विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
सखाराम बापू- पेशवाईंतील एक प्रसिद्ध मुत्सद्दी. याचें पूर्ण नांव सखाराम भगवंत बोकील. हा हिंवर्याचा कुलकर्णी होता. याचा पूर्वज पणतोजी गोपीनाथ यास शिवाजीकडून हिंबरें गांव इनाम मिळालेला होता (१६५९).सखारामबाबू आरंभीं महादाजीपंत पुरंदरे यांच्या पदरीं कारकून होता. इसवी सन १७४६ सालीं बाळाजी बाजीराव पेशव्यानें याला सदाशिवरावभाऊच्या बरोबर देऊन, कर्नाटकच्या स्वारींत पाठविलें. इसवीसन १७५४ त सखारामबापू राघोबादाद बरोबर गुजराथच्या स्वारींत गेला होता. पुढें दोन वर्षांनीं बापूची राघोबादादाच्या दिवाणगिरीच्या जागेवर योजना करुन, पेशव्यांनीं त्याला आपल्या बंधूबरोबर उत्तर हिंदुस्थानांत पाठविलें. थोरल्या माधवरावाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीस राघोबादादा राज्यकारभार पाहत असतांनां, जेव्हां माधवरावानें राज्यकशट चालविण्याच्या कामांत भाग घेण्याचा आग्रह धरला, तेव्हां सखारामबापूनें कारभार्याच्या जागेचा राजीनामा दिला. मोंगलांच्या मदतीनें पुतण्याच्या फौजेचा मोड करुन पुण्यास आल्यावर, राघोबानें सखारामबापूस आपला कारभारी करुन त्यास ९ लाखांची जहागीर दिली (१७६२).
इसवीसन १७६४ त सखारामबापूनें आग्रह धरून हैदरअल्लीवरील पहिल्या स्वारीचें आधिपत्य राघोबादादाकडून माधवराव पेशव्यासच देवविलें. या स्वारींत पेशव्यांनीं सखारामबापूस आपल्याबरोबर घेतलें होतें, व ते युद्धच्या हालचालीसंबंधांत याचाच सलज घेऊन त्याप्रमाणे चालत होते.
सखारामबाबूचें वजन व लांच घेण्याची त्यास जडलेली खोड या दोन गोष्टींमुळें माधवराव पेशव्यास आपल्या मनाप्रमाणें राज्य करण्यास पदोपदीं हरकत येऊं लागली. व म्हणून इसवीसन १७६८ मध्यें राघोबास अटकेंत ठेवल्यावर त्यांनीं बापूस कारभार्याच्या जागेवरून दूर केलें. परंतु त्याची जहागीर मात्र पूर्ववत त्याजकडेच चालू ठेवली. पण आपल्या मरणापूर्वी पेशव्यांनीं सखारामबाबूस पु्हां कारभार्याच्या जागीं नेमून त्याच्या समक्ष राघोबास आपल्या भावाचा सांभाळ करण्यास सांगितलें (१७७२). नारायणरावाच्या कारकीर्दीत सर्व राज्यकारभार हाच पाहूं लागला. सखाराम बापू राघोबाबरोबर निजामावरील स्वारींत गेला होता, परंतु कांहीं तरी निमित्तानें हा स्वारींतून निघाला व बारभाईच्या कारस्थानांत सामील झाला (१७७४). याचें दरबारांतील वजन जाणून नानाफडणिसानें राज्यकारभाराचा मुख्य अधिकारी याजकडेच सोंपविला होता (१७७४).
नारायणराव पेशव्याचा खून करविण्यांत याचें अंगें नव्हतें तरी नारायणास गारद्यांकडून कैद करविण्याचें जें राघोबानें कारस्थान रचिलें त्यांत हा सामील होताच. गंगाबाईच्या मृत्यूनंतर याला नानाफडणिसाविषयीं मत्सर वाटूं लागला, व म्हणून, राघोबाला घेऊन येण्याविषयीं जी विनंति मोरोबादादानें इंग्रजांस केली होती तिला आंतून याची संमति होती. सन १७७८ त इंग्रजांशीं युद्ध सुरु होण्याचा जेव्हां रंग दिसूं लागला, तेव्हां याच्याकडून आपल्या मसलतींत अडथळा होऊं नये म्हणून, नानाफडणिसानें, उतारवय झालें असल्याच्या सबबीवर यास अगोदर घरीं बसावयास लाविलें होतें, तथापि नाना व महादजी मधून मधून याच्या घरीं जाऊन यास मोठेपणा देऊन राजकारणांत याची सल्ला मसलत विचारीत होते. परंतु पुढें इंग्रजांचें सैन्य पुण्यावर चालून येऊं लागलें तेव्हां, पुरंदरच्या तहावर ज्या कारभार्यांनीं सह्या केल्या होत्या त्यांत हाच मुख्य असल्याकारणानें, निदान वरकरणीं तरी त्यास पुन्हां कारभारी करण्यांत आलें (१७७८). वडगांवच्या तहानंतर नानाफडणिसानें सखारामबापूस कैद करून सिंहगडावर पाठविलें (१७७९). येथून त्याची पुढें उचलबांगडी होऊन त्याला प्रतापगडावर नेण्यांत आलें. त्यानें पळून जाऊं नये किंवा बंड करूं नये म्हणून, त्याची अटकेची जागा याप्रमाणें वेळोवेळीं बदलण्यांत येत होती. शेवटीं रायगड किल्ल्यावर अटकेंत असतांना या पुरुषाचें देहावसान झालें.