष माहिती असल्याचें दिसून येत नाहीं.
फळ आणि बीज यांचा परस्पर संबंध म्हणजे फळ हें वनस्पतींचें बीज धारण करणारें अंग आहे ही गोष्ट प्राचीन हिंदूस चांगल्या प्रकारें ठाऊक असून फळांचे व बीजांचे निरनिराळे प्रकार व साल, मगज, गर, टरफल, आणि दलें इत्यादि घटकभाग यांच्याविषयींहि त्यांनां चांगली माहिती होती. त्याचप्रमाणें त्यांच्याकडून द्विदल वनस्पती इतर वनस्पतीपासून वेगळ्या ओळखिल्या असून ज्या द्विदल वनस्पतींच्या बीजांतील दलें पुष्ट असून सहज वेगवेगळी करतां येतात त्यांनां 'वैदल वनस्पती' असें विशिष्ट नांव दिलें गेलें होतें. आतां एकदल वनस्पतीपासून द्विदल वनस्पती भिन्न आहेत जें जरी आमच्या प्राचीनांनां ठाऊक होतें, तरी एकदल वनस्पतींच्या बीजांत एकच दल असतें हें त्यांनां ठाऊक नव्हतें. बीविषयीं त्यांनां विशेष गोष्ट ठाऊक होती ती अशी कीं, बीजांत अंकूर असून त्या अंकुरांत सूक्ष्म स्कंध व सूक्ष्म पर्णे असल्यामुळें अंकूर हा भावी वृक्षाचें सूक्ष्मरूपच होय. वर केलेल्या प्राचीनांच्या पुष्पफलबीजविषयक ज्ञानाच्या पुष्टयर्थ प्राचीन ग्रंथांतील कांही उतारे येथें देऊन मग त्यांचें वनस्पतिजीवक्रियाविषयक ज्ञान काय होतें याविषयीं विचार करूं. 'कमलाच्या फुलांतील एका लहानशा छिद्रांत ज्याप्रमाणें पुढें होणार्या वेलीचें बीज असते' (बृहद्योगवासिष्टसार; आचार्यभक्त, विष्णुशास्त्री बापट यांचें भाषांतर); बीजांत असणार्या अंकुराप्रमाणें (कित्ता); 'ज्याप्रमाणें भ्रमर पुष्पांतील सार काढून घेतात त्याप्रमाणें माझ्या बोलण्यांतील मुख्य गोष्टीचा विचार कर' (श्रीमद्भागवत); 'द्विदल धान्याच्या एका दलाचें वर्णन केलें असतां तें दुसर्यास जसें लांगू पडतें तसेंच मी जें भूगोलाचें वर्णन केले तेंच स्वर्गास लागू आहे (श्रीमद्भागवत); 'अंकुर नाहींसा झाला तर पल्लवादिकांचा उद्भव होऊं शकत नाहीं. पण शाखा, पल्लव इत्यादिचा नाश झाला असतां अंकुरापासून पुनरपि त्यांचा उद्भव होऊं शकतो.' (बृहद्योगवासिष्टसार, बापटशांस्त्र्याचें भाषांतर); 'अध:, उर्ध्व इत्यादि कल्पना सापेक्ष आहेत; म्हणजे फुलाच्या अपेक्षेनें देंठ खाली असतें व देंठाच्या अपेक्षेनें फूल वर असतें' (कित्ता); 'त्याच्या कमरेसभोंवतीं कमलकेसराप्रमाणें लकलकीत असे दोन पीताबंर आहेत (श्रीमद्भागवत); 'या प्रपंचास आदिवृक्ष म्हणण्यांस प्रत्यवाय नाहीं; याचीं सुखदु:ख दोन बीजदलें' (कित्ता).
जीवक्रियाविज्ञान जीवक्रियाविज्ञान हा विषय व्यापक असून वनस्पतिशास्त्रांतील जीवक्रियाविज्ञानामध्यें वनस्पतीच्या सर्व सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या क्रियांविषयीं किंवा व्यापारांविषयीं विचार करतात. प्रत्येक जीवाचें अंतिम ध्येय ('मरणं प्रकृति: शरीरिणां' हा ठरलेलाच सिद्धांत असल्यामुळें) आपल्यासारखे जीव उत्पन्न करणें किंवा पुनरूत्पत्ति हें आहे; कारण पुनरूत्पत्तीमुळें तो जीवच जणूं पुन्हां निर्माण झाल्यासारखें होऊन मृत्यूचें कार्य विफल होतें. जीवाचें अंतिम ध्येय पुनरूत्पत्ति होय असें ठरल्यानंतर सर्व प्रकारचीं इंद्रियें जीवाचा जीवनक्रम चालविण्यासाठीं आणि त्याची पुनरूपत्ति घडवून आणण्यासाठी असतात हें ध्यानांत येण्यास हरकत नाहीं. म्हणजे जीवक्रियाविज्ञानाचें वनस्पतींचा जीवनक्रम आणि वनस्पतींची पुनरूत्पत्ति असे दोन भाग पडतात; यांपैकी वनस्पतींच्या पुनरूत्पत्तीविषयीं प्राचीन हिंदूस काय माहिती होती हें पाहून नंतर त्यांच्या वनस्पतिजीवनक्रम विषयक ज्ञानाचा विचार करूं. शेतकी आणि बागबागाईतांत फार प्राचीन काळींच हिंदूनीं प्राविण्य संपादन केलें असल्यामुळें कंद, गड्डे, डोळे असलेलीं पेरें किंवा प्रकांडें इत्यादींपासून वनस्पतींची पुनरूत्पत्ति होते हें त्यांनां ठाऊक झालें होते; एवढेंच नव्हे तर शारीरविज्ञान या प्रकरणांत दिलेल्या बृहद्योगवासिष्टसार यांतील 'अंकूर नाहींसा झाला तर इत्यादि' उतार्या वरून कंद, गड्डे वगैरेंपासून कां पुनरूत्पत्ति होते याविषयींची त्यांस उपपत्तिहि ठाऊक असल्याचें दिसून येतें. त्याचप्रमाणें त्यांनां फुलां-(नंतर) पासून फळ बनतें ('उदेति पूर्वं कुसुमं ततः फलं') हेंहि ठाऊक होतें; म्हणजे वनस्पतींच्या पुनरूत्पत्तींचें मुख्य साधन जें बीज तें बनण्याशीं फुलाचा संबंध असतो हें ठाऊक होतें; याखेरीज त्यांनीं परागाचा वृक्षांच्या सफलतेवर अनुकूल परिणाम होतो हेंहि ताडिलें होतें. परंतु वनस्पतींत प्राण्याप्रमाणेंच लिंगभेंद असतो; फुलांतील केसर व पराग हीं अनुक्रमें पुरूषइंद्रिय व पुरूषबीज होत व फुलाच्या मध्यभागीं असणारीं कांहींशीं केसरासारखीं दिसणारीं इंद्रियें व त्यांच्या खालच्या भागांत असणारीं लहान लहान अंडीं हीं अनुक्रमें स्त्री-इंद्रिय व स्त्रीबीज होत इत्यादि गोष्टी त्यांनां ठाऊक नव्त्या. अशा महत्त्वाच्या गोष्टींविषयीं त्यांचें अज्ञान असल्यावर, भ्रमर पुष्पावर लुब्ध कां असतात, फुलांत मद्य उत्पन्न कां होतो, सुंदर, कोमल आणि सुवासिक पाकळ्यांचा फुलाला उपयोग काय? इत्यादींतील मर्म त्यांनां कळलें असल्याबद्दलची अपेक्षा करणें केवळ व्यर्थ असून, मध हा भ्रमरांचें अमृततुल्य पेय असून फुलें हीं सर्वस्वी भ्रमरांच्या सुखासाठीं आहेत अशी जी त्यांची कल्पना होती तिजबद्दल आश्चर्य वाटण्याचें कांहींहि कारण नाहीं.
वर सांगितल्याप्रमाणें जरी फुलांतील भागांच्या किंवा इंद्रियांच्या क्रियांविषयीं आमच्या प्राचीनांचे अज्ञान होतेंअसें आढळून येतें तरी त्यांनी निरनिराळ्या जातींच्या फुलांच्या (कळ्यांच्या) उमलण्याचा वेळा, निरनिराळ्या वृक्षांचे रंग, फुलें येण्याचे काळ व त्याचप्रमाणें फुलांचे रंग, गंध वगैरे गोष्टीविषयीं काळजीपूर्वक व मार्मिक निरीक्षण करून उपयुक्त व कुतूहलजनक माहिती करून घेतली होती ही गोष्ट कविकुलगुरू कालिदासाच्या ऋतुसंहारासारख्या काव्यग्रंथाच्या वर वर परिशीलनानें सुद्धां सहज ध्यानांत येण्याजोगी असल्यामुळें तिजबद्दल येथें विवेचन करण्याचें कारण नाहीं.
वर्गीकरण या प्रकरणांत 'एकवर्षायु वनस्पती' म्हणजे काय याचा पुरा अर्थ आमच्या प्राचीनांस ठाऊक असल्याचें सांगितलेंच आहे. आतां 'एकवर्षायु वनस्पती' म्हणजे ज्या वनस्पतींनां एकदांच फुले येऊन बीं धरून मरतात त्या होत; मग हा पुष्पकाल त्या वनस्पतींच्या आयुष्यांत तीन महिन्यांनीं येवो, सहा महिन्यांनीं येवो, एक वर्षानंतर येवो अथवा अनेक वर्षांनंतर येवो. कांहीं जातीचे बांबू, वेत व ज्या केतकींचा वाख काढितात त्या जातीच्या कांहीं केतकी केतकी (केवडा नव्हे) इत्यादि वनस्पतींचे सोट अनेक वर्षे वाढतात व ही वाढ चालू असतांना त्यांच्या सोटांत आणि पानांत पोषक दंव्यांचा विपुल संचय होतो; परंतु त्यांच्या सोटांचीं कांहीं वर्षे वाढ झाल्यानंतर त्यांस फुलांचा प्रचंड बहर येतो; हा इतका प्रचंड असतो कीं, त्या वनस्पतींच्या सोटांत व पानांत सांचलेलीं पोषक द्रव्यें तो बनण्यांत फस्त होतात इतकेंच नव्हे तर त्यायोगानें त्या वनस्पतींची शक्ति खचून ते मरतात. अशा प्रकारामुळें एकदम बहर येऊन वेळूंचीं बेटेच्या बेटें मरतात.
आमच्या प्राचीनांनां वरील वनस्पतिपुनरूत्पत्तिविषयक वस्तुस्थितीची माहिती होती असें महाभारतांतील एका दृष्टांतावरून दिसून येतें. हा दृष्टांत त्यांतील शास्त्रीय ज्ञानामुळें व औचित्यामुळें इतका महत्त्वाचा व सुंदर आहे कीं, तो येथें अर्वतीर्णांत देण्यापासून परावृत्त होणें अशक्य आहे. 'आपलें सारें बेटच्या बेट नाश करून टाकणारें बीज वेळू जसें धारण करतो, तसेंच या धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन राजानें महा भयंकर वैर उत्पन्न करणार्या द्यूताचा अंगिकार केला आहे' (सभापर्व-विदुरकृत दुर्योधननिर्भत्सना).
वनस्पतींच्या जीवनक्रमांत अन्नग्रहण व अन्नपचन या क्रिया प्रमुख आहेत कारण या दोन गोष्टींवर वनस्पतींच्या इतर सर्व क्रिया इतकेंच नव्हे तर त्यांचे जगणेंहि अवलंबून आहे. अन्नग्रहण व अन्नपचन या दोन क्रियांनां मिळून पोषण असें म्हणतात. आतां वनस्पतींच्या पोषणांविषयीं शेतकी व बागबागाईतांतील अनुभवामुळें मुळांचा उपयोग वनस्पतीनां भूमीवर स्थिर राहण्याच्या कामीं व जमिनींतील अन्नरस पिण्याच्या किंवा शोषण्याच्या कामीं होतो. स्कंधाचा किंवा दंडाचा उपयोग शाखा, उपशाखा, आणि पल्लव धारण करण्याकडे होतो. शेण, कुजट माती, विष्टा व राख या खतांचा वनस्पतींच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. परंतु मासळीसारख्या खतांचा वनस्पतींच्या सफलतेवर चांगला परिणाम होतो इत्यादि सामान्य गोष्टींविषयीं इतर प्राचीनांप्रमाणेंच आमच्याहि प्राचीनांस माहिती झाली असून वनस्पतींच्या सफलतेवर परिणाम होणार्या मांसळीसारख्या खतास त्यांनीं 'दोहद' असें विशिष्ट नांव दिलें होतें. याखेरीज वनस्पतींच्या आरोग्याकडे त्यांचें लक्ष जाऊन 'वृक्षायुर्वेद' निर्माण होऊन वुक्षायुर्वेदावर ग्रंथरचनाहि झाली होती. परंतु वनस्पतींच्या पोषणक्रियेविषयीं सविस्तर तर नाहींच परंतु अल्पसुद्धां बरोबर कल्पना त्यांनां नव्हती. कारण वनस्पती मुळांनीं जमिनींतील पाणी (क्षारमिश्रित) शोषतात व पानांनीं हवेंतील कार्बानिक ऍसिड वायु शोषतात; भूमींतून शोषिलेल्या जलाचा व कार्बानिक ऍसिड वायूचा पानांत संयोग होऊन त्यांच्या संयोगापासून निरनिराळ्या रासायनिक क्रिया घडून येऊन वनस्पतींनां लागणारीं पोषकद्रव्यें तयार होतात. म्हणजे वनस्पतींत मुळ्या व पानें हीं अन्नग्रहणाचीं इंद्रियें असून पानें हीं पचनेंद्रियें किंवा आहार-इंद्रियें होत; आतां मुळ्या या अन्नग्रहणाचें एक इंद्रिय होत असें जरी आमच्या प्राचीनांस ठाऊक होतें तरी पानांचा वनस्पतींनां काय उपयोग होतो याविषयीं त्यांनीं कांहीहि कोठेहि सांगितलेलें नसून त्यासंबंधात अत्यंत मुग्धव्रत स्वीकारलेलें दिसतें. तथापि यापूर्वी वर्गीकरण प्रकरणांत दिलेल्या श्रीमद्भगवतांतील 'वनस्पतींची गती आणि आहार ऊर्ध्व असतात' या उतार्यांतील व 'ऊर्ध्व रेतस्' म्हणजे वनस्पती या शब्दांतील कल्पना वर दिलेल्या वनस्पतींच्या पोषणक्रियेच्या आधुनिक उपपत्तीशीं कांहींशा जुळतात असें वाटतें. [ ले. व्ही. के गोखले.]