विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वैष्णव संप्रदाय:- हिंदुस्थानांतीन एक प्रसिध्द हिंदु धर्मसंप्रदाय. विष्णु देवतेला निरनिराळ्या स्वरूपांत भजणारा हा संप्रदाय असल्यानें याला वैष्णव संप्रदाय असें नांव मिळालें आहे. याच्याच जोडीचा व तोडीचा दुसरा धर्मसंप्रदाय म्हणजे शैवसंप्रदाय होय. हिंदुधर्मीयांत हेच दोन मोठे धर्मपंथ असून बहुतेक सर्व हिंदु या दोहोंत मोडतात. वैष्णव संप्रदायाला वैष्णव हें नांव केव्हां मिळालें हें नक्की समजत नाहीं. तथापि विष्णु देवतेला ज्या वेळीं प्राधान्य मिळालें तेव्हांपासून विष्णुदेवतेच्या उपासकांना वैष्णव हें नांव मिळालें असलें पाहिजे हें उघड दिसतें. ऋग्वेदकाळीं विष्णु ही श्रेष्ठ देवता मानण्यांत येत नव्हती. ('विष्णु' पहा.) ब्राहमणकाळीं विष्णु देवतेला प्राधान्य येत चाललें. पुढें महाभारतकालीं व पुराणकाळीं विष्णु म्हणजेच परब्रह्म असें मानण्यांत येऊ लागलें.
वैष्णव संप्रदायाला वैष्णव हें नांव जरी उशीरानें पडलें तरी या संप्रदायाचीं जीं मुख्य तत्त्वें तीं पूर्वीच निराळ्या नांवाखालीं अस्तित्वांत होतीं. वैष्णवसंप्रदाय हा मूळ भक्तिप्रधान एकेश्वरी धर्म होय. हा एकेश्वरी धर्म वैष्णवसंप्रदायामध्यें मिसळण्यापूर्वी बराच काळ निराळ्या नांवानें प्रचलित होता. उपनिशदुत्तरकाळीं धर्मसुधारणेची मोठी चळवळ उत्पन्न झाली; त्या चळवळींतून बौध्द अगर जैनधर्माप्रमाणेंच हा एकान्तिक धर्म उदयास आला. हा एकान्तिक धर्म ईश्वराचें अस्तित्व मानणारा होता. या धर्माच्या बुडाशी वासुदेव कृष्णानें सांगितलेली भगवद्गीता ही होती. कालांतरानें या धर्माला सांप्रदायिक स्वरूप प्राप्त होऊन हो धर्म पांचरात्र अगर भागवत या नांवांचें संबोधण्यांत येऊ लागला. सात्वत नामक क्षत्रिय कुळांतील लोक या धर्माचे अनुयायी होते व तसा मेग्यास्थेनीजनें आपल्या ग्रंथांत उल्लेखहि केलेला आहे. या एकान्तिक उर्फ भागवत धर्मांत वासुदेवाची भक्ति हें मुख्य तत्त्व होतें. या वासुदेवभक्तीच्या संप्रदायापूर्वी नारायणीय धर्म हा प्रचारांत होता (या नारायणीयधर्मविकासाची सविस्तर माहिती ' बुध्दोत्तर जग' प्र. ६ मध्यें दिलेली आढळेल) व या दोन्ही संप्रदायांचें कांहीं कालानंतर एकीकरण झालेलें आढळतें. पुढें विष्णु हा परब्रह्म मानण्यांत येऊ लागल्यानंतर नारायणधर्म, वासुदेवभक्ति संप्रदाय व विष्णुभक्तिसंप्रदाय या तिन्ही पंथांचें एकीकरण होऊन त्याचा वैष्णवसंप्रदाय बनला. तात्पर्य वैष्णवसंप्रदायांत नारायणीय धर्मांतील तत्त्वज्ञान, वासुदेवभक्ति व विष्णुची परब्रह्म या नात्यानें उपासना यांचा अंतर्भाव होऊ लागला. ख्रि. पू. पहिल्या शतकांत या वैष्णवधर्मांत आणखी एका गोष्टीची भर पडली. अभीर नांवाच्या जातीनें बालकृष्णाच्या लीला व गोपींशी होणारे त्याचे विलास या दोन गोष्टींची या धर्मांत भर टाकली. अशा रीतीनें हा चतुरंगी वैष्णवधर्म इ.स. ८ व्या शतकापर्यंत हिंदुस्थानामध्यें हळू हळू फैलावत होता. पण त्यानंतर श्रीमच्छकराचार्यांनीं, आपल्या अद्वैत मताचा प्रसार हिंदुस्थानांत केल्यानें या वैष्णव धर्माला धक्का बसला. शंकराचार्यांनीं स्थापित केलेल्या अद्वैतमतांस भक्तीला स्थान नव्हतें. त्यामुळें वैष्णवधर्माला अद्वैतमतापुढें माघार घ्यावी लागली. अशी स्थिति सुमारें २।३ शतकें चालली पण पुढें रामानुजाचार्यानीं वैष्णव धर्माचें पुनरूज्जीवन करण्यास सुरवात केली. रामानुजाचार्यांनीं वैष्णवधर्मांतील पांचरात्र अगर भागवत मताच्या तत्त्वज्ञानावरच आपला भर ठेवला होता. त्याच सुमारास उत्तर हिंदुस्थानांत निंबार्कानेंहि वैष्णव संप्रदायाच्या पुनरूध्दारार्थ कसून प्रयत्न केले. पण निंबार्कानें वैष्णव धर्माचें पुनरूज्जीवन करतांना वैष्णव धर्मांतील राधाकृष्णविलासविषयक अंगावरच भर दिला. अद्वैतमताचा पाडाव करून भक्तिमार्गाची पूर्णपणें स्थापना करण्याची कामगिरी मध्वाचार्यांनीं बजाविली. विष्णुचें नांव प्रामुख्यानें पुढें आणण्याचें श्रेय मध्वाचार्यानांच दिलें पाहिजे. इकडे उत्तर हिंदुस्थानांत रामानंदांनीं विष्णु अगर कृष्ण यांच्या बदलीं रामाचें नांव घालून रामभक्तीचा संप्रदाय प्रसूत केला, व अशा रीतीनें वैष्णवधर्माला एक नवीनच वळण दिलें. वस्तुत: रामानंदानीं आपल्या संप्रदायाचीं मतें रामनुज संप्रदायाच्या मताचा थोडा फेरबदल करून घेतलीं होतीं. रामानुजांनीं नारायणभक्तीवर मुख्य भर दिला तर रामानंदांनीं रामभक्तीवर भर दिला. पण त्यांनीं आपल्या तत्त्वांची शिकवण देशी भाषेतून देण्यास सुरवात केल्यामुळें भक्तिमार्गाचीं तत्त्वें जनतेला सुलभ समजण्याला मदत झाली. रामानंदांच्या मागून कबीरानेंहि या एकेश्वरी भक्तीचाच उपदेश सर्वांना केला. १६ व्या शतकांत वल्लभाचार्यांनीं बालकृष्ण व राधा यांच्या उपासनेचा संप्रदाय सुरू केला व त्याच वेळीं बंगाल्यांत चैतन्यानें राधाकृष्णभक्तीचा मार्ग प्रचारांत आणला. वल्लभाच्या संप्रदायांत शृंगारिक गोष्टींचा अतिरेक होऊ लागला. वल्लभ (पहा) व त्याचे अनुयायी यांच्या भक्तींत नाटकीपणाचाच अधिक अंश असे तर चैतन्यसंप्रदायामध्यें वल्लभसंप्रदायापेक्षां अधिक पावित्र्य असे. तथापि राधाकृष्णभक्तीचें अंग वैष्णवधर्मांत शिरल्यामुळें वैष्णवधर्म जरी लोकप्रिय झाला तथापि तेंच तत्त्व पुढें त्याच्या अपकर्षाला कारणीभूत झालें. अशा रीतीनें उत्तर व दक्षिण हिंदुस्थानांत वैष्णव धर्माची प्रगति होत असतां महाराष्ट्रांत वैष्णवधर्माची ध्वजा रोंवण्यास नामदेवानें सुरवात केली. व तुकारामानें तो धर्म लोकप्रिय करून टाकिला. पण वैष्णवधर्माचें बीं महाराष्ट्रांत पेरतांना नामदेवांने बंगाल्यांत अगर उत्तर हिंदुस्थानांत ज्या वैष्णवधर्माच्या शृंगारिक अंगावर भर देण्यांत येत होता तें अंग टाकून वैष्णवधर्माच्या अधिक शुध्द व सात्विक अंगावर भर दिला. विठ्ठलोपासनेच्या नांवाखालीं महाराष्ट्रांत वैष्णवधर्माचा प्रसार झाला; व या धर्माचीं तत्त्वें समजून देण्यासाठीं महाराष्ट्रीय साधुसंतांनीं प्राकृताचा अवलंब केला. चित्तशुध्दि करून परमेश्वराची एकांतिक भक्ति करण्यानें नि:श्रेयस प्राप्ति होते अशा प्रकारची शिकवण या महाराष्ट्रसंतांनीं जनतेस दिली. अशा रीतीनें ख्रिस्तपूर्व ५ व्या शतकापासून तों ख्रिस्तीशकाच्या १७ व्या शतकापर्यंत वैष्णवधर्माचें स्वरूप दृष्टीस पडतें. या काळांत वैष्णवधर्मामध्यें अनेक पोटसंप्रदाय निर्माण झालें. तथापि या पोटसंप्रदायांची आध्यात्मिक शिकवण भगवदगीतेच्या आधारेंच देण्यांत येत असे. अद्वैत व मायावाद या शंकराचार्यांच्या तत्त्वाला या सर्व पोटसंप्रदायांनीं सारखाच विरोध केला. तथापि या पोटसंप्रदायांमध्यें भिन्नत्वदर्शक स्थळेंहि बरींच आहेत. प्रत्येक पोटसंप्रदायानें वैष्णवधर्मांतील चार प्रमुख अंगांपैकीं कोणत्या तरी अंगावर प्रामुख्याने भर दिलेला आढळतो. प्रत्येकाचा आचारधर्म निराळा असून अध्यात्मिक सिध्दांतहि थोडे फार भिन्न आढळतात.
वैष्णवसंप्रदायाचे मुख्य लक्षण एकांतिक भक्ति हें आहे. परमेश्वराचें कोणत्या तरी विष्णुच्या स्वरूपांत भजन करून तद्द्वारां मुक्ति मिळविणें हें या धर्माचें आद्य तत्त्व होय. वैष्णवधर्माच्या इतिहासांत अवतारकल्पनेवर बराच भर दिलेला दृष्टीस पडतो. ही अवताराची कल्पना वैष्णवधर्मानेंच काढली अगर वैष्णवधर्माच्या पूर्वी ती अस्तित्वांत होती यांविषयीं नक्की सांगतां येत नाहीं. तथापि ही अवतारकल्पना बौध्दधर्मापासून वैष्णवधर्मानें घेतली असें म्हणण्याला जागा आहे. निरनिराळ्या जातींचा आपल्या संप्रदायांत प्रवेश करून घेतांना त्या जातीच्या देवतांचाहि आपल्या धर्मांत समावेश करून घेणें वैष्णवधर्माच्या नेत्यांनां भाग पडलें असावें व त्यासाठीं त्या जातिदेवता या विष्णुचाच अवतार होत असें मानण्यांत येऊ लागलें. प्रत्यक्ष बुध्द हाहि विष्णुचाच अवतार म्हणून मानण्यांत आला. विष्णुचे अवतार कोणी सहा मानतात तर कोणी दहाक बारा मानतात. नारायणी आख्यानांत विष्णुचे सहा अवतार मानले आहेत तर वायुपुराणांत विष्णुचे अवतार बारा सांगितलें आहेत. तथापि राम व कृष्ण यांचेंच महत्त्व अतिशय मानण्यांत आलें आहे. मथुरा, वृंदावन, गोकुल, द्वारका, नाथद्वार इत्यादि ठिकाणीं कृष्णभक्तीचें माहात्म्य आढळतें तर अयोध्या, चित्रकूट व नाशिक येथें रामाचें माहात्म्य फार आहे. पंढरपूर येथें विष्णु हा विठोबाच्या रूपानें भजण्यांत येतो तर तिरूपति व कांजीवरम् येथें विष्णुच्या इतर स्वरूपांचें माहात्म्य आढळतें.
पोटभेद:- वैष्णवसंप्रदायाचे पोटभेद बरेच आहेत व त्यांपैकीं प्रमुख पोटसंप्रदायांचा वर उल्लेख आलेलाच आहे. ते म्हणजे भागवत, मराठी भक्तिसंप्रदाय, मध्व, रामानुज, निंबार्क, चैतन्य, वल्लभ, राधावल्लभ, पांचरात्र, रामानंद व कबीर संप्रदाय हे होत. याशिवाय विष्णुस्वामी, हरिदासी, स्वामीनारायण, मानभाव, नरसिंह, शीखपंथ, दादूपंथ, लालदासी, सतनामी, रामानंदी, चरणदासी, इत्यादि पंथ वैष्णवसंप्रदायांतच मोडतात. या सर्व संप्रदायांची व पोटसंप्रदायांची माहिती त्या त्या नांवाखालीं स्वतंत्र लेखांत दिली गेली आहेच. वर सांगितलेल्या पोटसंप्रदायांचेहि पोटभेद पडलेले दृष्टीस पडतात. दक्षिण हिंदुस्थानांमध्यें वैष्णवांचे श्रीवैष्णव व वीरवैष्णव असे दोन पोटभेद दृष्टीस पडतात. याशिवाय स्मार्तवैष्णव असाहि एक पोटभेद आहे. दक्षिण हिंदुस्थानांत वैष्णवसंप्रदायाचीं तत्त्वें जनतेंत प्रसूत करण्याचें कार्य तामिळ साधूसंतांनीं केलें या साधूंनीं आळवार (पहा) अशी संज्ञा आहे. [भांडारकर - वैष्णविझम शैविझम, ऍंड दि रिलिजस लिटरेचर ऑफ इंडिया; सर्वदर्शन संग्रह; भागवत; लो. टिळक-गीतारहस्य; विल्सन-सेक्टस इन इंडिया.]